Powered By Blogger

Tuesday, December 30, 2014

तहान



वर्ष संपता संपता खरंतर बऱ्याचदा ३१ डिसेंबर साजरा करत येणाऱ्या नवीन वर्षासाठी काही संकल्प सोडले जातात. काही थोडेफार उत्साही जीव फारफार तर नवीन वर्षात काय नवीन घ्यायचं , करायचं हे हि ठरवून टाकतात. काही नुसतेच संकल्प सोडणारे ती गोष्ट फळास नेण्यासाठीचा भव्यदिव्य आराखडा सुद्धा बनवतात. थोडक्यात काय बहुतांश लोक पुढे म्हणजेच भविष्याकडे पाहतात. सरलं वर्ष आणि आयुष्यात आलेले अनुभव तसे दुर्लक्षितच राहतात. हा हल्ली आता फेसबुकने किंवा तसल्याच तस्सम सोशल वेबसाईट ने फुकटात बनवलेला आपल्या सरल्या वर्षाचा गोड सुखावह स्लाइड शो किंवा व्हिडीओ म्हणजेच जर सरल्या वर्षाचा आढावा, असं म्हणायचं असेल तर मग सगळेच या परीक्षेत पास होतील कारण तिथे आपल्याला काहीच कष्ट पडत नाहीत कारण आपल्या आयुष्याचा रेडीमेड आढावा तिथे मिळतो. टेक्नोलोजी ने आपल्याला आळशी केल्याचा हा आणखी एक पुरावा इतकंच. त्यात ना आपल्या भावनांचा कल्लोळ असतो ना आपलेपणाची जाण. 


रोजचं आयुष्य जगताना असे अगणित क्षण असतात ज्यांची नोंद फक्त आपल्या मनात होत असते, आजूबाजूच्या जगाला कधीही कळू न शकणाऱ्या असंख्य गोष्टी फक्त आपल्या असतात असे “ शेअर” न केलेल्या क्षणांचा आढावा घ्यायला अजूनतरी कुठला “automatic” मार्ग नाहीये, तिथे आपल्यालाच आत डोकवावं लागतं तेव्हा कुठे तो झरा वाहू लागतो. पण खूप कमी लोक आत डोकावू शकतात आणि ती हिम्मत दाखवतात.

येणाऱ्या वर्षाचा विचार करताना अगदी सहज मनात एक विचार आला तो असा कि माणूस खरंच आळशी होत चाललाय कि परावलंबी ? नवे नवे शोध तर लागतच आहेत आणि त्याने आपलं राहणीमान दिवसेंदिवस सुधारत आहे याचा अर्थ माणूस आळशी नक्कीच नाहीये. मग नक्की काय होतंय ? खूप वेळ विचार केला आणि मग उमगलं कि माणसाची “भौतिक तहान” भागत नाहीये तो सारखाच तहानलेला आहे. मग हि तहान आहे तरी कशाची ? तर ती अनेक प्रकारची आहे.  कुणाला पैशाची तहान आहे, कुणाला स्वतःच्या (फक्त स्वतःच्या )करिअरची , तर कुणाला अजून मोठ्या हुद्द्याची , कुणाला परदेशाची, कुणाला मोठ्या घराची , कुणाला उच्चभ्रू राहणीमानाची , कुणाला मोठ्या पगाराची , कुणाला फक्त आनंदी राहायची तहान आहे. आता या प्रकारची कुठलीही तहान असणं म्हणजे गुन्हा वगैरे आहे असं मी मुळीच म्हणणार नाहीये आणि तसं माझं वैयक्तिक मतही नाही. पण तरीही वाईट या गोष्टीचं वाटतं हि फक्त भौतिक असणाऱ्या गोष्टींचीच तहान सगळीकडे वाढत चालली आहे. एका मर्यादे पर्यंत अशा प्रकारची तहान माणसाला “so called आनंदी” ठेवू शकते, पण ती फक्त सुरुवात असते एका मोठ्या कृष्ण विवरा सारख्या मोठ्या काळ्या गुहेची. असं म्हणतात कृष्ण विवर सर्व काही गिळंकृत करत तसच हि तहान आपल्या “आतल्या” माणसाला गिळंकृत करत चालली आहे. या तहानेच्या हव्यासापोटी माणसातली नाती आणि प्रेमाचे धागे मात्र विरताना दिसतायेत. कुठे मुलगा परदेशात म्हणून त्याच्या आठवणीत झुरणारे आईबाप दिसतात तर कुठे अनाठाई चढाओढ करताना एकमेकांशी स्पर्धा करून दमछाक होणारे तरुण, पैशाच्या जोरावर गळचेपी करणारे राजकारणी तर कुठे एकमेकांच्या जीवावर उठलेली नवी पिढी.
पण खरतर “तहान” हि हवीच किंबहुना ती उपजतच प्रत्येक गोष्टीत असते. नव्या शोधाची जननी हि तहानच असते तसेच ती नव्या अनुभवांची नांदी हि असते. निसर्गातल्याही प्रत्येक गोष्टीत ती दिसते. मग पावसाळ्या आधी तहानलेली धरणी असो , कि हिवाळ्यातल्या बोचऱ्या थंडीच्या रात्री नंतर उन्हाची पाहिलेली वाट, न थकता समुद्राचं तहानलेल्या किनाऱ्याकडे झेप घेणं असो किं तहानलेल्या वाऱ्याने डोंगराला घातलेली साद असो.
पैसा कमावणं, घर, गाडी, नोकरी, मूळबाळ अशा स्वकेंद्रित आयुष्याची सवय नव्या पिढीला होत चालली आहे. यात सगळ्यात “मी” हि व्यक्तीरेखा मुख्य पात्र आहे. त्या पलीकडे जाऊन स्वतःच्या व्यक्तिमत्वाशी बोलता येईल आणि त्याला अनुभव संपन्न करता येईल यासाठी फारच कमी प्रयत्न होताना दिसतात. आणि याच साठी लागते ती निर्मळ ,चिरकाल टिकणाऱ्या शाश्वत गोष्टींची तहान. कुणाला ती स्वतःच्या छंदात सापडते ,कुणाला रोजच्या कामात तर कुणाला सामाजिक कार्यात.


भटकंती हे जरी सध्या एक फॅड म्हणून सुद्धा काही लोकांना वाटत असलं आणि ते स्टेटस सारख काही लोक मिरवत असले तरी भटकंतीची “तहान” हि एक प्रचंड मोठी ताकद असलेली गोष्ट आहे. भटकंती करून निसर्गाच्या जवळ जाऊन नवे अनुभव तर मिळतातच पण त्याच बरोबर भिन्न समाजातील लोकांना भेटून अनेक गोष्टीकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन मिळतो. आपल्याच देशातल्या , राज्यातल्या अनेक विस्मयचकित करणाऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. पावसाळ्यातल्या अनेक भटकंतीमध्ये पाहिलेले उलटे धबधबे, काळ्या मिट्ट रात्री काजव्यांनी प्रकाशून टाकलेला डोंगर किंवा जंगल , घनदाट झाडीमध्ये एकटच उभं राहून ऐकलेला शांततेचा आवाज, डोंगरावरून वाहत येणाऱ्या पाण्यात तोंड बुडवून भागवलेली तहान, कुठे उंचावरल्या टोकावरून ढगाला लावलेला हात तर कधी दाट धुक्यामध्ये केलेला स्वर्गीय प्रवास , कधी जंगलात चालताना लागलेला चकवा तर कधी मुद्दाम घेतलेला “longcut”, कधी अनोळखी माणसांनी दाखवलेली माया तर कधी न कळत जुळलेले ऋणानुबंध, कधी एकाच फुलपाखरामागे केलेला उन्हातला प्रवास किंवा कधी रान फुलांच्या रानामध्ये हरवून गेलेला वेडा जीव, कधी समुद्राने घातलेली साद तर कधी डबडबलेल्या डोळ्याने शेवटचा किरण दिसे पर्यंत पाहिलेला सुर्यास्त, हे सगळे प्रकार या तहानेचे द्योतक आहेत. अशा प्रकारची तहान असणं मी भाग्याचं समजतो. ती माणसाला “जागं” ठेवते.

भटकंती प्रमाणेच वाचनाची तहान असणं हि एक प्रचंड मोठी शक्ती आहे. वाचनाने नुसतेच अनुभव मिळतात किंवा माणूस समजदार होतो असं नाहीये तर वाचनाने माणसाला स्व कळू लागतो, जगणं समृध्द होतं आणि मुखवटे दूर सारून स्वतःचा चेहरा समजतो. पुस्तक खरंतर बोलत असते , वाचणाऱ्याला फक्त शब्द वेचायचे असतात. आपण हि तहान जेवढी जागृत ठेवू तेवढी ती आपल्याला नव्या गोष्टी शिकवत राहते.
संकुचित आयुष्य जगण्यापेक्षा बहरलेलं आणि उर्जेने भरलेलं आयुष्य जगण्यात जी मजा आहे ती खरतरं कशातच नाही. म्हणूनच आयुष्याचा वेग हा आपण शाश्वत सुखासाठी किती तहानलेले आहोत यावर अवलंबून असतो. जितकी हि तहान जास्त तितकं आयुष्याला नवे अर्थ येत जातात. आपण का जगतो आहोत हा प्रश्न पडायची वेळच येत नाही कारण आपल्या प्रत्येक श्वासाला एक उद्देश असतो. तहान भागल्यानंतर जी तृप्ती अनुभवायला मिळते ती शब्दात मांडणं खरोखर अशक्य आहे. पण ती तहान टिकवणं आणि पुन्हा पुन्हा नवी क्षितिजे धुंडाळत राहणं जास्त महत्वाचं आहे.  प्रत्येकाने जर अशा गोष्टी शोधून त्यात स्वतःला गुंतवून घेतलं तर समाज प्रगल्भ होण्यास मदतच होईल. 
सक्रीय युवाशक्ती हि देश घडवते असं म्हणतात आणि हीच युवाशक्ती घडते ती शाश्वत गोष्टीसाठी तहानलेल्या निर्लेप मनांनी.  येणाऱ्या वर्षात हीच तहान प्रत्येकामध्ये जागृत व्हावी आणि आयुष्याला खरं परिमाण मिळवं हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि अशाच एका संध्याकाळी पावसात चिंब भिजल्यावर पावसावर लिहिलेल्या चार ओळी इथे लिहितो आणि थांबतो. पुन्हा भेटूच तहानलेल्या एखाद्या किनाऱ्यावर जिथे किनारा समुद्राकडे झेप घेत असेल आणि सूर्य क्षितिजाकडे...!


                                                              इति आनंद
                                                       ३० डिसेंबर २०१४
                                                              पुन्हा भेटूच २०१५ मध्ये
    नव्या अनुभवांच्या नव्या गोष्टीं सोबत


Sunday, November 30, 2014

आई बाप

आई बाप होण या सारखी जगात दूसरी आनंददाई गोष्ट नाही.नऊ महीने पोटात वाढवून जन्म देणारी आई आणि बाळाला पहिल्यांदा हातात घ्यायला चातका सारखी  आतुरतेने वाट पाहणारा बाप दोघेही तेवढेच भाग्यवान असतात.

गेले काही महीने इतके वेगळ्या प्रकारचे अनुभव देणारे होते की बस..
मग ती बाळाच्या पोटातल्या हालचालिचि पहिली चाहुल असो किंवा त्याने पोटातुन हातपाय मारून आपल्या हाकेला दिलेला प्रतिसाद असो , त्याला बाहेरून एकवलेल्या गोष्टी असोत किंवा गायलेली गाणी असोत. सगळच कसं आम्हा दोघांना नवं आणि विलक्षण अनुभूति देणारं होतं. ते दिवस कसे सरले हे खरंतर कळलंच नाही. म्हणता म्हणता तो दिवस आला आणि सारं घरदार त्या नव्या जिवाच्या जन्माकड़े डोळे लावून हॉस्पिटल मधे जमलं. हिला ऑपरेशन थेटर मधे नेलं आणि माझ्या कानाने आहे नाही ती सारी शक्ति एकवटून घेतली आणि फ़क्त पहीला "ट्या " कड़े एकवटली..! साडे सहाच्या दरम्यान तो कानावर पडला आणि बाहेर येउन सिस्टर ने मुलगा झाल्याची बातमी  दिली . लगेच एकमेकाना शुभेच्छा दिल्या गेल्या आणि फ़ोन सुरु झाले. माझी नजर मात्र बाळाला पहायला असुसली होती. थोड्याच वेळात तोहि क्षण आला.
पहिल्यांदा हातात घेतल्यावर कुणीतरी हलकी फुंकर मारावी अन मी हवेत तरंगायला लागाव अस काहीस झाल ,आजुबाजुचा विसर पडला आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. इवलेसे डोळे उघडून  मी मारलेल्या हाकेला त्याने साद दिली आणि माझ्या डोळ्यांच्या कड़ा आनंदून पाणावल्या खरया पण लगेच स्वतः ला सावरून घेत त्याला डोळे भरुन पाहिल आणि मनोमन धन्य झालो.
तो क्षण केवळ विलक्षण नव्हता तर एका नव्या अध्यायाची सुरुवात करणारा होता. नऊ महीने आम्ही फ़क्त "होणारे आई बाप" होतो त्या एका क्षणाने ते अंतर एका निमिषात संपवलं होतं. स्वप्न आणि सत्य यात खुप अंतर असतं असं म्हणतात पण कदाचित या एका क्षणाने स्वप्नाचं सत्यात झालेलं स्थित्यंतर प्रत्यक्षात डोळ्या देखत दाखवून दिलं होतं.

या नव्या अध्यायाला काही दिवसात महिना पूर्ण होईल. त्या चिमुकल्या जिवाने आमचं सारं आयुष्य व्यापून टाकलं आहे.
आता जेव्हा जेव्हा त्याची नजर मला शोधते तेव्हा तेव्हा मला सार जग ठेंगण वाटत. तो कधी हळुच गालात हसून पाहतो , कधी आठ्या आणुन मला खुणावतो, कधी इवल्याशा बोट़ात माझा हात पकडू पाहतो, तर कधी एक टक पाहत जणू माझ्या आत डोकावतो आणि शब्दा विना माझ्याशी संवाद साधतो. माझी अंगाई तुला जेव्हा झोपवते तेव्हा जीव् आनंदून जातो आणि बाप होण्याचा सार्थ अभिमान वाटतो.
बोबडं बोलून आम्ही दोघांनी त्याच्याशी साधलेला संवाद जरी एकतर्फी वाटत असला तरी त्याने दिलेले हुंकार थेट काळजात पोहोचतात.
हे सारंच कस अप्रूप वाटावं असं आहे. या अशाच काही पहिल्या क्षणांना आठवून जे सुचला ते लिहिलय फ़क्त तुझ्या साठी....:-)

पहिल रडू
पहिल हसू
पहिला स्पर्श
पहिला हर्ष..!

पहिली हाक
पहिली साद
पहिला हुंकार
पहिला प्रतिसाद..!

पहिला कटाक्ष
पहिली नजर
भुकेने व्याकुळ
पहिला गजर..!

पहिला स्वर
पहिला सुर
डोळ्याला आलेला
पहिला पुर..!

पहिली ओळख
पहिला विश्वास
पहिला काळोख
पहिला भास्..!

पहिली अंगाई
पहिल गाणं
तुझी निजही
सुरांचं देणं..!

पहिलं कौतुक
पहिला राग
क्षणभर झोपताच
आलेली जाग..!

रात्र शाळेतली
पहिली सभा
जागेपणीच
झालेली प्रभा..!

भरभर धावे
आता काळ
खोटे बोलू
लागे घडयाळ..!

पहिल सगळ
वाटे वेगळ
आता दिसे
जग आगळ..!

तुझ सार
तेच पहिलं
पहिले आम्ही
उरलो नाही..!

जन्म झाला
अमुच्या पोटी
दैवाचीच ही
कृपा मोठी..!

30 नोव्हेंबर 2014
आनंद




Sunday, October 26, 2014

मनातून भाग 6 :- वाचू आनंदे


गेल्या काही महिन्यात राधेय, मृत्युंजय, एकलव्य, पावनखिंड अशा पुस्तकांचा वाचन घडल आणि एक प्रचंड ताकदीचे आणि दुर्दम्य इच्छा शक्ति जागृत करणारे विषय असल्याने अर्थातच भारावून व्हयायला झाल.
पुस्तकांच विश्लेषण कराव इतकी ताकत तर माझ्यात  नाहीच त्या मुळे तो खटाटोप मी करणार नाहीच पण तरीही राहवला नाही म्हणून मनाला जे वाटल आणि मला जे जाणवल ते इथे लिहिलय.

राधेय खरतर एकदा वाचल असा म्हणु शकत नाही कारण ते पुन्हा पुन्हा खुप वेळा चाळुन झालय. चांगला आणि वाईट याच्या खुप पलिकडे जाऊन कर्ण समजुन घ्यावा लागतो.
युद्धाच्या आधी कर्णाच एक स्वगत आहे त्याचा सारांश खुप काही सांगुन जातो.
मृत्यु येणार हे गवसुन सुद्धा कर्ण त्या रुपंताराची कारणमीमांसा करत असतो. मृत्यु ला रूपांतर मानणारा कर्ण खरोखर निर्भयि होता हेच क्षणोंक्षणी जाणवत राहत.
ऐहिक ऐश्वर्य , व्यवहारिक समाधान , वासना तृप्ति म्हणजेच का् साफल्य ! ते प्राण्यांनाही भोगता येत. मानवी जीवनाचा साफल्य ऐहिक तृप्तित नाही. या खेरीज अजुन एक तृप्ति असते ती कर्णाने संपादन केली होती. त्याच्या मृत्यु बरोबर संपणारी ती तृप्ति नाही. परमेश्वराने सुर भरलेल्या बासरीतुन जसे तीव्र सुर उमटले , तशीच असंख्य कोमल सुरांची पखरण सुध्हा झाली. चारित्र्य जपता आला. उदंड स्नेह संपादन करता आला. मित्रच न्हवे तर शत्रुही तृप्त झालेले पाहिले. वैरभाव पत्करला , तो ही परमेश्वररुपाशी. या पेक्षा जीवनाच यश यापेक्षा वेगळ का्य असत ?
हे विचार कर्ण नदी तीरावर उभा राहून करत असतो तोहि एक दुर्मिळ योगायोगाच म्हणावा लागेल. नदीच्या पाण्यात ज्याला सोडून देण्यात आल ,तोच आज तिथे उभा राहून आयुष्याकडे मागे वळुन पाहत होता आणि मृत्यु ला आव्हान देत होता.
कर्ण वाचताना माझ्या मनात उगाच त्याच्या बदल करुणा किंवा दया अजिबात आली नाही तर त्याच्या प्रत्येक कृतिमागे असलेली कारणे आणि त्याची भूमिका ही खुप गहन विचार करायला लावणारी होती.
एक प्रचंड इच्छा शक्तीचा स्त्रोत कुठेतरी आत आयुष्यभर झिरपत रहावा आणि वाटेवरच्या काटयाना, संकटाना लीलया सामोरा जाण्याचा बळ मिळत रहावा आणि तरीही ताठ मानने मृत्युलाही कवटाळण्याची ज्याची तयारी करणारा कर्ण भावतो तो याच मुळे...!


कर्णा प्रमाणेच नंतर वाचलेला "एकलव्य" भावला तो त्याच्या प्रचंड प्रामाणिक आणि दुर्दम्य आशेने व गुरू भक्तिमुळे. एकलव्य ची गोष्ट तशी सगळ्याच्या परिचायाची.
एकलव्य हा हिरण्यधनु चा पुत्र. द्रोणाचार्यांकडे विद्या याचना करण्यासाठी जातो पण ते नकार देतात.  त्या नंतर एकलव्याने स्व प्रयत्नातुन मिळवलेली विद्या , त्यातून अर्जुनाला वाटू लागलेला मत्सर आणि  द्रोणाचार्यांना गुरु दक्षिणा म्हणुन दिलेला उजव्या हाताचा अंगठा , हा घटनाक्रम. पण यात प्रत्येक वळणावर एकलव्यने दाखवलेला संयम केवळ प्रशंसेस पात्र ठरतो.
एकलव्य वाचत असताना मला क्षणोंक्षणी  जाणवत होत ते आजही आपल्या आजुबाजुस असलेले अनेक द्रोणाचार्य आणि असंख्य एकलव्य. खरतर ही सामाजिक शोकांतिका आहे. पात्रता असुनही जवळ असलेली विद्या देऊ न शकणारे गुरु आणि ती शिकू न शकणारे विद्यार्थी.
संयमाच्या जोरावर माणुस किती आणि का्य प्राप्त करू शकतो याचा परिपाठ एकालव्यच्या गोष्टीतुन मिळतो. आणि तोच मला इथे जास्त भावला.
पावनखिंड आताच वाचून संपवल. एक अप्रतिम पुस्तक. बाजी प्रभुची ओळख पटायला पुरेशी अशी माहिती आणि वर्णन त्यात आहे. बर्याचदा खिंड लढ़वणारे बाजी एवढीच ओळख आपल्याला असते आणि होती पण त्या पलिकडे माणुस म्हणून ते कसे होते आणि शिवाजीन्बद्दल त्यांना कशा प्रकारे आदर होता हे खुप प्रामाणिकपणे मांडले आहे. बाजी अक्षरशः सावली सारखे महाराजांच्या सोबत असायचे आणि या राजाला काही होउ नये म्हणुन सतत झटायचे.  जेव्हा सिद्दी जोहर स्वराज्यावर चालून येतो आणि मिरजेचा वेढा सोडून शिवाजी महाराज पन्हाळ्याला परत येतात तेव्हा उद्विग्न पणे ते म्हणतात " बाजी माणसाचा यश जस वाढत जात तसे त्याचे शत्रु पण वाढत जातात आणि तो एकाकी पडतो." यावर बाजी राजाना धीर तर देतातच पण पन्हाळा किती मजबूत आहे आणि इथे राहण कस योग्य आहे हे ही सांगतात. यावर महाराज आपल्या मनातला होरा बाजीनी बरोबर ओळखला म्हणून खुश होतात.
महाराज बाजीना वडिलकिच्या नात्याने वागवायचे ते उगीच नाही. बाजी नुसतेच लढ़वय्ये नव्हते तर ते एक प्रचंड हुशार सेनानी होते. पहिली तोफ पन्हाळ्या वरुन कधी डागायची हे महाराजानी पूर्ण पणे बाजींवर सोपवले होते ते फ़क्त त्यांना बाजीं बद्दल असलेल्या प्रचंड विश्वासा मुळेच.
राजा जगला पाहिजे हे एकच ध्येय समोर ठेवून खिंडित उभे ठाकलेले बाजी मन जिंकतातच पण त्याही पेक्षा मोठा काम म्हणजे इतर मावळ्या मधेही ते ती जिगर आणि इच्छा जागवून जातात.

या सगळ्या पुस्तकां मधे एक समान गोष्ट होती आणि ती म्हणजे  प्रचंड बिकट , प्रतिकूल परिस्थिति असुनही  केवळ मिळालेल्या आयुष्याचे सार्थक करण्यासाठी  जिवाचा रान करून झटणारि काही दुर्मिळ आणि देदीप्यमान व्यक्तिमत्वे...!
दाटुन आलेले ढग उदास वाटत असले तरी मला वाटत , आपला जन्म ज्या धरणीवर बरसुन तिला तृप्त करण्यासाठी झाला आहे ती कृति करायला ते आसुसलेलेच असतात.
ढगच काय पण प्रत्येकचाच जन्म हा फ़क्त हवेतला ऑक्सीजन शोषून जिवंत राहण्या साठी झाला नसून तो जगण्याचा महोत्सव करून त्याचा सार्थक करण्या साठी झाला आहे हे जेव्हा प्रत्येकाला उमजेल तेव्हा खरे ढग बरसतील आणि आकाश निरभ्र होईल....!

                                                         आनंद
                                                     26 ओक्ट्बर 2014

Tuesday, September 30, 2014

आशा




आशेला भूलताना
स्वप्न ते फुलले
नदीला मिळताना
थेंबही हरले..

उमलून कोमेजताना

फुलही हसले
सरूनही उरताना
क्षणही फसले....

स्वप्नात रमताना
सत्यही सरले
उरत जपताना
भास जुने स्मरले....

आभाळाला सोडताना
पाणीही रुसले
डोळ्यांनी अश्रूंना
स्वतःच पुसले....

सुख दुखाना झेलताना
श्वासही संपले
संपलेल्या श्वासांना
गंध तरी कसले....?

हे गंध आशेचे......
एका नव्या दिशेचे....!
नव्या क्षितिजाच्या , नव्या प्रवासाचे ...!
नव्या आकाशाच्या, नव्या मुक्कामाचे.....!

                                                   आनंद
                                                           ३० सप्टेंबर २०१४


Sunday, August 31, 2014

लघुकथा : झाडाला वाहिलेलं फुल

सुकन्या आज घरीच होती. तिने ऑफिस ला आज सुट्टी टाकली होती. खूप दिवस झाले तिला बर वाटत नव्हतं तरीही तो तसेच दिवस ढकलत होती. शेवटी आज निग्रहाने तिने सुट्टी घेतली. सकाळची कामे उरकली आणि आता काय करावं हा प्रश्न तिला पडला. औषध घेऊन पडून राहावं असं वाटलंही पण इच्छा मात्र झाली नाही. आई २ महिन्यापूर्वी गेल्या नंतर कदाचित पहिल्यांदाच ती घरी सुट्टी काढून बसली होती. शोक करत घरी बसायची सुद्धा तिला उसंत मिळाली नव्हती. जवळ पासाचे ४-५ नातेवाईक तेवढे राहिले होते एक आठवडा, नंतर तेही गेले. मावशी परत येते म्हणाली होती पण ती हि त्या नंतर फिरकली नाही. तसं एकट राहणं तिला काही नवीन नव्हतं पण तरीही का कुणास ठेवूक आज तिला अस्वस्थ वाटत होतं. तेवढ्यात खिडकीत लावलेल्या झाडांकडे तीच लक्ष गेलं, २ दिवस पाणी न घातल्याने ती सुकून चालली होती. ती लगबगीने उठली आणि पाणी घालू लागली. आईने खूप हौशीने लावलेली झाडं अशी कोमेजेलेली पाहून तिला भरून आला. आई असती तर आपल्याला चार शब्द नक्कीच सुनावले असते हे तिला जाणवलं.
पाणी घालतानाच तीच मन कुठे दूर गेलं,  भाऊ परदेशी स्थायिक झाला आणि आई आणि आपण दोघेच एकमेकींना उरलो, प्रत्येक गोष्ट वाटून , बोलून विचार करून करायची जणू दोघींना सवयच लागली. भाऊ गेल्यावर आई आपल्या समोर ढसाढसा रडलेली तिला आठवलं ,सुकन्ये तुझं लग्न कोण करून देणार गं असा भाबडा प्रश्न तिला पडला होता. आई, मी फक्त तुला सांभाळणार आहे, मला लग्न करायचं नाही हे आपण तिला बोलल्यावर क्षणभर ती सुखावली आणि दुसऱ्याच क्षणी हे तिला मान्य नाही म्हणून आपल्यावर तुटून पडली होती. पण काळाने तिनेही माझा विरोध आहे म्हटल्यावर पुन्हा तो विषय काढला नव्हता.
मी नेहमी तिला म्हणायची आई , गोठलेला मन आणि बर्फ दोन्ही सारखेच नाही का गं ? एक घाव दोघांना तोडू शकतो आणि मायेची उब दोघांना वितळवू शकते. दोन्ही मार्गांनी मन मोकळं होतंच पहिल्या मार्गाने ते आपल्या माणसाच्या खूप दूर जातं तर दुसर्याने ते जवळ येतं, निकाल तोच असला तरी परिणाम दोन असू शकतात.
माझ्या एवढ्या बोलण्यावर ती नुसती हसली होती. सुकन्ये तू फार विचार करतेस बघ. अग माया का अशी सांगून, मारून मुटकून करता येते, ती उपजतच लागते बघ. रक्ताचं माणूस दूर जातं आणि परका जवळ येतं तेव्हा कुठली शक्ती हे करते याचा विचार केलास तर तुला उमजेल काही काही नातीच अशी असतात तिथे हे असं कसं हा प्रश्न येत नाही, गोष्टी घडायच्या तेव्हा घडतातच.
आई शाळेत शिक्षिका होती तेव्हा ती मुलांची एवढी लाडकी का होती हे मला ती बोलायला लागली कि कळायचं . ती बोलताना ठरवून कधीच बोलत नसे पण जे काही बोलत असे ते ठेव हृदयाला भिडे. शिक्षिका असताना शेकडो मुलांना ती मदत करायची पण त्याचा साधा उल्लेख केलेलाही तिला अजिबात आवडायचा नाही. जीवन खूप अनिश्चीत असत असं तीच ठाम मत होतं.
ती म्हणायची अनिश्चीतता खरं तर जीवघेणी असते तरीही आयुष्यात क्षणाक्षणाला ती आपल्याला सामोरी येते आणि आपल्याला तिला पार करावाच लागतं, कारण त्याच्याच पलीकडे आपल्याला हवं असणारं तात्पुरत्या निश्चीततेचा जग असत. अनिश्चित आणि निश्चित या दोन गोष्टींमध्ये जे असत तेवढंच खरतरं आयुष्य कारण तेवढ्याच काळात माणूस आयुष्याला अर्थ देणाऱ्या इतर गोष्टी करायला मोकळा असतो.
आई असं काहीतरी बोलायची आणि आपल्याला मात्र चांगलाच हुरूप चढायचा आणि एक दोन आठवड्यातच उतरायचा हे आठवून सुकन्येला हसू आला. पण आई जे काही बोलायची ते किती खरं आणि वजनदार असायचं हे आठवून तिला भरून आलं.
खिडकीतून बाहेर रस्त्याकडे पाहत असतानाच तिचं लक्ष रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका म्हाताऱ्या आज्जी कडे गेलं. तिला उगाचच उत्सुकता वाटली. काही वेळ सुकन्या तिथेच उभी राहिली. हातात एक पिशवी, डोळ्यावर झाड चष्मा . नऊ वारी साडी, सुरकुतलेला चेहरा आणि सैरभैर नजर अशा अवस्थेत ती म्हातारी बाई रस्त्याच्या कडेला बसली होती. हा नेहमीचाच रस्ता असल्यानं इथे कोणी भिकारी बसत नाहीत हे सुकन्येला माहित होतं पण मग हि कुणाची वाट पाहत असावी असं वाटलं आणि ती आत निघून गेली.


बऱ्याच वेळाने तिने पुन्हा बाहेर पाहिलं तर ती म्हातारी बाई तिथेच. आता मात्र सुकन्येला अनावर झालं, ती हातात कुलूप घेऊन बाहेर आली, दर ओढून कुलूप लावलं आणि खाली आली.
आजी तुम्ही कोणाची वाट पाहत आहात का ?  तिने आजीना विचारलं. आजीने नुसताच पाहून मानेने नकार दिला. मग इथे काय करताय भर दुपारी ? मी दोन तासान पासून पाहते आहे तुम्ही इथेच आहात, तुम्ही हरवला आहात का ? आजींच्या डोळ्यात टचकन पाणी आला, नाही ग पोरी, मला इथे सोडून दिलाय माझ्या पोरानं त्यांना मी नकोशी झाले होते.
काय ?? सुकन्या चपापली..! जग खूप पुढ गेलाय असं आपण म्हणतो आणि अजूनही असं काहीतरी पाहायला मिळत याचं तिला नवल वाटलं. क्षणभर तिचा तिच्या कानावर विश्वास बसेना.
ती म्हणाली तुम्ही जरा माझ्या बरोबर चला मी इथेच समोर राहते. आधी आजीने नकार दिला पण सुकन्या त्यांना घेऊनच आली. त्यांना एका खुर्चीत बसवून सुकन्या पाणी आणायला गेली. आजींची नजर शून्यात होती. कदाचित त्यांना पोटच्या पोराने असं वागावं यावर विश्वास बसत नव्हता.
सुकन्या पाणी आणि थोडं खायला घेऊन आली. पण आजी फक्त पाणी प्याल्या. आजी आता मला सविस्तर सांगता का नक्की काय झालं ते ?
आज्जी बोलु लागल्या , पोरी काय सांगू ? मला २ मुलं एक मुलगा आणि एक मुलगी, पती १५ वर्षापूर्वीच गेले. मी शाळेत नोकरी करून मुलांची लग्न करून दिल. मी मुलाकड राहात होते. पण सुनेचा आग्रह थोडं मुलीकडेही राहावं. म्हणून थोडेदिवस तिकडे गेले पण एकेदिवशी मुलीने स्पष्ट सांगितलं आई आमच्या घरात आधीच जागा कमी तू आपली पुन्हा दादा कडे जा राहायला. म्हणून पुन्हा परत आले. तेवढ्या कारणावरून सुनेने भांडण केलं, मुलगाही वाटेल तसा बोलला. मी गप्प बसून सगळं ऐकून घेतलं. थोड्या दर १५ दिवसांनी मला अशी भांडणं ऐकावी लागायची. पण गेल्या महिन्यापासून सून आणि मुलगा बरंच चांगलं वागू लागले होते मला वाटलं त्यांना समज आली असावी. पण आज सकाळी मुलगा म्हणे आम्हाला थोडं बाहेर जायचं आहे तू हि चल. ७-८ दिवस जायचं आहे म्हणून  कपडे पण बरोबर घ्यायला लावले. थोड्यावेळाने एके ठिकाणी गाडी थाबवून मला उतरवलं आणि म्हणाला आम्ही आलोच ५ मिनिटात तू थांब इथेच आणि मला सोडून गेले. मी संध्याकाळ होई पर्यंत तिथेच थांबले पण कोणीच आला नाही. शेवटी काल रात्री जवळच्या बागेत झाडाखाली झोपले आणि आज सकाळी पुन्हा रस्त्यावर येऊन थांबले. मला काही कळत नव्हतं कुठे जावं. आयुष्य निरर्थक वाटू लागलं. आजींचे डोळे पाण्याने डबडबले होते. सुकन्येने त्यांना सावरलं.
ती म्हणाली आजी तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही माझ्या इथे राहा. मी पाहते काय करायचं ते.
सुकन्या आत आली. तिच्या डोळ्यातून पाणी आलं. चेहऱ्यावर पाणी मारून तिने आरशात पाहिलं. खरतर आपल्या माणसाचं वय वाढलं कि माणूस अजून आपलं वाटायला हवं कारण सोबतीचे दिवस कमी होत आहेत याची जाणीव  झालेली असते आणि हातातून निसटलेल्या क्षणांची कदर कळते. आई गेली तेव्हा आपण उन्मळून पडतो होतो ते त्याच मुळे पण इथे तिला आजींच्या बाबतीत वेगळाच चित्र दिसत होतं. दोन टोकाचे अनुभव आणि आपण दोन्हीचे साक्षीदार असं काहीसं तिचं झालं. तिने डोळे पुसले, थोडं पाणी प्यायला. आणि एक निश्चय केला. आजीना मी सांभाळीन. कोण कुठल्या माहित नसल्या तरीही. आपल्या कडे गमावण्या सारखा काहीच नाहीये जे काही आहे ते आई ने दिलेले संस्कार. आज आई असती तर तिने नक्कीच आजींची मदत केली असती. याच विचारात ती बाहेर आली. तिने आजीनना स्वतःची सगळी हकीगत सांगितली. आणि तिने घेतलेला निर्णय हि सांगितला.

ती म्हणाली , आजी तुमच्या घरच्यांचा शोध घेणं हे काम पोलीस करतीलही पण घरचे तुम्हाला किती स्वीकारतील आणि तुम्ही तिथे आनंदी राहू शकाल का हे महत्वाचं आहे आणि या परिस्थितीत मला असं वाटतं कि तुम्ही परत जाऊ नये. ज्यांना तुम्ही नकोशा आहात तिथे पुन्हा जाणा उपयोगाचं नाही. तुम्ही मला ओळखत नाही आणि मी हि तुम्हाला फारशी ओळखत नाही पण म्हणून सध्या काही फरक पडत नाही. तुम्ही माझ्या इथे राहू शकता. मी एकटीच राहते.  माझी आई २ महिन्या पूर्वीच गेली. आम्ही दोघी इथे राहायचो. माणसाला माणसाची ओळख पुरेशी आहे.  तुमच्या रूपाने कदाचित मला पुन्हा एकदा आई भेटेल.
झाडाला येणारं एखादंच फुल असं असत कि ज्याला जन्म देणाऱ्या झाडालाच वाहून घेण्याचं भाग्य मिळत फक्त त्याच फुलाला आयुष्याचं सार्थक झाल्याचा आनंद मिळत असावा. माझ्या आई ला वाहून घेण्याचं भाग्य मला मिळालं होतं पण आता तुमच्या रूपाने अजून एक संधी मला नशिबाने दिली आहे.
आजी फक्त ऐकत होत्या. धूसर झालेल्या डोळ्यातून त्यांना सुकन्या दिसतही नव्हती पण त्यांच्या थरथरत्या हाताला सुकन्येनं केलेला स्पर्श जाणवत होता. आधार फक्त आपल्या माणसच देऊ शकतात हे सुकन्येनं खोटं ठरवलं होतं.  खिडकीतल्या मगाशी पाणी घातलेल्या झाडाला थोडीशी तरतरी आली होती सुकन्या तिकडे पाहून सुखावली.

                                                            आनंद

                                                            ३१ ऑगस्ट २०१४ 

Monday, July 28, 2014

घरटे

घरट़े

घराच्या टेरेस वर लावलेली दोन चिमणीची घरटी आणि तिथे रोज न चुकता दाणे टिपायला येणारया तीन चिमण्या मला कुठल्या तरी परत फेडिची जाणीव करून देतात. त्यांच्या चिवचिवाट़ाने कधी त्या काही बोलू पाहत असतीलही. पण तिथे संवादा पेक्षा कृती महत्वाची ठरते. विश्वासाने त्या रोज येतात. दाणे देणार हे घरट त्यानी आपलास करून टाकल आहे.
अशाच अजुन एका खरया घराट्याला भेट देण्याचा योग नुकताच आला.
हडपसर इथला घरटे प्रकल्पतला एक दिवस पुन्हा एकदा नव्या संवेदना देऊन गेला. आकुंचन पावलेल्या आयुष्याला पुन्हा एकदा आपले हात पसरून त्या चिमुकल्या जीवांनी आपलस केला. नक्की कुणी  कुणाला काय दिल होत ? तिथे कुणाला मायबाप आहेत तर कुणाला कुणीच नाही पण सगळे त्या एका घरट्यात राहतात. आपल्या पेक्षा छोट्या मुलांची काळजी मोठी मुल घेतात. बाहेरून आलेल्या नव्या माणसांशीही नुसत्या तोंड ओळखीवरुन ती काही मिनिटात रूळतात. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंदी होतात. हे सगळ पाहिल आणि पुन्हा एकदा खात्री पटली की  अपोआप जुळणारे काही ऋणानूबंध कधीच ठरवून एकत्र येत नाहित , आयुष्यात स्वतः च घरट सोडून अनोळखी घरट्याचा शोध घेत राहिला पाहिजे. कुठे कोण तुमची वाट पाहत असेल आणि कुठे तुमचा शोध संपेल सांगता येत नाही...!

एक घरट़े अनोळखी,
हसरे आणि जिवंत..
मायबाप नसले तरी
मना नसे खंत....

एक  घरट़े अनोळखी,
पोरक आणि एकट
स्वतः मधेच रमल तरी
आसू ना ते ढाळत...

एक  घरट़े अनोळखी,
कधीतरी कोमेजत...
वाट पाहून कुणाची
स्वप्न पाहत निजत....

एक  घरट़े अनोळखी,
उन वारा सोसणार
पावसाच्या एका सरीनेही
चिंब ओल भिजणार....!

एक घरट़े अनोळखी,
नितळ आणि कोवळ
इवल्याश्या मुठीत त्याच्या
आभाळ सार मावल....

एक घरट़े अनोळखी,
प्रेमाला आसुसलेल
मायेच्या एका हाकेतच
क्षितिज त्याच सामावलेल...

एक  घरट़े अनोळखी,
विश्वासानी भरलेल
जगाच्या पाठीवर
आशेचा किरण उरलेल.....
                                        आनंद
                                       26 जुलै 2014







Saturday, June 28, 2014

लघु कथा : छोट्या आयुष्याची मोठी गोष्ट





प्रेरणा आज तशी उशिराच निघाली , आधी तिला बँकेत जाऊन पैसे भरायचे होते आणि मग तिथून लायब्ररीत जाऊन पुस्तकं बदलायची होती. आणि हे सर्व करून मग पुढे कामाला जायचं होतं. कितीही उशीर झाला तरी हि दोन कामं करण आज आवश्यकच होतं कारण दोन्ही गोष्टींची आज शेवटची तारीख होती नाहीतर दंड पडणार होता. लगबगीने तिने रस्ता ओलांडला आणि चालत बँकेत पोहोचली. कोपऱ्यातल्या टेबलावर बसून ती स्लीप भरू लागली. पटकन काऊटर  वर जाऊन तिने पैसे भरले. पलीकडच्याच लाईन मध्ये उभ्या असलेल्या उन्मेषच सहज लक्ष प्रेरणा कडे गेलं. पैसे भरून प्रेरणा लगबगीने बाहेर पडली. ती बाहेर जाताच उन्मेष चं लक्ष टेबलावरच्या छोट्या पिशवी कडे गेलं. प्रेरणा तिची पिशवी गडबडीत तिथेच विसरून गेली होती. उन्मेष पटकन पुढे झाला आणि त्याने ती पिशवी उचलली आणि तो बाहेर पळत आला. पण तेवढ्यात त्याने पाहिलं कि प्रेरणा रिक्षात बसून निघून गेली होती. त्याला काय करावे सुचेना. नाव गाव काहीच माहित नसताना आता हि पिशवी त्या मुलीला कशी परत करणार हा प्रश्न मनात घोळ घालत असतानाच त्याने पिशवी उघडून त्यात काही ओळखीचं सापडतं का हे पहावं म्हणून ती उघडली. त्याच्या हाताला एक वही लागली त्यात दुमडलेल्या पानावर आजची तारीख आणि आज करायच्या गोष्टींची यादी लिहिली होती. बँक १० वाजता, सुमेध लायब्ररी १०.३० वाजता , निर्मिती पुस्तकालय ११ वाजता .. अशी यादी वाचतानाच त्याला वाटलं यावरून आपण तिला गाठून तिची पिशवी परत करू शकतो.  आणि मग तो हि रिक्षातून लायब्ररी कडे निघाला.
इकडे प्रेरणा रिक्षातून लायब्ररी मध्ये पोहोचली. मोठी पिशवी खांद्याला असल्यामुळे आपली एक पिशवी बँकेत विसरली आहे हे तिच्या अजूनही लक्षात आलेलं नव्हतं. ती भरभर लायब्ररीत पोहोचली आणि पुस्तक जमा केलं. दोन कामं झटपट झाल्यानं तिला हलकं वाटलं आता ती गावातल्या दुकानात निघाली. बाहेर आल्या आल्या बस मिळाल्यानं ती अजून सुखावली. खिडकीतून बाहेर बघताना ती स्वतःशीच हसली. आपण किती उत्साहानी कामं करतो . कदाचित आपण आपल्याला आवडणारं काम करत असल्यानं असं होत असेल असं तिला वाटलं. आपल्या आयुष्याच्या नागमोडी वळणांनी आपल्याला खूप काही शिकवलंय , अगदी या क्षणीजरी मरण आलं तरी आपल्याला काहीही वाईट वाटणार नाही पण जेवढा जास्त जगू ठेवढा अजून चांगलाच आहे असे काहीतरी विचार तिच्या मनात चालू होते.
तिकडे उन्मेष लायब्ररीत पोहोचायच्या आधीच प्रेरणा तिथून निघून गेल्यामुळे त्याचा हिरमोड झाला. आता शेवटी वहीच्या पानावर लिहिलेल्या गावातल्या पुस्तकांच्या दुकानात जायला निघाला. त्याने आलेली बस पकडली. आपण खरतर या अनोळखी मुलीच्या मागे तिची पिशवी द्यायला का जात आहोत हेही त्याला उमगलं नव्हतं पण त्या क्षणी वाटलं आणि केलं असं काहीसं त्याचं झालं होतं. पण मुळात तिच्या चेहऱ्यावरच्या प्रसन्न हास्याने त्याला भुरळ घातली होती.
प्रेरणा दुकानात पोहोचून तिने हवी ती पुस्तके घेतली आणि ती बाहेर पडली. उन्मेष ची बस दुकानाच्या समोर थांबली. पळत पळत खाली उतरून त्याने दुकानाकडे पाहताच त्याला लांब चालत जाणारी प्रेरणा दिसली. तो तिला गाठण्यासाठी मागे निघाला. प्रेरणा चौक ओलांडून पलीकडे गेली. उन्मेष तिच्या पासून तसा बराच लांब होता पण ती त्याला दिसत होती.  प्रेरणा रस्ता ओलांडून अगदी छोट्या बोळात शिरली. इथून पुढे आजूबाजूची वस्ती फारशी चांगली दिसत नव्हती. त्याचे पाय थोडे अडखळले पुढे जावं कि नाही याचा त्याला प्रश्न पडला पण जिच्या मागे एवढ्या दूर आलो ती नक्की कुठे चालली आहे याची त्याला उत्सुकता वाटू लागली होती. त्यामुळे खरतर तो आता थोडा अंतर राखून चालू लागला. दोन छोट्या गल्ल्या ओलांडून प्रेरणा चाळी वजा खोल्या असलेल्या इमारतीत जाऊ लागली. उन्मेष ते पाहून चांगलाच चपापला. ती वैश्या वस्ती होती. क्षणभर आजूबाजूला बघताच त्याला गरगरून आलं आपण काय विचार केला होता आणि हे काय निघालं असं त्याला वाटू लागलं पण तरीही त्या मुलीला भेटून पिशवी तिला देऊन दोन शब्द सुनावूनच आपण इथून जायचं असं त्याने ठरवलं. तो जिन्याने वर आला. आजूबाजूच्या स्त्रिया खूप वेगळ्या नजरेनं त्याच्या कडे पाहत होत्या. समोरच्याच खोलीत प्रेरणा शिरल्याच त्याने पाहिलं होतं तो त्याच दिशेने चालत राहिला. दार हाताने लोटून त्याने समोर पाहिलं. लहान मुलांच्या गराड्यात प्रेरणा बसली होती. तापलेल्या जमिनीवर पाणी ओतल्यावर जशी गरम हवा बाहेर पडते तसं त्याचं काहीसं झालं . मुलही तिला बिलगली होती. तिने आणलेली पुस्तके ती एक एक करून प्रत्येकाला देत होती. उन्मेष तसाच उभा राहिला. त्याला काहीच कळेना. मनात विचारांचं काहूर माजला होतं खूप कमी वेळात नाना प्रकारचे विचार त्याच्या मनात येऊन गेले होते. त्याची त्यालाच घृणा वाटत होती आणि कीवही येत होती. तेवढ्यात प्रेरणाच लक्ष त्याच्या कडे गेलं. मुलांकडे वळून त्यांना काही सूचना करून ती उठून त्याच्याकडे आली. तो भानावर आला.
माझ्याकडे काही काम आहे का ? तिने विचारलं . हो तसच काहींसं त्याने अडखळत उत्तर दिल. आणि हातातली पिशवी पुढे केली. उन्मेषने सकाळ पासून ची सगळी हकीकत तिला सांगितली. आणि तिच्या विसरलेल्या पिशवी साठी तो कसा इथे पोहोचला हेही सांगितलं. प्रेरणा ने त्याचे खूप आभार मानले आणि आपण कसे विसरभोळे आहोत हेही मान्य केलं. दोघांनी एकमेकांची नावे एकमेकांना सांगितली.
प्रेरणाला या वस्तीत शिरताना पाहून त्याच्या मनात आलेले विचार, नंतर आपण हिला सुनावून मगच इथून जायचं वगैरे सगळं त्याने तिला सांगितलं. प्रेरणाला ते ऐकून गम्मत वाटत होती आणि जग गोष्टी कशा पाहता हे हि तिला पुन्हा उमगत होतं. तिला अर्थातच हे नवीन नव्हतंच.
शेवटी प्रेरणाला बोलणं भागच पडलं पुन्हा पुन्हा भूतकाळ चार लोकांसमोर उगाळत बसावा हे खरतर तिला अजिबात आवडायचं नाही पण इथे तिला का कुणास ठावूक उन्मेषचा प्रामाणिकपणा पाहून तिला सांगाव वाटलं.
प्रेरणा म्हणाली, मुळात मी इथे का ?, या प्रश्नापेक्षा हि वस्ती इथे का हा प्रश्न लोकांना पडायला हवा. तुला म्हणून सांगते उन्मेष , (न कळत तिने त्याच्या नावाचा एकेरी उल्लेख केला) मला जन्मतःच एच.आय.व्ही आहे. माझ्या वडलांकडून तो आईला आणि मग माझ्या जन्मानंतर मला तो फुकटच मिळाला. पूर्वीच्या काळात त्यांनी केलेल्या कुठल्यातरी चुकीची शिक्षा हि अशी आम्हा सगळ्यांना मिळाली. आई आणि बाबा दोघेही पंधरा वर्षापूर्वीच गेले. मी एका संस्थेत वाढले. तिथल्याच एका शिक्षकांच्या मदतीने पुढे कॉलेज केलं. खरतर जगण्याची इछाच नव्हती पण दर वर्षी अजूनही माझ्यासारखे जन्मतःच एच.आय.व्ही असलेली लहान मुलं संस्थेत येणं काही बंद होत नव्हतं, मग ठरवलं जेवढं जगेन तेवढं सार्थकी लावेन. आता या वस्तीत येते या बायकांच्या मुलांच्या शिकवण्या घेते. इथल्या बायकांना शिकवते आयुष्याचं मोल समजावते. आपल्या चुकीमुळे कुणाचे संसार कसे उध्वस्त होतात हे जेव्हा त्या बायकांनी पाहिलं तेव्हा त्याही ढसाढसा रडल्या. पण मी म्हटलं रडून काही होणार नाही बदल घडवावा लागेल. एकदा धंद्यात पडलं कि बाहेर येता येत नाही वगैरे गोष्टी खोडून काढत आम्ही इथल्या ४ मुलीना बाहेर शिक्षणाला पाठवलं त्या आता इकडे कधीच फिरकायच्या नाहीत. मी हि किती जगेन हे मलाही माहित नाही कदाचित फार फार तर दोन चार वर्ष पण मला ती खूप मोलाची वाटतात अजून खूप काही करायचय.
उन्मेष ऐकून स्तब्ध झाला होता. त्याला काय बोलावं हेच कळेना. त्याची घालमेल बघून प्रेरणा म्हणाली, तू वाईट वाटून घेऊ नकोस बरीच लोकांना दुसरी बाजू माहित नसते त्याने लोक माझ्या बद्दल असा विचार करतात पण त्याने आता काहीच फरक पडत नाही. गर्दीत आणि एकटी असल्यावर मी फक्त “मी” असते. त्यात माझ्याकडे वर्ष आहेत कमी आणि काम आहे खूप त्यामुळे काही गोष्टीना बगल देऊन पुढे जाण भागच आहे. तेच मी करते. ज्यांच्याकडे आहेत ७०-८० वर्षे त्यांनी खुशाल करावा इतरांच्या आयुष्याबद्दल चांगल्या वाईट चर्चा मला या जन्मी ते थोड अवघडच आहे. असं म्हणून ती खळखळून हसली.
एक एक कप चहा घेऊन प्रेरणाला निरोप देऊन उन्मेष बाहेर पडला. त्याला आजूबाजूची लोकं खुजी वाटत होती आपणही त्यातलेच आहोत हे हि त्याला कळत होतं. आयुष्याची परिमाणं कशी बदलतात हे त्याने आज नुसता अनुभवलच नव्हतं तर प्रत्यक्ष पाहिलं होतं. अमक्या वर्षी हे करू तमक्या वर्षी हे करू असं ठरवणारी कित्येक माणसे त्याने पहिली होती अशा लोकांची मोठ्ठाली आयुष्ये त्याला शुल्लक वाटू लागली होती. जी गोष्ट माणसाकडे मुबलक असते त्याची किंमत त्याला नसते हेच खरं आणि आयुष्यचं सार्थक करणारी कामे माणूस नेहमीच कशी लांबणीवर टाकतो याचीही त्याला जाणीव झाली होती. आयुष्य म्हटलं तर खूप मोठा शब्द आणि म्हटलं तर खूप छोटा. पण मग हे छोटं मोठं कसं ठरतं ? मुळात ते आपण ठरवत असतो. मिळालेल्या वेळेचा काळाचा आपण किती आणि कसा उपयोग करतो यावर आयुष्य जगण्याची गणितं अवलुंबून असतात. हो गणितच कारण ते एकदा चुकलं कि पुन्हा सुधारता येत नाही.
प्रेरणाचं आयुष्य छोटं असलं तरी तिचीच गोष्ट खूप मोठी आणि खरी होती. आज आलेला आयुष्याची नव्याने ओळख करून देणारा अनुभव मनात ठेवून तो गर्दीतून वाट काढत निघाला.
आनंद
२८ जून २०१४