Powered By Blogger

Friday, February 28, 2014

मनातून भाग ३



 


मनातून या सदरातून या आधी मला जे वाटतं ते मी लिहिलं. आताही पुन्हा गेल्या काहीदिवसात मनात उठलेल्या प्रश्नांना मी आज मोकळी वाट करून देत आहे. मागच्या एका जुन्या लेखामध्ये देउळ या विषयावर मी बरंच लिहिलं होतं. आता इथेही देव हीच व्यक्तिरेखा समोर असली तरीही मुख्य पात्र हे आपण सगळे आहोत. गेल्या वर्षभरात मला जास्त करून जाणवलेली ,खरंतर खुपलेली एक गोष्ट म्हणजे सणांच्या उत्सवांच्या नावांवर देवाचा मांडलेला बाजार. मग तो गणेशोत्सव , नवरात्र, महाशिवरात्र , ईद यापैकी काहीही असलं तरी त्याने काहीही फरक पडत नाही. कुठल्याशा मंदिराला वर्गणी काढून सजवलं, मोठे लाउड स्पीकर लावले त्यावर चोविसतास चालणारी चित्रपटांच्या गाण्यांच्या चालीवरची गाणी लावली की भक्तांच्या मोठ्या रांगा आपोआप लागतातच हे ही गृहीत झालं आहे. तिथल्या देवळातला देव मला हरवलेला वाटतो. मुळात तो मला दिसतच नाही. 

अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर आताच मी राजस्थान ला जाऊन आलो. तिथे अजमेर ला मोठा दर्गा आहे असं ऐकलं होतं आणि पुष्कर इथे ब्रह्म देवाचं जगातलं एकमेव मंदिर आहे. दोन्ही ठिकाणी जायचं ठरवलं. आधी पुष्कर मधल्या बम्ह्देवाच्या मंदिरात आलो. भक्तांची मोठी रांग इथेही होतीच. पण मला उत्सुकता होती ती बम्ह्देवाच्या मूर्तीची. देउळ तसं साधंच असलं तरी मूर्ती मात्र सुंदर होती. मंदिरात देणगी भरपूर येत असावी कारण तिथली जमिनीवरची प्रत्येक फारशी कुणीतरी दान देलेली दिसत होती. कुणाच्या तरी नावाने अर्पण केलेल्या त्या फरश्या शेवटी भाविकांच्या पायाखालीच येत होत्या. मंदिरातून आम्ही पुष्कर तलावाकडे गेलो. तिथे एके ठिकाणी एक ब्राम्हण पुढे आला आणि आम्हाला बसायला सांगून या जागेची माहिती पुरवू लागला. तो सांगत असलेलं इतिहास तसा रंजक होता. साधारण एक १५ मिनिटे माहिती सांगितल्यानंतर तो त्याच्या मूळ मुद्य्यावर आला. जे मला अपेक्षित होतंच. या दुकानावरून फुले घेऊन आता आपण या तलावाची पूजा करुया असं तो म्हणाला. अर्थात आम्हाला ते नको. होतं. मी पुढे होऊन त्याला माहिती सांगितल्याबद्दल ५० रुपये देऊ केले. ते नाकारून तो अगदी उपहासाने आम्हाला सांगू लागलं की आमच्यात भक्ती भाव कसा कमी आहे, त्याचा आम्हाला कसा त्रास होईल वगैरे. पण त्याला कशालाही दाद न देता आम्ही तिथून निघालो. अर्थात त्याचं एक गिऱ्हाईक कमी झालं होतं. तिथून आम्ही खाली आलो, तिथे तलावाच्या पाण्यात अनेक जण डुबकी मारून सगळी पापं धुवून काढत होते. पण इथे वर मात्र  भोळ्याभाबड्या लोकांना लुबाडून मात्र काही लोक पापाचे धनी होण्यात धन्यता मानत होते. हा विरोधाभास खरोखर त्रासदायक होता. गाभाऱ्यातला देव का नाहीसा होऊ लागलाय हे कळायला मला फार वेळ लागलं नाही. 
 

जसा अनुभव या मंदिरात आला तसाच प्रकारचा अनुभव अजमेरच्या दर्गा शरीफ मधेही आला. गाडी खूप अलीकडे लावून आम्ही चालत दर्ग्याकडे निघालो. जाताना रस्त्यात गुलाबाच्या फुलांच्या चादरी, फुलांच्या माळा , डोक्याला बांधायचे रुमाल, अत्तरे  याची असंख्य दुकाने होती. पायातल्या चपला ठेवण्यासाठी काहीच न मिळाल्याने आम्हाला एका दुकानातून फुलं घ्यावी लागली. इथला देवाचा बाजार सुद्धा काही वेगळा नव्हता. इथेही सर्व धर्माच्या लोकांची खूप गर्दी होती. आत जाऊन दर्ग्याच्या मुख्य चौथार्याचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी होती. अक्षरशः धक्काबुक्की करून दरवाजा पर्यंत पोहोचून डोळ्याला काहीच दिसलं नाही. हातातली फुलं तिथल्या माणसाच्या हातात देऊन मागे वळलो. मनात एकच प्रश्न होता. आपण काय पाहिलं. कदाचित हा ही गाभारा सुनाच असेल.
सणांच्या दिवशी भरून वाहणारी मंदिरे दुसऱ्या दिवशी तितकीच सुनी असतात. इतर दिवशी सुना पडलेल्या गाभाऱ्याकडे कुणाचंही लक्ष नसतं. मला वाटतं खरतरं अशाच वेळी देव विश्रांती साठी तिथे येऊन बसत असावा. क्वचित येणाऱ्या भाविकांना इतर दिवशी मंदिरात आल्यवर शांती आणि समाधान मिळत ते कदाचित यामुळेच. 



महाराष्ट्रात दरवर्षी चालणारा पालखी उत्सव हा एक मैलाचा दगड आहे. त्यातून खूप काही शिकण्या सारखं आहे. इथे लाखो भाविक चालत शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात पण त्या प्रवासात त्यांचं विठू त्यांच्या बरोबर असतो. त्यासंपूर्ण प्रवासात माणूस माणसाशी जोडला जातो. आणि हेच वारीचं वैशिष्ट्य आहे.
पंढरपूरला पोहोचल्या नंतर कित्येक वारकरी मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन पुन्हा तसेच माघारी फिरतात कारण त्यांचा देव सदा सर्व काळ त्यांच्या बरोबरच असतो. पण तिथेही मंदिरात पुन्हा चित्र सारखंच दिसतं. कदाचित विठू माउली सुद्धा वारीला चालत येत असतील आणि मंदिरात दिसते ती नुसतीच दगडी मूर्ती असेल.  खऱ्या वारकऱ्याला वारी भावते ती १५ दिवसाच्या प्रवासामुळे. त्यात तो आजूबाजूच्या माणसांशी बोलत असतो, सुख आणि दुख दोन्ही वाटत असतो. आयुष्य जगतानाचे अनुभव मांडत असतो. वर्षभरातल्या चांगल्या वाईट गोष्टी विसरून केवळ मनाच्या शांती साठी तो वारीत येत असेल.
पूर्वी बांधलेल्या या श्रद्धास्थानांचा कदाचित हाच हेतू असेल. माणसाला एकमेकांपासून दूर जाण्यापासून वाचवण्यासाठी. हल्ली अशी स्थाने कमी झाली आहेत. जोडण्यापेक्षा तोडण्यासाठी या धार्मिक गोष्टींचा वापर जास्त होताना दिसतो.
भारतातल्या जवळपास प्रत्येक तीर्थ क्षेत्राला बाजारी रूप आलाय. सगळी गणिते पैशात. एकीकडे देशात इतक्या मोठ्या प्रमाणात गरिबी आणि विषमता असताना मंदिरांमध्ये सगळीच उधपट्टी दिसते.
मंदिरे पूर्वीही होतीच. लोकही पूर्वी होते. पण देव हे श्रद्धा स्थान होतं. लोकांच्या भावनांशी खेळून गरिबापासून श्रीमंतांपर्यंत पैसा गोळा करणाऱ्या धार्मिक संस्था नव्हत्या.  हे पाहून चीड तर येतेच, पण नुसतं त्याने भागणार नाही हेही तितकंच खरं आहे. मग कसं बदलू शकेल हे ?  गोष्टी आपोआप घडत नसतात. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक माणसाला हे कळू शकणार नाही पण जर आपण स्वतःपासून सुरुवात केली तर ? तर मात्र या धंदेवाईक लोकांना थोडी का होईना जरब नक्कीच बसेल. देवाला पुन्हा देव पण देण्यासाठी हे होणं गरजेचं आहे. नाहीतर काही दिवसांमध्ये मंदिर ही पैसा गोळा करण्याच्या कंपन्या होतील.
श्रद्धास्थाने ही माणसांना बळ देण्या साठी असतात दु:खही ,कष्टी, थकलेल्या, हरलेल्या, एकट्या जीवांना तिथे नवी दिशा मिळायला हवी. अस्थिर झालेल्या मनाला तिथे शांतता लाभायला हवी. आनंदी असलेल्या जीवाला तिथे येऊन तो आनंद वाटता यायला हवा. मुळात माणसाला माणसाशी जोडायला मंदिरांनी मदत करायला हवी. मला वाटतं वेळ आलीय. बदल घडवायची.

         आनंद
         २८ फेब्रुवारी  २०१४