Powered By Blogger

Thursday, December 31, 2015

भटक्या जीवाच्या (WanderLust Soul) भटकंतीच्या कथा :



सरते वर्ष आणि त्याच्या बरोबर पुढच्या वर्षा साठी जुने ठरणारे या वर्षीचे भटकंतीचे क्षण यावर थोडं विचार केला आणि उमगलं कि नित्य नेमाने नव्याची आस असणाऱ्या भटक्या जीवाने या वर्षीही खूप काही अनुभवलंय. नव्या आणि तितक्याच ताज्या क्षणांनी व्यापून गेलेलं हे वर्ष खरोखर आनंददायी होतं. हि भटकंती कधी अनोळखी लोकांबरोबर होती, तर कधी आपल्या माणसांबरोबर , कधी एकट्याने तर कधी परक्या देशातल्या नव्या मित्रांबरोबर ,कधी आड वाटेवर तर कधी अगदी डोळे झाकून चालता येईल अशा रुळलेल्या वाटेवर, कधी पावसाळी ढगाबरोबर पाठशिवणीचा खेळ करत, तर कधी उन्हापासून लपतछपत. जीव भटकत राहिला आणि त्यानेच नवी उर्जा मिळत राहिली. उर्जेचा तो झरा कधीच आटला नाही याला कारण अर्थात आपल्या माणसांनी दिलेली हक्काची साथ. भटक्या जीवाची भूक भागवताना एक बाजू कमकुवत पडू न देण्याची जबाबदारी घरातल्या माणसांनी सांभाळली आणि याच कारणामुळे आज प्रचंड वेगळे अनुभव घेऊन जीव जरासाही थकला नाहीये. उलट नव्या वर्षीच्या भटकंतीच्या तयारीला आता पासूनच लागलाय.

थोडासा मागे वळून पाहावा म्हटलं तर काही ठळक आणि लक्षात राहण्या सारखे अनुभव प्रत्येक वळणावर येत होते, २०१५ वर्षाची सुरुवात झाली ती वासोट्याच्या ट्रेक ने. जानेवारी महिन्यातल्या त्या ट्रेक ने धमाल आणली. ४ जानेवारीला ७ जणांच्या आमच्या ग्रुप ने वासोटा सर केला. कार मध्ये खच्चून भरलेल्या Bags, रात्री पोहोचल्यावर थंडी मध्ये कुडकुडत केलेलं maggi आणि ओम्लेट, मंदिरामध्ये काढलेली रात्र, पहाटेच्या धुक्याने धूसर झालेला शिवसागर जलाशय , बोटीचा रम्य आणि कधीच संपू नये असं वाटणारा प्रवास , पहिल्याच दर्शनाने मनात घर करणार वासोटा , वर पोहोचल्यावर चारी दिशांना पसरलेलं दाट अभयारण्य आणि शिवसागर जलाशयाच्या मध्ये मध्ये डोकावणाऱ्या खुणा आणि गड उतरून पुन्हा पायथ्याशी आल्यावर त्या शांत सायंकाळच्या वातावरणात अजून गूढ दिसणारं ते आजूबाजूचं जंगल हे सगळंच केवळ अदभूत होतं आणि आहे. योगायोगाने माझ्या या आवडत्या किल्ल्या पासूनच या नवीन वर्षाची सुरुवातही होण्याची शक्यता आहे आणि मी पुन्हा एकदा त्याला डोळे भरून पाहायला आतुर आहे.



मार्च मध्ये चीन ला भेट देण्याचा योग आला आणि पहिल्याच आठवड्यात "Hangzhou" या चीन मधल्या एका नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिध्द असलेल्या आणि “West Lake” या UNESCO World Heritage Site ला भेट देण्याचा बेत ठरला आणि तो साध्यही झाला. ८२१० एकर मध्ये पसरलेला हा परिसर केवळ नयनरम्य आहे. २ दिवसाच्या या परक्या देशातल्या अचानक ठरलेल्या प्रवासाने तिथल्या संस्कृतीला जाणून घेण्याची संधी फारच लवकर मिळाली होती. तिथे एकगोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे tourism क्षेत्राला लाभलेला सरकारचा वरदहस्त आणि त्या मुळे खूप चांगल्या प्रकारे अबाधित राखलेलं निसर्गाचं रूप. काळानुसार अर्थात त्यात बदल होत जातात पण तरीही पुढची पिढी त्यापासून वंचित राहत नाही. चीनच्याच माझ्या वास्तव्यामध्ये मी अर्थात ज्या शहरात राहिलो होतो तिथल्या जवळपास कुठे डोंगर दऱ्या किंवा फोर्ट आहे का हे आधीच शोधलं होतं आणि त्यात भेट देण्याच्या यादीत सगळ्यात पहिल नाव होतं ते “Huangshan mountain” किंवा “ Yellow mountain” हे सुद्धा १९९० पासून एक “UNESCO World Heritage Site आहे. पाईनची टोकदार झाडे , वरून जरूर अनुभवावा असं केवळ अप्रतिम सूर्यास्त, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराचे “Granite peaks” हे फक्त डोळ्याने पाहून तृप्त व्हावं इतकं सुंदर आहेत. वर असलेली खूप शिखरे १००० मीटर पेक्षा जास्त उंच आहेत. त्यातलं आम्ही भेट दिलेली “Bright Summit Peak” हे १८४० मीटर उंची वर आहे. १०० million वर्षाआधी एका समुद्राच्या नाहीसं होण्याने निर्माण झालेली हि शिखरे निसर्गाचा एक चमत्कारच आहेत. इथेही मला भावलेली एक गोष्ट म्हणजे इथलं हे पर्यटन फक्त तरुणाई पर्यंत सीमित नव्हतं तर मला इथे प्रत्येक वयोगटातील माणसे दिसत होती. अगदी हातात काठी घेतलेले सत्तरीचे आजी आजोबा, संपूर्ण परिवार सोबत चढाई करायला आलेलं कुटुंब, लहान मुलांचे ग्रुप्स , तरुणांचे कॅम्प्पिंग चे ग्रुप्स आणि या सगळ्यांची प्रचंड गर्दी हे दृश्य खरोखर लोभस होतं. हे दृश्य दिसायला कारणेही तशीच होती कारण इथेही खूप प्रकारच्या सोयी सरकारने करून ठेवल्या आहेत त्यामुळे अर्थात निसर्गाच्या जवळ जाऊन त्याला अनुभवायची अशी संधी कोण सोडेल. या शिखारांवरचे २ दिवसांचे वास्तव्य खूप काही शिकवणारे होते. त्या शेकडो लोकांमध्ये मी परक्या देशातला असूनही मला केवळ एक “भटका” म्हणून मी त्यांच्यातलाच वाटत होतो. “Yellow mountain” सर करून परतताना वाटेत पावसाने गाठून जणू काही आम्हाला निरोप दिला होता. खाली आलो तरी दूरवरची शिखरे अजूनही खूप काही बोलत होती. त्या मूक संवादाला कुठल्याही भाषेचा अडथला नव्हता.























भारतात परत आल्यावर मे महिन्यात पौर्णिमेला गोंदवल्याला जाण्याचा योग आला. आम्ही अनेकदा तिथे गेलो असलो तरी निषादचा हा पहिला मोठा प्रवास होता. प्रवचन, गीत रामायण आणि तिथल्या प्रसादाने मन तृप्त झाल्या शिवाय राहत नाही हा अनुभव जवळ जवळ सगळ्यांचाच आहे. आध्यात्म हि काही म्हातरपणाची सोय नसून खरतर ती आपल्या जीवन शैलीचा भाग बनवून आयुष्यातल्या वेगाला सामोरा जाण्याचं एक इंधन आहे असं मला वाटतं. सगळ्या कुटुंबासोबत केलेली ट्रीप अनेकदृष्ट्या खूप काही साध्य करणारी होती. साधेपणा आचरणात आणला तर कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याचं बळ मिळत हेच खरं आहे आणि हाच अनुभव तिथे वावरणाऱ्या प्रत्येक माणसाला पाहून मला नेहमी येतो. जमिनीवर राहण्यासाठी तेवढा अनुभव पुरेसा ठरतो. 

मे महिना सरून तशी पावसाची थोडी चाहूल लागली तशी त्याला शोधात फिरण्याची ऊर्मीही जागृत झाली. आज इथे, उद्या तिथे असं बरसणारा पाउस आपल्यावर कधी बरसेल हि आस लागून राहिली होती. आणि याच वेडातून घडल्या त्या पाबे घाट आणि बारामती च्या वेगवान आणि तितक्याच फ्रेश अशा बाईक राईड. पहाटे थोड्याफार गारव्याला सुरु होऊन दिवस मावळे पर्यंत संपणारे हे साधारण १५०/ २०० किमी चे छोटे अनुभव सुद्धा महिनाभर पुरेल एवढी तरतरी शरीरात भरून गेले हे मात्र नक्की. यात सगळ्यात जास्त भावलेला क्षण म्हणजे बारामती वरून परतताना पावसाच्या सरीने दिलेला सुखद धक्का. एकंच ढग दाटून यावा आणि त्याने बरसून आम्हाला चिंब भिजवावं आणि त्यातून आम्ही सावरे जणू काही घडलंच नाही असं दाखवून पुढे निघून जावं अशी लबाडी त्याने दाखवली होती. 



जुलै जसा उजाडला तसा बेत ठरला नाशिकचा, एका कौटुंबिक कार्यक्रमाला नाशिकला जावं लागणार होतं आणि मग भटकंती प्रिय परिवाराने तोच बेत अजून पुढे वाढवला आणि आमची मजल गुजरात मधल्या सापुतारा या थंड हवेच्या ठिकाण पर्यंत गेली. नाशिक मधेही काळा राम आणि गोरा राम मंदिरे, पंचवटी, रामघाट या गोष्टी एकदा पाहून याव्या अशा आहेत. निषाद साठी हि पुन्हा एकदा दूरची रोड ट्रीप आणि आमच्या साठी एक नवीन अनुभव होता. माझ्या ertiga च्या ७०० किमी च्या या कार प्रवासात खूप धमाल आणणारे काही क्षण होते अन काही केवळ डोळ्याने अनुभवण्याचे. आम्ही राहिलो तिथल्या रेसोर्ट समोर एक लेक होता पण पावसा अभावी तिथे फारसं पाणी नव्हत. पहिल्या दिवशी सकाळी उठून बाहेर बघताना धुकं पांघरलेला तो लेक, प्रचंड वाऱ्याने सळसळणारी झाडे आणि वरून वाहणारे ढग हे दृश्य केवळ अप्रतिम होतं. निसर्ग खरोखर अदभूत आहे तो याच साठी कारण वाहणारा वारा ठरवून वाहत नाही किंवा बरसणारी सर ती ठिकाण बघून बरसत नाही, निसर्गात मुळातच तो मुक्तपणा भरलेला आहे , साचे बद्ध गोष्टी माणसाने शोधून काढल्या आहेत आणि घड्याळाच्या शोधाने त्याला अगदी बंदिस्तच केलं आहे. त्यामुळे तासाने चालायची सवय लागलेल्या जीवाला तो मुक्तता लगेच अंगवळणी पडत नाही. 



जुलै मध्ये पुन्हा एकदा घडला तो एका अजून नव्या देशाचा छोटा पण वेगळा अनुभव. देश होता ब्राझील. कामा निमित्त घडलेला ४ -५ दिवसांचा हा प्रवास एखद्या भटक्या साठी पुरेसा होता. भारताशी बरेचसं साम्य असणारी तिथली भौगोलिक परिस्थिती, हवामान आणि लोकांची मानसिकता या जमेच्या बाजू मला आढळल्या. एवढं असलं तरी ब्राझील जागतिक पातळीवर वेगाने प्रगती करत आहेत हे नक्की. वेगाने बदलणारी शहरे हे त्याचीच द्योतक आहेत. तिथल्या माणसां बद्दल एक गोष्टी प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आयुष्याचा पुरपूर उपभोग घेणे, व्यक्ती स्वात्यंत्र, आनंदी वृत्ती आणि स्वतःच्या कामा बद्दल असलेली आत्मीयता. खुपश्या formalities मध्ये न अडकणाऱ्या तिथल्या संस्र्कुती मुळे परका माणूस तिथे लगेच रुळतो. तिथल्या माझ्या छोट्या वास्तव्यात “TAM” नावाच्या एका विमानाच्या musium ला भेट देण्याचा योग आला आणि पुन्हा एकदा जाणवलं ते पर्यटनाकडे कटाक्षाने लक्ष देणारी सरकारी यंत्रणा. तिथेही खासगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र याचा चांगला मेळ घातलेला दिसतो. 



ऑगस्ट मध्ये पावसाने पुनरागमन केलं आणि पावले वळली ती पुन्हा एकदा त्याच्या शोधात. या वेळी ठिकाण होतं चळकेवाडी , सातारा इथल्या पवनचक्क्या. पहाटे बाईक वरून सुरु झालेला प्रवास कास पठार, ठोसेघर, चळकेवाडी असा मजल दर मजल करत पवनचक्क्यांच्या एका अदभूत दुनियेत येऊन थांबला. प्रचंड मोठी पाती असणाऱ्या आणि वाऱ्याच्या शक्तीने फिरणाऱ्या खरतर घोंगावणाऱ्या पावनचक्या खरोखर चमत्कार वाटावा इतक्या भन्नाट दिसतात. नैसर्गिक शक्तीच्या माध्यमातून होणारी हि वीज निर्मिती वाखाणण्या योग्य आहे . चळकेवाडी ला अशा १००० पेक्षा जास्त पवनचक्क्या आहेत. आम्ही वर पोहोचलो तेव्हा डोंगर धुक्याने भरून गेलेला होता. आजूबाजूला पावनचक्क्यांचे खांब तर दिसत होते पण त्यांची पाती मात्र वर ढगात दडून बसलेली होती. ढग पुढे जाताच डोकावणारी पाती लपछपी खेळत असल्याचा भास मला झाला. निसर्ग खरोखर अजूनही आपल्या साठी गूढ आहे. मधून येणारी पावसाची सर, दाट धुके , हलका वारा, चिखलाने माखलेला रस्ता हे एखद्या भटक्याला आवडणारे दृश्य इथे होते आणि तोच क्षण या संपूर्ण ट्रीप मधला खरतर खरा भावलेला क्षण होता.


सप्टेंबर मध्ये बेत ठरला तो नाशिक जवळच्या “पट्टा” (विश्रामगड), रतनवाडी, भंडारदरा इथल्या भटकंतीचा. वेगवेगळ्या छोट्या इतक्या अनुभवांनी भारलेला हा प्रवास खरोखर साहसी होता. पुण्यातून रात्री ११ ला सुरु झाला प्रवास “पट्टा” ( विश्रामगड ) गडाच्या दिशेने. काळ्या मिट्ट रात्री रानावनातून, झोपी गेलेल्या गावातून, डोंगरातल्या नागमोडी रस्त्यातून आणि वर चांदण्या आकाशाच्या साक्षीने प्रवास घडला. पहाटे “पट्टा “ समोर दिसत असताना आमची वाट अडवली ती आडव्या गेलेल्या पाण्याच्या प्रवाहाने. मागे वळणं अशक्य आणि पुढे जाण अवघड अशा परिस्थितीत अडकलेलो असताना, शेवटी आजूबाजूचे दगड गोळा करून कार च्या चाकांना थोडा आधार मिळेल अशी सोय केली आणि धीर धरून माझी कार त्या पाण्यात घातली. आणि सुदैवाने हि बाहेरही आली. साधारण ९ ला पट्टा चढायला सुरुवात केली, वर पोहोचलं कि चारही दिशांना वेगवेगळे असे अप्रतिम दृश्य नजरेस पडत. वरून, “औढा” किल्ला दिसतो, दूर कळसुबाई, AMK, वितंडगड दिसतात. पट्ट्यावरून आम्ही निघालो रतनवाडीच्या अमृतेश्वर मंदिराकडे, भंडारदरयाला पोहोचून रतनवाडी कडे कूच केलं, साधारण तासाभराच्या प्रवासात दाट जंगलाच्यामधोमध गेलेल्या नागमोडी रस्त्याने तिकडे पोहोचलो. मंदिर फार सुंदर आहे. काळ्या पाषाणात कोरलेल्या रेखीव मूर्ती भूतकाळच्या खुणा अधोरेखित करतात. आजूबाजूला पसरलेलं अभयारण्य त्या सौंदर्यात अजून भर घालत. रात्रीची सोय म्हणून तिकडेच कॅम्पिंग साठी जागा शोधली आणि निसर्गाच्या कुशीत झोपी गेलो. थंडीमुळे दवाचे थेंब पाणी होऊन गवतांच्या पात्यांवरून झिरपत होते. जंगलातले अनामिक आणि गूढ आवाज मधेच लक्ष वेधून घेत होते. रात्र संपून पहाट झाली आणि आम्ही परतीचा मार्ग धरला. त्या मार्गावर रंधा falls हा महाराष्ट्रातला सर्वात उंच धबधबा पहिला आणि पाण्याच अजून एक रूप पाहिलं. ठरवून केलेल्या भटकंती पेक्षा थोडी जास्त मजा हि अनिश्तीतते मध्ये असते हे या भटकंती ने पुन्हा एकदा शिकवलं होतं. आलेले अनुभव केवळ दुर्मिळ होते आणि म्हणून ते जवळचे होते. स्वतःमध्ये डोकवायला असे अनुभव फार मोठी मदत करतात आणि आपल्या छोटे पणाची जाणीव करून देतात. 


ऑक्टोबर मध्ये पुन्हा एकदा ऐनवेळी ठरवलेला प्लान म्हणजे कोयना मधली भटकंती. ४५० किमी च्या ertiga प्रवासात असेच दुर्मिळ आणि चिरकाल टिकणारे अनुभव आले ते भैरवगड आणि कोयना / चांदोली अभयारण्या मधल्या जंगल सफारी मध्ये. अनेक डोंगर रस्ता नसलेल्या कच्च्या मार्गावरून जीप ने पार करत साधारण २ तासाच्या प्रवासानंतर आम्ही भैरावगडावरच्या मंदिरात पोहोचलो आणि थोडं जवळपासचा परिसर पायी चालून आजूबाजूच्या डोंगर रांगा पहिल्या. निषादसाठी हा ही अनुभव पहिलाच होता आणि साहसी हि. जाताना च्या प्रवासापेक्षा येताना चा प्रवास अजून थ्रिल्लिंग होता कारण दूरदूर पर्यंत पसरलेल्या मिट्ट काळोखात जीपच्या २ दिव्यांशिवाय कुठलाच प्रकाश नव्हता आणि आजूबाजूच्या दाट जंगलाने तो अनुभव अजून थरारक बनवला होता. साधारण दोन अडीच तासाच्या प्रवासाने आम्ही पुन्हा कोयना नगरला पोहोचलो. कोयना धरणाच्या भिंतीवरच्या दिव्यांना पाहत MTDC च्या रेसोर्ट वर पोहोचलो. संथ लयीमध्ये वाहणाऱ्या आजूबाजूच्या जीवानशैलीमध्ये आपण नकळत विरघळून जातो आणि तोच अशा भटकंतीचा परमोच्च क्षण असतो. 



नोव्हेंबर मध्ये घडला तो “beyond mountains“ सोबत कळसुबाई चा ट्रेक. सरळ, साधा तरीही चिरकाल टिकणारा अनुभव देणारा. १६४५ मीटर उंचीचा महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर ३५ लोकांनी पार केला आणि कधीही न विसरणारा क्षणांचे साक्षीदार झाले. वरून दिसणारं दृश्य शब्दात मांडणं खरोखर अवघड आहे. दमछाक करत जेव्हा माणूस वर पोहोचतो तेव्हा त्याला वर पोहोचताना पडलेल्या कष्टाचा विसर न पडेल तर ते नवल आहे. कधी कधी काही गोष्टींचा आपण फक्त साक्षीदार असतो तर कधी आपण त्याचा एक भाग बनतो. इथे मात्र दोन्ही अनुभवायला मिळत आणि ते हि एकाच वेळी. इतक्या उंचीवर पोहोचल्यावर आपण जणूकाही त्या शिखाराचाच भाग बनतो तर दुरून पाहताना आपण प्रेक्षकाची भूमिका बजावत असतो. 

नोव्हेंबर मध्ये अजून एक भटकंती झाली ती म्हणजे माझ्या आवडत्या समुद्र किनाऱ्याची, दापोली ची. ५५० किमी च्या या प्रवासाने मन तृप्त केले. आंबा,काजू,सुपारी च्या वाडी मध्ये असलेलं होम स्टेचा लोकेशन, रुचकर जेवण ,बीच वरची मऊ रेती या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जणूकाही थांबलेले घड्याळाचे काटे. रेंगाळणारा दापोलीचा अनुभव हे नेहमीच माझ्या साठी एक हवाहवासा अनुभव असतो. तो या वेळीही सार्थ झाला. आपण जेवढे निसर्गाशी एकरूप होतो तेवढ जगणं सोपं होतं. मला वाटतं समुद्र खरतर नेहमी बोलत असतो आपण जर लक्ष देऊन ऐकलं तर त्याची साद नक्कीच ऐकू येते. झेपावणाऱ्या लाटा किनाऱ्याला भेटून काय म्हणत असतील असं विचार केला कि त्यांचा संवाद मनात आपोआप उमटतो. पुढच्या वर्षी उन्हं नक्की यायचं पक्का केल्या शिवाय इथून पाय निघत नाही आणि तसं ठरवूनच आम्ही तिथून माघारी आलो. 




डिसेंबर मध्ये घडला तो हरिश्चंद्रगड चा ट्रेक. Beyond mountains च्या या ट्रेक च थोडक्यात वर्णन करायचा असेल तर मोजक्या शब्दात अस म्हणता येईल कि मुळात भटक्या असलेल्या जीवांना मनमुराद, मनसोक्त आणि तेवढीच जाणीवपूर्वक घडवून आणलेली एक सुंदर सफर.
वर्षातला शेवटचा ट्रेक असल्याने सगळ्यांचा उत्साह तितकाच दांडगा होता. मजलदरमजल करत कुठल्याही अडथल्याशिवाय सगळे वर पोहीचलो आणि मंदिरात जेवण उरकलं. थोडी तरतरी आल्याने पाय कोकणकड्या कडे निघाले आणि जवळ येताच त्याने सादही घातली. पण आधी राहण्याची सोय लावून मग तिकडे धाव घेतली.
संध्याकाळचा सूर्यास्त सुरेश वाडकरच्या "सुरमई शाम" ची आठवण करून देत नकळत डोळे पाणावत होता .कोकणकडा वाऱ्याशी कुजबुजत होता आणि वारा जणू त्याच्या मनीचा गुज आम्हाला वर येऊन स्पर्शातून सांगू पाहत होता. क्षितिजावरचे रंग डोळे लवताच बदलत होते आणि त्या अथांग आकाशातल्या चांदण्या हळूच डोकं वर काढून डोळे मिचकवत होत्या.
जशी रात्र झाली तसा चंद्र डोंगरामागून वर आला आणि जमीन चांदण्या प्रकाशाने भरून गेली. जणू चंद्राला पाहून वेडा पिसा होऊन वारा रौद्र वाटावा इतका जोराने वाहू लागला.
मंतरलेली रात्र संपली आणि कोवळ्या उन्हाने पुन्हा कोकणकडा न्हाऊन निघाला.
आयुष्यातले असे क्षण क्षणिक असले तरी सोनेरी असतात आणि आपण फक्त त्याचे साक्षीदार असतो. सरत्या वर्षाला मागे सारताना सर झालेला हरिश्चंद्रगड चिरकाल लक्षात राहील यात शंकाच नाही.




वर्षभराच्या भटकंतीवर नजर फिरवली तर मन आनंदी होतं पण मग त्याची भूकही अजून वाढते. भटक्या जीवाला अजून खूप काही पहायचं. दडलेल्या वाटा, सुटलेले रस्ते, अतृप्त किनारे, गूढ जंगले आणि त्यातले अनामिक आवाज, नवे डोंगर आणि त्याची खुणावणारी शिखरे. कदाचित हीच भटकंती नवीन पायवाटा शोधेल आणि जन्म देईल नव्या कुणीहि न स्पर्शिलेल्या गूढ अनुभवांना जे चिरकाल टिकतील आणि अनेक वर्ष मला जागं ठेवतील, नव्या क्षणांच्या शोधात. 
भटकंती हि सुद्धा खरतरं एक भाषा आहे, संवादाचं साधन आहे असं मला नेहमी वाटतं. भटकंतीच्या याच भाषेनं आज पर्यंत खूप लोक जोडले गेले आहेत आणि अजूनही जातील.
शेवटी कुणीतरी म्हणून ठेवलंच आहे “Sooner or later we must realize there is no station , no one place to arrive at once and for all. The true joy of life is in trip.
शेवटी मग भटकंती करतानाचा हा आनंद लुप्त होऊ न देता ती तहान वाढवत राहणं हे एवढाच हाती उरतं.
आणि म्हणूनच Its always good to be lost in right directionJ). कारण हरवलं तरच खरं तर नवीन काहीतरी गवसतं. आणि तीच तर आपली शिदोरी आहे. पुढच्या वर्षी असेच अनुभव येतील आणि ते जमतील तसे शब्दात बंदिस्त करायचा संकल्प करून इथेच थांबतो.



                                                                                                   ३१ डिसेंबर २०१५
                                                                                                   इति आनंद

Monday, November 9, 2015

अंगणात माझिया तव प्राजक्त उमललेला



निषाद, सप्त सुरातला सातवा सूर. वरचा “ नि “. अर्थात आमच्या घरातला नवा स्वर. 
आमच्या घराचा श्वास, जो प्रत्येकाला स्पर्शून जातो , वाऱ्या बरोबर गंधाने प्रवास करावा तसं काहीसं आम्ही करत राहतो. दिशा, वेग याचं भान सोडून फक्त वाहत राहतो. हाच कोवळा जीव घरात येऊन आता वर्ष उलटून गेलंय पण तरीही पहिल्या दिवसापासून आता पर्यंतच्या आठवणी तितक्याच ताज्या आहेत. जणू काही परवा सगळं घडलं आहे इतक्या आणि तेच स्मरण करताना त्याच्या जन्माच्या पहाटे पासून आतापर्यंत च्या आठवणी कवितेच्या रूपाने व्यक्त झाल्या आणि इथे त्या सादर केल्या आहेत.  
निषाद आमच्या साठी प्राजक्ताचा सडा आहे. ज्याने आमचा अंगण भरून टाकलंय, पहाटे कोवळ्या फुलांनी पांढरी शुभ्र नक्षी काढावी तसं काहीसं. प्राजक्ताचं फुल आपणहून अंगणात झेप घेतं आणि एकामागून एक अशा सगळ्या फुलांचा सडा अंगण भरून टाकतो. असंच एक फुल आमच्या अंगणात नव्हे ओंजळीत आलंय निरागस, कोवळं आणि तितकंच लोभस.


होती पहाट वेडी आतुर शुक्र तारा ,
गंधाळूनया झुरे तो, पुन्हा उनाड वारा
वेड्या त्या जीवाची, झाली उगाच दैना
अंगणात माझिया तव प्राजक्त उमललेला....!

नव्हतास तू जगी या , होती चाहूल घराला ,
क्षण एक एक होता, आतुर त्या घडीला,
बहरे वसंत पुन्हा तुझियाच स्वागताला ,
अंगणात माझिया तव प्राजक्त उमललेला....!

तुझिया त्या स्वरांनी, नांदी नव्या सुरांची
स्वप्ने नवीन पुन्हा, गुंफून पापण्यांची ,
स्पर्शून त्या जीवाला, आनंद भारलेला
अंगणात माझिया तव प्राजक्त उमललेला....!

छेडीले नाद जेव्हा कोवळ्या पावलांनी,
हाकेस साद तुझिया अनामिक शब्दांनी,
स्मृतीतुनी तरंगे राग ऐकलेला,
अंगणात माझिया तव प्राजक्त उमललेला....!

छोटया मुठीत तुझिया स्वप्ने गुंफलेली
कोवळ्या नजरेतुनी तू व्याकूळ शोध घेई,
खट्याळ त्या खळीचा संकेत ना कळाला
अंगणात माझिया तव प्राजक्त उमललेला....!

हास्यात तुझिया मिळे अर्थ जीवनाचा
येता कुशीत माझ्या, कल्लोळ भावनांचा
बरसुनी अतृप्त तरीही मेघ भारलेला
अंगणात माझिया तव प्राजक्त उमललेला....!

आनंद

30 नोव्हेंबर २०१५


Sunday, September 20, 2015

तोच पाउस..

पाउस नेहमी वेगळा असतो. पावसाळा सुरु झाला तेव्हा त्याच रूपड़ खुप हवाहवास आणि एखाद्या खेळकर मुलासारख होत. या वेळेस जसजसा पावसाळा पुढे सरकत होता तसतसा तो मनाची धास्ती वाढवत होता. दुष्काळ समोर फेर धरून नाचू लागला आणि तोच पाउस दुष्ट वाटू लागला. त्याने दिलेली हुलकावणि ही एक अतिशय क्रूर चेष्टा झाली. शेतकरी हवालदिल झाला. झाडाला नव्या पालवी च्या ठिकाणी प्रेत दिसू लागली. शहरे एकीकडे सण साजरे करत  असताना दूसरीकडे मात्र माणस जीव गमावू लागली. यातच तो पुन्हा बरसला तोच पाउस...
नदयाना पुर आले, डोंगर हिरवे झाले आणि शेत डोलू लागली पण त्याच्या त्या शिडकाव्याने गेलेली माणस परत आली नाहीत आणि येणार ही नाहीत. पण तरीही पाउस अजुनही तोच आहे आणि तोच राहिल..


Monday, August 31, 2015

एकांत

एकांत

दाटलेल्या ढगांना
आतुर अशी किनार
आठवांच्या थेंबांना
मातीचा हुंकार

मनातून उमटलेला
कोवळा स्वर
निळ्या पाण्याचा
गहिरा तळ

धूसर पहाटेला
फांदीवर चा पक्षी
अदृश्य आकाशाला
सोनेरी नक्षी

केसरी कातरवेळेला
दिव्यांची आरास
अंधाराच्या साथीला
स्वप्नांचा प्रकाश

स्वप्न की सत्य
याचीच भ्रांत
अनमोल क्षणांचा
दुर्मिळ एकांत
 
                             आनंद

Friday, July 31, 2015

लघुकथा : सांज सर


दुपारची उन्हं आता उतरू लागली होती. पावसाळा सुरु होऊन बरेच दिवस झाले असले तरी म्हणावा तसा पाऊस सुद्धा झाला नव्हता. वारा सुद्धा एकटा पडून कंटाळला असावा म्हणून त्याचाही आवाज हल्ली कमी होता. पण आज मात्र हवा वेगळी होती. पावसाची चाहूल देणाऱ्या त्या हवेला वेगळाच गंध येत होता. पक्षी किलबिल करत असतानाच रस्त्यावरून मातीची धूळ उडवत एखादी गाडी इकडून तिकडे गेली आणि रमा चमकली. अजून तर बाहेर पडायला बराच अवकाश होता पण तिला उगाच उशीर झाल्या सारखं वाटलं. हातातलं काम पुन्हा सुरु करून ती खिडकीतून बाहेर बघत राहिली. तिकडे मंदिरात आरतीची तयारी सुरु होती. वारा पुन्हा पुन्हा कुठून तरी तो पावसाचा गंध घेऊन येत होता. तिन्ही सांजेचे दिवे लवकरच लागणार होते. शेतातली गुरं परतीला लागली होती आणि घुंगराचा आवाज करत आपापल्या गोठ्यात परतत होती. कुठे कट्ट्यावर गप्पांचा फड रंगला होता तर कुठे हापश्यावर बायका बडबड करत होत्या. पोरं लंगडी, गोट्या तर कुठे लपाछपी खेळण्यात मग्न होती.  रमासाठी जसा हा खूप मोठा दिवस तसच रमेश साठीही होता. रमाचं काम संपल आणि तिला संध्याकाळचे वेध लागले. इकडे रमेशचं कपड्याच्या दुकानातलं काम आवरण्याच्या नादात त्याचं लक्ष किती वाजले या कडे नह्व्ताच पण तरीही तो मध्ये मध्ये घड्याळाकडे पाहून सुटकेचे निश्वास टाकत होता.


आता अंधारून यायला लागलं होतं. संधिप्रकाश नाहीसा होऊ लागला होता. काळे ढग जणू काही वरून खाली चाललेली गलबल वरून पाहत होते. पाउस कोसळणार हे तर पक्का झालं होतं. येणाऱ्या पावसाचं स्वागत किलबिल करणारी घरं करत होती. कुठे वाळलेले कपडे काढण्याची, कुठे गोठ्याला पत्रे लावायची, कुठे छप्पर झाकायची तर कुठे गुरांचा चार झाकून ठेवायची गडबड चालू होती.
रमा संधी साधून बाहेर पडली. कुणी पाहत नाही याची खात्री करून तिने मागच्या गल्लीतून सुटका करून घेतली. भरभर पाऊले उचलत ती रानाच्या दिशेने चालली. आजूबाजूचं जग वेगळ्या सप्तकात आणि रमा वेगळ्या वेगळ्याच सुरांवर स्वार होऊन निघाली होती. मनात धडधड असली तरी ती तितकीच खंबीर होती. आपण करतो आहोत ते बरोबरच आहे याची पक्की जाणीव तिला होती.
 तिकडे रमेश कामावरून सुटला होता. घरी जाऊन तो हि काही निमित्त काढून बाहेर पडला. गावाच्या वेशीकडून रानाकडे निघाला. आता आकाश गडगडू लागलं होतं कुठल्याही क्षणी जोराची सर कोसळेल असं वाटत होतं. पडलेल्या मंदिरापाशी रमेश पोहोचला. इकडेतिकडे पाहिलं तर मागेच रमा पाठमोरी उभी असलेली त्याला दिसली. तो त्या दिशेने वळताच तिला त्याची चाहूल लागली. दोघांनी एकमेकांकडे बघून स्मित केलं. पुढच्याच क्षणी दोघे समोरच्या डोंगराकडे चालू लागली होती. झपझप चालणारी पाऊले आणि दारावर येऊन थांबलेला पाउस यांच्यात जणू काही करार झाला होता. अजूनही एकही टिपूस कोसळला नव्हता पण आकाश मात्र गच्च भरलं होतं. हळूहळू डोंगराची चढण आली. आता पूर्ण अंधारून यायला काही क्षण उरले होते. रमेश ने एका झाडाखाली थांबून कंदील पेटवला. आणि दोघे पुन्हा चालू लागली. रमाच्या हातावर हलकेच पाण्याचा एक थेंब कोसळला. ती शहारली पण पुन्हा चालू लागली. आता डोंगर बराच सर झाला होता. थोडं पुढे जाताच गाव नाहीसं होणार होतं आणि पुढची उतरण लागणार होती. तोच वीज कडाडली आणि मेघ गर्जना होऊन ढगाचा बांध फुटला. जोराची सर कोसळली. पश्चिमेला सूर्य मावळलेल्या जागेवर नुसताच पुसटसा प्रकाश दिसत होता. पाण्याने विझवलेल्या दिव्याच्या वाती सारखा  तो हि हळूहळू नाहीसा होणार होता. सांजवेळ असली तरी या सरीने त्या क्षणाला वेगळंच परिमाण दिला होतं. रमा आणि रमेश भिजू लागले. काही पावलांवर डोंगराची चढण संपत होती. दोघांनी एकमेकांकडे पहिला. एव्हाना पानांवरून थेंब जमिनीवर उड्या घेऊ लागले होते. टपटप पडणाऱ्या थेंबानी पणे नाचत होती.


रमा आणि रमेश दोघे आता मुक्त होती. सरीने वातावरण बदलवून टाकलं होतं. एकदाच दाटून आलेला कंठ रमाने गिळून टाकला. घर सोडून आपण रमेश बरोबर पळून आलोय अशी जाणीवच मुळात तिला होत न्हवती. आणि तिकडे रमेश सुद्धा याच विचाराने आनंदी होत होता. सांज वेळेला आलेल्या सरीने संध्याकाळच्या सुस्तीला पार उडवून लावला होतं. अंधार त्या हवेतल्या गार हवेला बिलगला होता. आता सकाळ पर्यंत त्याला साथ मिळाली होती. पाउलवाट ओली झाली होती आणि त्यावरची पाउले कधीच पुसून गेली होती. उद्या नव्या दिवसाची सुरुवात  होणार होती. दोघे आता उतरणीला लागली होती. हातातल्या कंदिलाने वाट दिसत होती. थोड्याच वेळात रस्ता लागला आणि शेवटची सुटणारी बस समोर उभी असलेली दिसली. दोघे आनंदली. खिडकीतून बाहेर बघताना रमा पावसाचे आभार मानत होती. सांज सरीने तिचे अश्रू पुसले होते आणि जगण्याची नवी दिशा दाखवली होती. रमेश ने तिचा हात हातात घेतला तिला हायसं वाटलं.  आता सरलेल्या भूतकाळा पेक्षा येणारा प्रत्येक क्षण तिला नवा विश्वास देत होता.
पाऊस नवे क्षण रुजवतो हेच खरं मग ते काळ्या जमिनीत किवा कोवळ्या मनात , भविष्याची नांदी होते हे मात्र खरं.

आनंद
३१ जुलै २०१५




  

Sunday, May 31, 2015

शब्दविन संवादू

नुकताच परक्या देशातून परत भारतात आल्या मुळे एका नव्या संस्कृतीची ओळख थोडीफार का होइना झाली होती. या वेळी परका देश चीन असल्यामुळे भाषा हा मोठा अडसर ठरणार होता. जाण्या आधी हीच धास्ती होती. संवादामुळे विचाराचि देवाण घेवाण होते पण इथे तोच दुवा कमकुवत होता.  तिथे पोहोचल्या नंतर सुद्धा हा समज अजुन दृढ़ झाला. कारण इंग्लिश येणारे 1-2 जण सोडले तर बाकि सगळा दुष्काळच होता.  हळुहळू दिवस जाऊ लागले आणि शब्दाविना संवादू असा काहीसा प्रकार जमू लागला. 

मग ते ऑफिस मधले सहकारी असोत किंवा सुपर मार्केट मधला स्टाफ किंवा रस्त्यावरच्या फ़ास्ट फ़ूड च्या गाड़ी वरचं चायनिज जोडपे किंवा मी रहायचो तिथल्या होटल मधले कर्मचारी किंवा आइसक्रीम च्या दुकानातला पोरगा किंवा फ़ॉरेस्ट मधे चित्रकला काढणारया मुली किंवा yello mountain ला ट्रेकिंग ला आलेली फॅमिली किंवा ऑफिस मधल्या सहकारी मित्राचा मित्रांचा ग्रुप असो किंवा टैक्सी ड्राईवर असो कुठेही  शब्द अडसर ठरत नव्हते.
ऑफिस मधल्या सहकार्यां बरोबर तर एक प्रकारचा बॉन्डिंग तयार झाला आणि पुढे तर ते मैत्रीत बदलला.  बोलताना नेमके शब्द सापडले नाहीत तरी केवळ काही गोष्टी गृहीत धरून एकमेकांना  समजुन घेउन संवाद पुढे चालू राहु राहात होता.

या सगळ्यात हे मात्र खरं होतं की शेवटी व्यक्त व्ह्यायला भाषा हा माणसाने बनवलेल एक साधन 
आहे. . मनातले विचार शब्द बद्ध करून ते मांडणे आणि समोरच्याचे शब्द ऐकून त्याचा अर्थ लावणे ही क्रिया आपल्याला येणारया मात्रूभाषेत बोलताना इतकी सहज होते ती कळुनही  येत नाही.
आणि नेमका याच्या उलटी गोष्ट परक्या भाषेला सामोरा जाताना होते.
त्या मुळेच मला वाटणारा भाषेचा अडसर मोठा वाटत होता, पण प्रत्यक्षात ही खरतर संधी होती एका नव्या अनुभवाला सामोरा जाउन तो आत्मसात करण्याचीहे मला ज्या क्षणी जाणवल तेव्हा पटल की माणस जोडायला शब्द धावून येत नाहीत तर तिथे मुळात संवादाची तीव्र इच्छा कामी पडते

भाषा ,धर्म ,संस्कृति हे सगळच खरतर तस मेनमेड आहे , खरं आणि शाश्वत आहे ते न दिसणार पण सतत साथ देणारा भावनांच अदृश्य आवरण जे माणसाला जागं ठेवून आहे.
नाती किंवा संबंध जोडले जातात ते प्रथम आतून जेव्हा माणसाला शब्दांची  ओळख सुध्हा नसते. म्हणुनच लहान बाळ आपल्या सभोवतालच्या माणसांशी बंध जोडू शकतं. भाषा शब्द काहिहि नसले तरीही तो धागा मात्र हळुहळु घट्ट होत असतो. 



माणसाला माणसाची ओळख पटली की शब्द फ़क्त मनातल्या भावनांचे वाहक ठरतात. 
आईच्या मनातलं ओळखुन मुलाने केलेली कृति , नवरा बायकोने  मनातलं ओळखुन एकमेकांची जपलेली मने, न बोलता मंदिरात जोडलेले हात ,मित्रां सोबत डोळे भरुन पाहिलेला सूर्यास्त , पहिल्या पावसाला पाहून अंगावर आलेला शहारा तर कधी निरागस हास्य पाहून मनात उमटलेल्या लहरीएखादं बक्षिस मिळाल्यावर वडिलांनी न बोलता पाठीवर दिलेली दाद ,म्हातारया आज्जिचा हात हातात घेउन घालावलेली संध्याकाळ , असे आणि अजुन खुप सारया  संवेदना ,भावना शब्दविन संवादू याच प्रकारात मोडतात आणि आपल्याही न कळत आपण ते अनुभवत असतो.
जगण्याचा समतोल खरं तर कदाचित अशा गोष्टीनेच टिकून राहत असावा कारण न बोलता केलेल्या कृतीच चिरकाल स्मरणात राहतात.
शब्द कधी सुख देतात , कधी सांत्वन करतात , कधी वार करतात पण जेव्हा निरुपयोगी ठरतात तेव्हा सगळ्यात जास्त संवाद साधत असतात हे कळलं की शब्दविन संवादू याचा खरा अर्थ उमगतो.

                                                                    आनंद 
                                                                    ३१ मे २०१५ 

Thursday, April 30, 2015

लग जा गले

लग जा गले  हे मदन मोहन आणि लताचं गाणं माझं सगळ्यात आवडतं गाणं. अगदी हजारो वेळा ऐकून सुद्धा पुन्हा पुन्हा ऐकावं वाटणारं असं हे गाणं. फावल्या वेळात ते आपल्या आवाजात रेकॉर्ड करायचा मोह मला आवरला नाही आणि त्यातून घडला विडीओ. खूप दिग्गज लोकांची हि कलाकृती गाणं हि खूप मोठी गोष्ट आहे, मला ते फारसं जमलंय असं अजिबात नाहीये पण तरीही एक चाहता म्हणून माझ्याकडून हा प्रयत्न.

समुद्राच्या लाटांचा आवाज यावा आणि रात्रीच्या चांदण पसरलेलं असावं आणि त्याच समुद्राने आर्त हाक मारून लाजऱ्या रात्रीला बोलवाव आणि म्हणावं “लग जा गले” . कारण दुसऱ्या दिवशी दिवस होताच तीच अस्तित्व नाहीसं होणार आहे . असं काहीसं चित्र हे गाणं ऐकलं कि माझ्या नजरे समोर उभं राहत. आर्त हाकेचा जणूकाही परिपाठ असल्या सारखे ,असे एक एक शब्द या गाण्यात लिहिले आहेत. 

                                                               
                                                               आनंद
                                                               ३० एप्रिल २०१५ 

Tuesday, March 31, 2015

दूर देशी चाललेला बाप


घरात ४ महिन्याचा निषाद ,त्याच्यात अडकेला माझा जीव आणि मला कामासाठी बाहेरच्या देशातल्या कंपनी मध्ये कामासाठी आलेलं बोलावणं या कात्रीत मी सापडलो आणि मनाची नुसती घालमेल सुरु झाली. तब्बल ४५ दिवस कसा राहणार होतो मी या कल्पनेनेच डोळ्यात पाणी तरळत होतं. सुरुवातीच्या या महिन्यांमध्ये प्रत्येक दिवशी काही नवीन शिकणाऱ्या आणि आम्हालाही नवीन काहीतरी शिकवणाऱ्या त्या छोट्या जीवाला पाहताना श्रावणातल्या सरी सारखं आनंदाने खळाळणारं माझं मन दूर जावं लागणार या जाणीवेने एकदम वादळाच्या तडाख्याने हिरमुसलेल्या रानासारखं कावरं बावरं झालं. जाण्याची तारीख जशी कळली तसं प्रत्येक क्षण त्या चिमुकल्या जीवाबरोबर घालवावा असाच वाटत होतं पण कामाच्या लोड मुळे तेही शक्य होत नव्हतं. एकंदर काय मी आणि माझं मन शिडाच्या होडी सारखं हेलकावे खात होतो. 

या सगळ्यात सगळ्यात मोठी खंबीर साथ होती ती माझ्या बायकोची म्हणजेच स्वातीची आणि माझ्या आई ची. घर घरातल्या बायकांमुळे उभं राहता आणि बाहेरच्या अथांग आकाशाशी नातं जोडायला आपल्याला बाहेर पडता येतं हे त्रिवार सत्य आहे. हाच जोडणारा दुवा मला दोघींच्या रूपाने मिळाला होता. सुरुवातीला मला जावं लागणार हि बातमी समजल्यावर  कदाचित (...नव्हे पक्कच..! ) त्यांनाही वाईट वाटलंच असणार, त्यांच्याही मनाची घालमेल झालीच असणार पण त्याची थोडीही जाणीव न होऊ देता त्या दोघी फक्त मला सांभाळू पाहत होत्या. स्वतःला प्रचंड भाग्यवान समजण्यासाठी एवढं कारण सुद्धा पुरेसा व्हावं आणि स्वतःचाच हेवा वाटावा इतकी हि गोष्ट माझ्यासाठी मोठी होती. हे असं सगळं आजूबाजूला घडत होतं आणि मी माझ्या मनाची तयारी करू पाहत होतो. 

जाण्याआधी अजून एक असाच अनुभव आला तो चक्क न्हाव्याकडे. एका रविवारी असाच कटिंगला गेलो आणि केस कापणाऱ्या पोराशी बोलत असताना कळला कि तो फार खुश आहे कारण तो बरोबर एका महिन्याने घरी जाणार आहे. माझी उत्सुकता वाढली म्हणून घरची चौकशी केली तेव्हा तो म्हणाला साहेब घरी बायको आहे आणि एक वर्षाचा मुलगा. वर्षातून २ वेळा घरी जातो. वडील घरी जाऊ देत नाहीत कारण इथे धंदा बुडतो. अजून एक महिन्याने मुलाला भेटेन म्हणून खूप आनंद झाला आहे. मी फक्त ऐकत होतो. पुढे तो बोलत राहिला पण मी अलीकडेच  अडकून पडलो आणि मला पुढचं काहीच ऐकू आला नाही. तो आणि मी एकाच समुद्राच्या लाटांवर स्वार होतो , फरक एवढाच होता त्याची लाट त्याला किनाऱ्याला घेऊन जाणार होती आणि माझी मात्र किनाऱ्यावरून परतून दूर चालली होती. घरी जायला मिळणार म्हणून त्याला खूप आनंद झाला होता आणि मला दूर जावं लागणार म्हणून दु:ख. आयुष्यात प्रत्येक वळणावर नवा अनुभव उभा असतो याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला, तो मी माझ्या शिदोरी मध्ये टाकला.
काही लोकांच्या ठाई  कदाचित माझ्या दु:खाला काही किंमत नव्हतीही  किवा पुरुष आहे म्हटल्यावर घरासाठी कष्ट घ्यावेच लागतात किंवा कष्टाशिवाय फळ मिळत नाही नाही , वगैरे उपदेशात्मक वाक्येही कुणी ऐकवली पण मला त्याने फरक पडला नाहीच आणि पडणारही नव्हताच. पुरुष असूनहि आपल्या मनातल्या भावना मोकळे पणाने घरातल्या लोकां समोर व्यक्त करता येत होत्या याचं जास्त समाधान होतं. मुळात भावना व्यक्त करायलाही स्त्री आणि पुरुष असं भेदभाव म्हणजे करणं म्हणजे मला हवेतला ऑक्सिजन घेताना स्त्रीलिंगी ऑक्सिजन आणि पुल्लिंगी ऑक्सिजन असा भेदभाव केल्या सारखं वाटतं. 
अश्रू खरतरं सामर्थ्याचं प्रतिक असू शकतात कारण ते बाहेर पडण्यासाठी आत हिम्मत असलेलं मन असावं लागतं.  अर्थात मी इथे लिहून उद्या पासून तो समज पुसून टाकला जाणार आहे असं मुळीच नाहीये त्यामुळे हा विषय इथेच सोडलेला बरा , असो...!

जाण्याचा दिवस उजाडला तेव्हा खरतरं काही समजेनासं झालं होतं पण शेवटी मनाचा निर्धार केला मन घट्ट केलं. बाहेर पडण्याआधी झोपी गेलेल्या माझ्या चिमुकल्या निषादला डोळे भरून पाहून घेतलं. झोपेतून उठल्यावर रोज समोर येणारा चष्मा घातलेला बाबा समोर येणार नाही आणि कडेवर घेऊन फिरवणार पण नाही याची किंचितही जाणीव नसलेल्या त्या निरागस जीवाला पाहून मन गलबलून गेलं. तशाच अवस्थेत घर सोडलं आणि निषाद चा हा बाबा दूर देशी निघून आला.

आई बापाला मुलं म्हणजे सर्वस्व असतात हे जरी सत्य असलं इवलाश्या कोवळ्या  जीवाने लावलेली ओढ , संपूर्ण घराला दिलेला नवा आकार, नात्यांमध्ये भरलेलं नवा रंग या सगळ्याच मला खूप अप्रूप वाटतं आणि हे सारं कुठल्यातरी अनामिक शक्तीने भारलेलं आहे असं वाटत राहत. हे असे लहान कोवळे जीव मला सकाळच्या कोवळ्या किरणांसारखे भासतात. निरागस आणि पारदर्शी. पहाटेची किरणं खूप हळुवार येतात पण सारी श्रुष्टी त्याने जागी होते ,पक्षी किलबिलाट करतात, पाती वाऱ्याने डुलतात, पाणी कोवळ्या उन्हाने चकाकतं आणि हे सारं आपसूक घडतं.  
लवकरच हे विरहाचे दिवस संपतील आणि आयुष्याच्या अजून एका वळणावर सुखाची लकेर उमटेल हा विश्वास आहेच फक्त गरज आहे काळाचे काही अजून थोडे क्षण उलटण्याची.  

        "निषाद" चा बाबा 

         ३१ मार्च २०१५