Powered By Blogger

Wednesday, January 22, 2020

उगाचंच सहजंच - कृष्ण आहे पाठीशी

उगाचंच सहजंच - कृष्ण आहे पाठीशी



प्रवास मग तो कसाही केलेला असो शेवटी अनुभव देणाराच असतो. अशाच अनुभवाला मी सामोरा गेलो आणि मथुरा या श्री कृष्ण जन्मभूमीला स्पर्शून आलो. फार काही न ठरवता आणि फार विचार न करता केलेला हा खटाटोप  नंतर मात्र आनंददायी झाला.
दिल्ली वरून जाताना 150 km सायकल आणि येताना उत्तर प्रदेश परिवहन मंडळाची बस असा दुहेरी अनुभव खरतर गमतीशीर आणि तितकाच साहसी होता. दिल्ली वरून निघाल्यावर अर्थात बऱ्याच ठिकाणी एकटा सायकल वरचा माणूस पाहून उत्सुकता होती अन काही ठिकाणी मात्र हरियाणा मध्ये bike, कार मधून काही लोकांनी पाठलाग केला किंवा एक दोघांनी अगदी खेटून कार चालवली , टक लावून बघितले पण अर्थात त्या सुनसान highway वर सायकल चालवत राहणे  या शिवाय पर्याय नव्हताच, तर काही ठिकाणी मीही गावात शिरून या लोकांचा पिच्छा सोडवला, सुर्दैवाने कोणी लुबाडले नाही.
अंधार पडायच्या आधी मथुरा गाठणे हे ध्येय असल्याने न थांबता जात राहिलो आणि 7 तासापेक्षा कमी वेळात मथुरा गाठली.
जन्मभूमी ला अर्थात सकाळी दर्शन घेण्याचं ठरवलं आणि सकाळी उठून मंदिर गाठले. अर्थात कुडकूडणाऱ्या थंडी मध्ये गर्दी नसली तरी बरेच लोक होते. मंदिराचा भव्य परिसर आणि कृष्ण राधे नामाचा गजर ते वातावरण अजून भारावून टाकणारा करत होता. काहीतरी अनामिक , अदृश्य पण तितकेच लोभस वाटावे असे अवती भवती असल्याचा भास होत होता अर्थात मंदिरातली मूर्ती सुद्धा तितकीच जिवंत आणि जन्मस्थान असलेली गुहा सुद्धा गंधित झालेली जाणवली.
दर्शन घेऊन मग परतीच्या प्रवासाला बस स्टँड गाठले आणि गजबजलेल्या स्टँडवर एक वयस्कर गृहस्थ मदतीला आले, दुसऱ्या बसचे कंडक्टर असूनही त्यांनी दिल्लीची बस शोधून दिली, मग दिल्ली च्या बस च्या कंडक्टरला गाठून सायकल विषयी चर्चा करून एका तिकिटाचे पैसे पडतील या बोलीवर सायकल टपावर चढवली , अर्थात मीच वर चढून बांधली आणि एकदाचा बस मध्ये बसलो. बस निघण्याची वेळ फिक्स नव्हती कारण सगळे सीट भरले की निघणार हे त्याने आधीच सगळ्यांना सांगितले होते. त्या मुळे वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. बस अर्थात कशी बशी 4 चाकावर उभी राहिली होती आणि ही "चालू" पण होईल यावर ती "होई" पर्यंत माझा विश्वास नव्हता.
बस थांबलेली असल्या मूळे मग कचोरी, समोसा, औषधी तेल, पाचक चूर्ण ,असे फेरीवाले सतत आत बाहेर करत होते. धूर येणाऱ्या तेलाचा डेमो सुद्धा एक सेल्समन ने दाखवला, या सगळ्यात माझे मनोरंजन होत होते. हळूहळू बस भरली. खिडकीच्या सीट वरून भांडणे पण झाली, एक बाई तर "उलटी आली तरच खिडकी देणार का?" असे त्या गृहस्थाला विचारत होती, ते ऐकून मला मात्र हसू आवरले नाही. दुसरी कडे कंडक्टर तिकिटे काढत होता. शेवटी बस सुरू झाली आणि माझा जीव भांड्यात पडला. पण साधारण 20 मिनिटे झाली असावीत आणि बस पुन्हा थांबली कारण तिकिट चेकर बस मध्ये आला , त्याने बस मधली लोकं मोजली आणि एक तिकीट कमी सापडले, बिचाऱ्या कंडक्टर ने एका लहान मुलीचे तिकीट तिच्या वडिलांकडून घेतले नव्हते ती  6 वर्षाची होती. तिकीट चेकर ने मग कंडक्टर ला फैलावर  घेतले, टपावर ठेवलेल्या सायकल वर पण काही चर्चा झाली पण मला बोलावले नाही आणि बस पुढे निघाली.
सगळीकडून करकचून आवाज करणाऱ्या बस ने दिल्ली च्या दिशेनी कूच केले.
साडेपाच च्या सुमारास दिल्लीला पोहोचलो आणि पुन्हा टपावर चढून सायकल खाली उतरवली.
हा प्रवास अचानक, न ठरवता आणि उस्फुर्तपणे घडून आलेला होता अर्थात ढीगभर अनुभव आणि अंतर्मुख करणारे काही क्षण हाती देऊन संपला होता.
दिल्लीसारख्या शहरापासून केवळ 60 km असणाऱ्या पलवल सारख्या गावात अजूनही चांगले रस्ते, पाणी या सारख्या सोयी उपलब्ध नाहीत हा विरोधाभास उठून दिसतो. प्रगतीचा वेग इथे का मंदावतो या प्रश्नांची उत्तरे सापडणं मुश्किल.
सर्वसामान्य माणसांना बस चा प्रवास किती जिकरीचा आहे याचं चित्र दुर्दैवाने प्रत्येक राज्यात सारखंच आहे. मग ती महाराष्ट्रातली ST असो की यूपी मधली बस. चिखलाने भरलेल्या बसस्टँडवर पेसेंजर भरण्यासाठी धडपड करणाऱ्या कंडक्टर ची घालमेल हेलावून टाकणारी होती. विकसनशील असं बिरुद मिरवणाऱ्या आपल्या देशाला विकसित होण्यासाठी केवळ शहराचं उदात्तीकरण करून चालणार नाही हे मात्र खरं.
दिल्ली ला पोहोचलो आणि पुन्हा उंच supertech , supernova सारख्या tower ने आपले मोठे मनोरे समोर उभे केले, उंचीवरून वाहतूक करणाऱ्या flyovers ने खुणावून आपली उंची दाखवली आणि तितक्याच महागड्या गाड्या वेगाची चढाओढ करताना दिसल्या पण मी मात्र रस्त्यावर उभा राहून मागे वळून मला सोडलेल्या बस मधून उतरणाऱ्या सर्व सामान्य लोकांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो, तिकीटशिवाय प्रवास करणाऱ्या छोट्या मुलीच्या चेहऱ्यावरच्या निरागस भावना टिपत राहिलो, एकाच आशेवर की जेव्हा ती मोठी होईल तेव्हा माझा भारत बदललेला असेल...!
ज्या कृष्णाने वाटेत आलेल्या सगळ्या संकटांना दूर ठेवले त्याला पुन्हा स्मरले आणि मग अचानक जाणवले ते अनेक कृष्ण जे कित्येक वाटसरूंना साथ देत असतात कधी दृश्य तर कधी अदृश्य रूपाने. सायंकाळच्या आसमंतातल्या त्या अगणित रंगांना एक वेगळी झळाळी आली होती दिवस मावळला होता पण त्याच रंगांच्या साथीने पुन्हा उगवण्यासाठी.
चेहऱ्यावर हसू उमटले , वाटलं "सदा सर्वांच्या पाठीशी कृष्ण हवा हेच खरे " आणि एक आशा जी आयुष्यात खरोखर "जिवंत" ठेवेल..!

आनंद
21 जानेवारी 2020

2 comments: