Powered By Blogger

Thursday, February 28, 2013

सुटलेली पाने – भाग एक


सगळं काही सुरळीत चालू असताना सुद्धा कधी कधी हातातून क्षण मागे निसटून जातात पण त्याची जाणीव होईपर्यंत काळ पुढे गेलेला असतो.  आयुष्यातले सगळेच क्षण आपल्याला हवे तसे आणि हवे तेव्हा समोर आले असते तर आयुष्य किती छान झालं असतं असं आपल्याला बऱ्याचदा वाटत असतं. पण अचानक समोर येणाऱ्या क्षण क्षणांची मजा खरंच काही और असते यात काहीच शंका नाही. हातातून निसटलेल्या गोष्टीचं दु:ख होणं , वाईट वाटणं साहजिक आहे पण त्या सुटलेल्या क्षणांची आठवण आपल्याला पुढे जाऊन साथ करते हे ही तितकंच खरं आहे. 
प्रवास करताना एकही वळण नसलेला सरळ मार्ग सुरुवातीला आवडला तरी नंतर कंटाळवाणा होतो. एक वळण घेऊन ते सोडून दुसऱ्या वळणावर जाताना काहीतरी गमवण्याच्या दु:खापेक्षा वळण पार केल्याचा आनंद जास्त  असतो.



आज इतक्या वर्षांनी मागे वळून पाहताना मला आठवतायत ती खूप काही लिहायचं असलं तरीही हातातून सुटलेली कोरी पाने. ती कोरी असली तरीही त्यांच्या मधे इतकं काही दडलंय कि कोरा कागद समोर धरला तरीही वाचता यावा. कधी शब्दांनी साथ न दिल्यामुळे, तर कधी काळाने दगा दिल्यामुळे, कधी जाणूबुजून तर कधी नकळत, पानं मागे सुटतच गेली. त्या वेळच्या आठवणी मात्र तशाच राहिल्या, कधीतरी शब्दरुपाने आपण पुन्हा जन्म घेऊ अशी वेडी

आशा त्यांनीही ठेवली असावी.  ही सुटलेली पाने पाहून मन भरून नक्कीच येतं पण मग त्याच वेळी एक माणूस म्हणून समाधान सुद्धा वाटतं कारण प्रत्येक वेळी सुटलेल्या त्या पानांनी मला अनुभवाची मोठी शिदोरी दिली आहे आणि आयुष्य समृद्ध करायला खूप मोलाची मदत केली आहे. सुटलेल्या पानांमागाच्या गोष्टी गोळा करून जमा करून त्यातल्या मला भावलेल्या काही निवडक पानांना  इथे सादर करायचा प्रयत्न केला आहे.


लहानपणीच्या सगळ्याच गोष्टी माणसाला आठवल्या असत्या तर मोठं होऊनही माणसाने लहानपणीची निरागसता विसरली नसती. असंच माझ्या लहानपणीचं माझ्या मनाच्या खूप जवळ असलेलं सुटलेलं कोरं पान जे मला अजूनही डोळ्यात पाणी भरायला भाग पाडते ते म्हणजे माझ्या बालपणीच्या मैत्रीचं..! तो मित्र होता अमर. तेव्हा आमचं वय साधारण सात आठ असावं ,शाळेच्या दुसरी ते चौथी च्या वर्गात असताना आमच्यात मैत्री झाली. अमरला दोन्ही पायांना पोलिओ होता. खूप हुशार असलेला अमर आणि माझी मैत्री कशी झाली हे मला आठवणं खूप कठीण आहे पण ती मैत्री खूप निरागस आणि कोवळी होती. त्या वयातल्या स्वभावाला साजेशी आणि खूप नितळ स्वच्छ आणि तितकीच बोलकी होती. आम्ही वर्गात शेजारी बसायचो ,मी फारसा हुशार नसलो तरी अमर बरोबर राहून थोडाफार फायदा मलाच व्हायचा.
वर्गात सर्वांना हात वर करून उभं राहायची शिक्षा झाल्यावर अमर बरोबर बऱ्याचदा मलाही त्याचा मित्र म्हणून शिक्षेतून सुट मिळायची.

आज २० वर्षांनी सुद्धा मला अजूनही त्याचे बोलके डोळे आठवतात, आजीच्या पाठीवर बसून शाळेत येतानाचा अमर मला अजून डोळ्या समोर येतो. मधल्या सुट्टीत सगळा वर्ग रिकामा झाला तरी अमर, मी आणि तब्बसुम ने खाल्लेला डबा मला अजून आठवतो. सगळं वर्ग खाली खेळत असताना आम्ही वर्गात बसून गप्पा मारत बसायचो. खूप कोवळ्या वयातल्या त्या मैत्रीला कसलेच बंधन नव्हते. कुठलीच अपेक्षा नसली कि माणूस माणसाला जिंकू शकतो त्यातलाच हा प्रकार असावा. फारशी समज नसलेल्या त्याही वयात मला अमर खूप दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला वाटायचा. त्याच्या अपंगत्वाचा त्याने कधीही बाऊ केलेला मला आठवत नाही. चौथी नंतर शाळा बदलली आम्ही वेगळे झालो. पुन्हा भेटण्याचा योग कधीच आला नाही. अमर शहर सोडून गेला असं कळलं तेवढीच काय ती खबर. शाळेचा शेवटचा दिवस मला आठवत नाही, पण आज असं खूप वाटतं कि, का नाही आमची मैत्री दूर होऊनही टिकू शकली , आयुष्याचे संदर्भ इतके भरभर का बदलले ? कापसासारखं हलकं होऊन हवेत अलगद उडावं आणि वाऱ्याच्या एका लाटेने आपली दिशा बदलावी असं काहीसं झालं असावं. समाधान फक्त याचंच आहे  कि आज इतक्या वर्षांनी सुद्धा हातातून निसटलेल ते पान मला आठवतंय. 

   


आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला अर्थ असतात असं म्हणतात , पण या मैत्रीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न मी कधीच केला नाही कारण अर्थ नसलेली हीच गोष्ट माझ्या बालपणीच्या आठवणींमधली सुखाची लकेर आहे.  निर्ढावलेल्या जगात डोळ्यात एकाच वेळी आनंदाचे आणि दु:खाचे अश्रू आणणारी इतकी नितळ गोष्ट दुसरी कुठली असू शकते नाही का ?
हातातून सुटलेलं हे पान कोरं राहिलं कारण समज येण्यापूर्वीच काळ खूप पुढे निघून गेला होता. त्याच कोऱ्या कागदावर आज एक कुंचला फिरवून आठवणी रेखाटायला मिळणं हे सुद्धा मला वाटतं फार भाग्याचीच गोष्ट आहे.
 
                                                            आनंद
                                                            २८ फेब्रुवारी २०१३
 



Sunday, January 20, 2013

बोलते व्हा ......!



शहरातला गोंगाट, माणसांची गजबज, आजूबाजूला पसरलेल्या इमारती, पळणारे दिवसरात्र , धावणारा सूर्य, कधी नात्याचं ओझं तर कधी ओझ्यांची नाती, पैशाचा खेळ आणि साचेबद्ध आयुष्य, पण हे ही रोज बदलत आहे, प्रत्येक गोष्टीला नवीन आकार येत आहे. नाविन्याचा विळखा खूप वेगाने पुढे झेपावतो आहे. जग बदलतंय.......!

पण मी अजूनही तोच आहे... 

तोच अलिप्त पणे जगाकडे पाहून हसणारा. स्वतःच्या अस्तित्वाला न झुगारता मनाशी बोलणारा...
स्वतःच्या माणसांनी न ओळखून सुद्धा मनाशीच गुजगोष्टी करणारा..,
कधी अथांग सागराशी दोस्ती करून त्याच्याशी मनसोक्त गप्पा मारणारा...,
कधी गर्द झाडीतून दिसणाऱ्या आकाशाला न्याहाळणारा...,
कधी उंच कड्यावरून वाहणाऱ्या वाऱ्याला साद घालून बेभान होणारा...,
पावसाच्या सरीत चिब भिजून तिला कवेत घेणारा...! 

स्वतःच स्वत्व जपण अवघड नसतं. एकाकी पडू अशी भीती नसेल तर स्वतःशी संवाद साधनं ही सोपी गोष्ट असते. 




कधी कधी वाटतं , अस्तित्वाची जाणीव नसणं हे ही कधी कधी खूप महत्वाचं असतं तुम्ही जगाच्या चौकटीमध्ये निदान अडकत तरी नाही. चारचौघांसारख असणं म्हणजे नक्की काय हे खरंतर अजून मला उमगलेलं नाहीये आणि निदान या जन्मात कळलं नाही तरी फार काही अडणार नाहीये.
प्रश्न आहे तो माझ्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांचा, पण मग तिथेही जर आपण अपेक्षा ठेवल्या नाहीत तर दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करायला आपण बांधील नसतो, नाही  का?  आयुष्य फार सोपं करून जगण्यात जी मजा आहे ती खरंतर दुसरी कशातच नाही.
मला वाटतं आपणंच आपलं जगणं संकुचित करतो कि काय ? स्वतःच्या आयुष्यावर आक्रमण करणाऱ्या गोष्टींना आपण नाही का म्हणू शकत नाही ?  हो म्हणण्याचा एवढा अट्टाहास आपण कुणासाठी करतो ? स्वतः साठी कि दुसऱ्यासाठी ? प्रश्न खूप आहेत आणि प्रत्येकाला उत्तरं शोधण्याचे श्रम घेण्याची इच्छा नाहीये. आपल्याला पटेल ते उत्तरं बरोबर मानून मनाचं करण्याची वृत्ती वाढत चालली आहे.  गरज आहे थोडं निस्वार्थी होण्याची ,त्रयस्थपणे स्वतःकडे पाहता आलं तर निम्मे प्रश्न आपोआप मिटतील आणि उरलेले प्रश्न मुळात का पडले याची जाणीव होईल. 
नक्षत्र रात्री दिसतं याचा अर्थ दिवसा ते नसतं असं नाही, त्याचं अस्तित्व दिसण्या साठी रात्रीची गरज असते. आयुष्यातल्या भौतिक गोष्टी अशाच असतात दिसत नसतात तो पर्यंत आपण स्वप्न पाहत बसतो आणि समोर आल्या कि कौतुक सोहळा साजरा करतो. जवळ असलेली नक्षत्रे आपल्याला दिसत नाहीत कुणीतरी जाणीव करून दिली कि खडबडून आपण जागे होतो पण तो पर्यंत दिवस उजाडलेला असतो. 

"स्वतःच्या उरातली घालमेल फक्त स्वतःला कळत असते, हसताहसता कधी डोळे भरून येतात तेव्हा दरवेळी ते पाणी आनंदाचच असेल कशावरून, कधी कधी उरातले जुने हरवलेले क्षण अचानक डोळ्यातून वाहू लागतात. समोरच्याला वाहणारं पाणीच दिसतं ,वाहताना पाण्याने कितीही आक्रोश केला तरी तो मुकाच असतो. सांत्वनाचे शब्द कधी कधी पोहोचूच शकत नाहीत ते उगीच नाही..
म्हणून मला नेहमी वाटतं एका ठराविक मर्यादेनंतर फक्त “आपणच” स्वतःशी संवाद साधू शकतो."
      
न विचारलेल्या, न बोललेल्या, अनेक विचारांची मनात गर्दी असते. ती गर्दी जितकी जास्त तितकी घालमेल जास्त. यावर उपाय म्हणजे स्वतःशी संवाद. एखादी गोष्ट स्वतःशी कबुल करण्यापेक्षा मोठी गोष्ट जगात  कुठलीच नसते. मनातल्या जळमटाना बाजूला सारण्याची जबाबदारी फक्त स्वतःवर असते. स्वतःशी बोलून आपण मोकळे होतो. आपण कुणाजवळ व्यक्त झालो तरी मनात भीती असते समोरच्या माणसाबद्दल कितीही खात्री असली तरी व्यक्त होताना परकेपणाची भावना ही असतेच. मनाशी बोलताना मात्र ही भीती नसते.


आपल्या आयुष्यातल्या समस्यांवर आजूबाजूच्या लोकांनी हात टेकले कि समजून घ्यावं कि “स्वतःशी” बोलण्याची वेळ आली आहे.
म्हणून म्हटलं बोलते व्हा.......! पण आधी स्वतःशी.....!
                                                                 ......आनंद