Powered By Blogger

Sunday, March 27, 2011

मला भेटलेल्या वाटा – भाग १


 

सरळ वळण हा लेख लिहिला तेव्हा पासून मनात विचार येत होता कि वळणं ज्या रस्त्यावर असतात त्या वाटां बद्दल काहीतरी लिहिलं पाहिजे. शेवटी वळणांना अर्थ येतात तेच मुळी वाटां मुळे. कधीतरी अचानक समोर येऊन ठेपणारी वळणं जेवढी लक्षात राहतात तेवढ्याच त्या वाटा राहतातच असं नाही.
आज वर फिरताना ज्या ज्या वाटा मला भावल्या त्या वाटा पुन्हा आठवल्या आणि नेहमी प्रमाणे मी काढलेले फोटो पुन्हा मदतीला धावून आले. याच सगळ्या वाटा आणि त्यांच्या मागे दडलेले आपल्या आयुष्याशी जवळीक साधणारे त्यांचे रंग, भाव आणि मुख्य म्हणजे त्याच वाटांवरची सरळ वळणे यांचा मला गवसलेला अर्थ.

धावत्या वाटा :

 
महामार्गावरच्या धावत्या वाटा मला नेहमीच एखाद्या राज मार्गाप्रमाणे भासतात. स्वतःच्या वेगाचा अभिमान बाळगणाऱ्या आणि प्रसंगी गर्वही करणाऱ्या या वाटा मात्र प्रत्येक प्रवासात भेटतच राहतात. त्यावर सुसाट वेगाने धावणारी वाहने आणि त्या मधली त्या राज मार्गावर खुश असलेली माणसे हि मला तेवढीच भाग्यवान वाटतात. अशा या वाटा मात्र प्रत्येकाच्याच नशिबात नसतात, कारण या वाटांना जोडणारे रस्तेच काहींच्या आयुष्यात नसतात. अशा वेळी मात्र दूर वरून या वाटांना पाहणं एवढाच हाती उरतं. आपल्या आयुष्याशी तुलना केली तर हेच दिसून येतं धावती आणि वेगवान आयुष्य प्रत्येकालाच मिळत नाही. पण ते मिळालं नाही म्हणून काही संथ वाटांवरून जाणारे काही कमनशिबी ठरत नाहीत, कारण या धावत्या वाटांवरून जाताना एखादी चुकसुद्धा सगळं उध्वस्त करू शकते आणि नेमका हेच न कळल्यामुळे अनेक आयुष्य सुरु होण्या आधीच संपतात आणि मागे सोडून जातात याच धावत्या वाटांवरचे डागाळलेले अनुभव. म्हणूनच प्रसंगी हतबल झालेल्या या वाटा मला खूप एकाकी वाटतात आणि त्याचं एकसुरी आयुष्य हे एखाद्या पिंजऱ्या सारखं बंदिस्त....!

नागमोडी वाटा :
 
वरच्या फोटो मधली डावीकडची वाट हि रायरेश्वर ची आहे तर उजवी कडची वाट हि चिखलदरा येथील. डोंगरामधून धावणाऱ्या या नागमोडी वाटा मला भावतात ते त्यांच्या अनिश्ततेमुळे आणि त्यांच्या पुढंच वळण दडवून ठेवणाऱ्या खोडकर वृत्ती मुळे. स्वताच्या मनाप्रमाणे हवा तिथे वळण घेणाऱ्या या वाटा मला खूप स्वावलंबी आणि स्वतंत्र वाटतात. आजूबाजूच्या झाडाझूडपाना या वाता हव्या हव्याश्या वाटत असाव्यात असं वाटतं. कारण या वाटांच्या वळणांप्रमाणे ती झाडेही स्वतःला सावरून घेतात. या नागमोडी वाटा प्रत्येकाच्याच आयुष्यात कधी न कधी येतातच आणि या वाटेच्या वळणावर आल्यावर माणूस गोंधळतो , पुढचं वळण कसं असेल याचा विचार करतानाच कधी अचानक एखादा सुखद धक्का मिळतो तर कधी तो अनुभव भाम्बावाणारा ठरतो. म्हणूनच स्वतः बरोबरच इतरांचं जगणं बदलवण्याऱ्या या वाटा मला आयुष्यातल्या एका न उलगडलेल्या कोड्या प्रमाणे भासतात.  

 
जंगल वाटा :

 
मेळघाटातल्या जंगलातल्या या वाटा माझ्या सगळ्यात आवडत्या वाटा आहेत. आजूबाजूच्या जंगलाच्या सोबतीने हातात हात घालून चालणाऱ्या निरागस अशा या वाटा स्वतःच्याच धुंदीत बागडणाऱ्या छोट्या मुली सारख्या वाटतात. आजूबाजूच जंगलच या वाटेची काळजी घेतं असं भासतं.
जेव्हा मी पहिल्यांदा या वाटांवरून गेलो तेव्हा या वाटांवरून जाताना झाडांच्या पानांची सळसळ हि जणू काही माझं स्वागतच करत होती. फांद्यावर बसलेली पाखरं स्वतःच्याच धुंदीत चिवचिव करत गाणी गात होती. गर्द झाडीमधून डोकावणारं निळ आकाश सुद्धा जणू काही या जंगलवाटे कडे डोकावून पाहत असल्या सारखं क्षणभर मला जाणवलं. कदाचित त्यालाही या वाटेवरून एकदा तरी चालावं असं वाटत असेल. शांतता म्हणजे काय हे मला त्या जंगलातल्या किलबिलाटातहि जाणवत होतं. कारण जंगलाचा आवाज हाच मुळी शांततेचा असतो असं माझं ठाम मत आहे. या वाटेवरून चालताना ती कधी संपूच नये असं वाटत राहता.
यातच पावसाची एक सर् आली आणि हि जंगल वाट ओली झाली ,पाण्याचे ओघळ वाटेवरून घरंगळून उजव्या बाजूला पाण्याचंछोटं डबकं साचलं. आणि जणू काही त्यात पडलेल्या आकाशाच्या प्रतीबिम्बाने त्या वाटे वरून जाण्याची आपली इच्छा अशा प्रकारे पूर्ण करून घेतली कि काय असा प्रश्न मला पडला. आणि निसर्गाच्या या नितळ चेहऱ्याची थोडीशी झलक आपण पहिली याच आनंदात मी पुन्हा ती वाट चालू लागलो.

गुढ वाटा :


 
रायरेश्वर पठारावरच्या या धुक्यात हरवलेल्या गुढ धुसर वाटा मला नेहमीच पेचात टाकतात. नागमोडी वाटांची अनिश्ततता तर या वाटांमध्ये खच्चून भरलेली तर आहेच पण त्याच बरोबर धुक्यात हरवलेल्या या वाटा गुढ सौंदर्य स्वतःमध्ये दडवून ठेवल्या सारख्या दिसतात.
धुक्यात समोरचं काही दिसत नाहीच पण जेव्हा आपण त्या धुक्या मध्ये शिरतो तेव्हा मात्र आपल्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला होते आणि अर्थातच आजूबाजूला असलेल्या निसर्गाच्या किमेयेचीही. डावीकडच्या फोटो मध्ये दरीच्या बाजूने धुक्यात चाललेली गाडी आणि जणू काही जगाशी संपर्कच नसल्यासारखी ती गुढ वाट मला आजही तितकीच भावते जितकी त्या वाटेवर गाडी चालवताना मला ती तेव्हा भावली होती. प्रत्येक वळणावर मनात निर्माण होणारी उत्सुकता आणि त्यावर प्रत्येक वेळी मिळणारं सुखद उत्तर असं तो प्रवास करत ती वाट पठारावर पोहोचली.
पठारावर पोहोचल्या नंतर तीच गुढ वाट एक पायवाट झाली आणि झाडाझुडपातून जेव्हा जाऊ लागली तेव्हा ती आणखीनच सुंदर वाटू लागली आणि एका मोठ्या वृध्द झाडाच्या पसरलेल्या फांद्यांच्या खालून पुन्हा दिसेनाशी झाली. जणू काही त्या वृध्द झाडाच्या आश्रयाने ती इतकी सुरक्षित झाली होती कि आजूबाजूचा भानच तिला उरलं नव्हतं . 

लाल मातीच्या पायवाटा :



 
राजगडाच्या वाटेवरच्या या लाल मातीच्या वाटा खरतर वाटा नव्हेतच ,कारण पावसाळ्यात याच वाटा पाणी वाहून नेणाऱ्या जल वाहिन्याच होऊन जातात. पण तरीही प्रत्येक ट्रेक मध्ये त्या कुठे नं कुठे तरी भेटतात आणि या वाटांवरूनच अनेक जण अनेक किल्ले सर करतात.
कधी फसव्या ,कधी आखूड, कधी निसरड्या, कधी पसरट, कधी खडकाच्या तर कधी आजूबाजूच्या गवताने झाकून गेलेल्या या वाटा प्रत्येक भटक्यांच्या फार जवळच्या असतात. चुकलेल्या वाटाही बऱ्याचदा नव्या वाटांचा शोध लावून देतात.  आजूबाजूच्या वाळलेल्या झाडा झुडपांना घासत खर खर असं आवाज करत या वाटांवरून जाताना त्या कधी आपल्याशी बोलू लागतात हेच कळत नाही. उन डोक्यावर आलेलं असताना काही वाटा झाडाच्या सावली मधे एखादा खडक समोर आणून ठेवतात आणि नकळत आपल्याला बसायला सांगतात. 
चालता चालता एखाद्या ठिकाणी अचानक वाटेला फाटा फुटलेला असेल तर एक वाट नकळत हाक मारून बोलावते आणि आपल्याला तिच्या सोबत घेऊन जाते. ऋतू प्रमाणे रूप बदलणाऱ्या या वाटा त्याच्या याच गुणधर्मामुळे लक्षात राहतात आणी पुन्हा पुन्हा या वाटांवरून गेलं तरीही नव्या वाटतात.

                                           ....आनंद


Saturday, March 19, 2011

सरळ वळण .....!




चालता चालता ठेच लागावी आणि आणि आयुष्याने वळण घ्यावं असं होतं कधी कधी. माणूस म्हणून जगण्याचा अट्टाहास असेल तर मात्र कुठलीही पायवाट असेल तरीही निराशा येत नाही. आता पर्यंत बराच फिरलो, कोणाच्या मते खूप कमी असेल कदाचित कोणाच्या मते फार जास्त असेल पण या सगळ्यात मला गवसत गेलं ते या निसर्गाचं गुढ आणि ते या पुथेही चालूच राहील या शंका नाही. पण या सगळ्याला सुरुवात झाली ती शेवटी इथूनच आणि संपणार सुद्धा इथेच, म्हणून मग ठरवलं थोडं मागे वळून पहायचं आणि तोच जाणवलं कि खूप वळणं येऊन गेली आहेत आणि सगळी मी सरळपणे पार करत आलो आहे आणि याच वरून सुचलं या वेळच शीर्षक “सरळ वळण “.
तर अशा अनेक सरळ वळणावर मला गवसलेली निसर्गाची रूपे, चमत्कार आणि खूप साध्य वाटणाऱ्या अशक्यप्राय गोष्टी.

गवतावरचे थेंब :
 
वाटेवरून जाताना सहज गवतावर पाण्याचे थेंब दिसले. थेंबांनी अर्थातच त्यांच्या सौंदर्यामध्ये भरच घातली होती .मनात विचार सहज विचार आला खरंच गवतासाठी त्या थेंबांच महत्व जास्त असेल कि थेंबाला त्या गवताच्या पात्याचा आधार वाटत असेल ?  आपलं आयुष्यही असाच असतं नाही का ? आपलं आपलं म्हणून आपण शोधात बसतो ते खरंच आपलं असतं , कि जे आपल्या कडे आहे पण जाणवत नाही ते आपलं असतं?
कदाचित यातच आयुष्याचं कोडं दडलेलं असावं. आपण आपल्या परीनं ते शोधण्याचा प्रयत्न करायचा बस्स.......!

विहीर :
 
राजगडच्या पायथ्याशी गावात या विहिरीचा फोटो जेव्हा मी काढला तेव्हा मनात हा विचार नव्हता जो आता आलाय.  आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक गोष्टी आपल्या आयुष्याशी किती साधर्म्य दाखवत असतात , आपण त्या कडे कधी अनाहतपणे तरी कधी जाणूनबजून दुर्लक्ष करत असतो. विहीर हि एक अशीच मला भूल घालणारी व्यक्ती. हो व्यक्तीच. कारण मला दरवेळी विहीर पाहिल्यावर तिला एक व्यक्तिमत्व असलयाचा भास होतो. पावसाळ्यात पाण्याने भरून आनंदाने भरलेली आणि उन्हाळ्यामध्ये पाणी खोल गेल्यावर रडवेली झालेली विहीर मला फार जवळची वाटते. तिचे बदलणारे भाव जाणायला कुणालाच वेळ नसतो असं सारखं जाणवतं. कठडयावरून पाणी भरणारी मानसं आपल्याशी कधीतरी बोलतील अशी वेडी अशा लावून बसलेली विहीर मला फार निरागस वाटते.


 
पहिला सूर्योदय :

नवीन वर्षाचा पहिला सूर्योदय टिपताना फार भारावून जायला झालं होतं मला. पहाटे झाडांच्या फांद्या मधून येणारी ती कोवळी किरणे पाहून क्षणभर वाटलं यांना कळत असेल का नवीन वर्ष , त्यांना असेल का त्याचा अप्रूप ? कि ती आपली नेहमी प्रमाणे सकाळी धरणीला भेटायला आली असतील ?  पहाटेच्या त्या किरणांनी मला पुन्हा एकदा पेचात टाकलं होतं. आणि माणूसपणाच छोटे पण सिध्द केलं होतं. नवीन वर्षाच्या स्वागताला माणूस जय्यत तयारी करत असतो , पण हि किरणे मात्र आपसूक पणे नेहमी प्रमाणे येत राहतात. न कुठला हेवा न कुठला अहंकार . माणसाला येऊ शकतं असं राहता ? सगळ्या काल्पनिक बंधनांना तोडून फक्त माणूस होता येईल ?
अवघड आहे खरं पण अशक्य नक्कीच नाही , ........नाही का ?

 
इंद्रधनू : 
 


चिखलदरा इथे गाविलगडला काढलेला हा दुहेरी इंद्रधानुश्याचा फोटो पाहून मला अजूनही हरवून जायला होतं. पश्चिमेला सूर्य अस्ताला जात होता आणि पावसाची एक सर् जणू काही त्याला निरोप द्यायला धावून आली होती. आणि दोघांच्या मिलनातून पूर्वेला इंद्रधनू कधी उमटलं हे कळलंच नाही. डोंगराच्या एका टोका पासून दुसऱ्या टोकापर्यंत अर्धगोलाकार इंद्रधनु मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो. कितीही वेळा पाहिलं तरी मन भरत नव्हतं.  क्षणिक मिलनातून जन्मलेलं इंद्रधनू सुद्धा क्षणिकच असतं पण त्या छोट्या आयुष्यात ते अनेकांना भुरळ घालत.  अजून थोडं जगावं असं त्याला वाटत नसेल का ? पण वाटलं तरी त्याच्या हातात काहीच नसतं. त्याचं आयुष्य पराधीन असतं. पण तरीही ते जेव्हा जेव्हा जन्म मिळेल तेव्हा सप्तरंगाच दाखवतं आणि काळवंडलेल्या आकाशाला नवे रंग देतं.
मला वाटतं इंद्रधनू आयुष्यात असलेल्या सप्तरंगांची आठवण माणसाला करून देत असावं. मळभ
चढलेल्या आयुष्याला नवीन रंगांची ओळख करून देत असावं. आणि आयुष्याच्या अनिश्तीततेची जाणीव सुद्धा.
 
फुलपाखरू :
 
फुलपाखराचे फोटो काढणं हा हि माझा एक आवडता छंदच आहे. फोटोतल फुलपाखरू राजगडला काढलेलं आहे. मुळात फुलपाखरू हेच मुळी मला एक अशक्यप्राय गोष्ट वाटते. देवाने माणसाला घडवायला जेवढा वेळ दिला असेल त्या पेक्षा कितीतरी जास्तपट वेळ फुलपाखरू घडवायला त्याने दिला असला पाहिजे. कारण सौंदर्य म्हणजे काय हे फक्त इथेच कळतं.  फुलपाखरू काय, इंद्रधनू काय, सर्वात सुंदर अशा गोष्टीचं आयुष्य हे कमीच असतं. , जेमतेम हातावर मोजता येईल इतक्या दिवसांच आयुष्य लाभलेलं फुलपाखरू भिरभिरत जेव्हा फिरत असतं तेव्हा वाटतं कि छोट्याश्या आयुष्याचा पुरेपूर उपभोग घेण्यासाठी तर ते धडपडत नसेल ? रायगडावर एकदा वाऱ्याच्या प्रवाहाशी झुंज देणार फुलपाखरू पाहिलं आणि वाटलं स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि हक्क साठी लढण्याचं बळ कुठून येत असेल त्याच्यात ?

आंतरिक सौंदर्या पेक्षा बाहरी सौंदर्याला सर्वस्व मानणाऱ्या जगात स्वतःच्या सौंदर्याची जाणीव सुद्धा नसलेलं ते फुलपाखरू मला निगर्वीपणाचा एक चमत्कारच वाटतं.

                                                                      .....आनंद
             

Sunday, February 20, 2011

रायगड – पाली Bike Expedition Trip - 12 Feb 2011


फेब्रुवारी महिना जसा सुरु झाला तसं या महिन्यामधल्या आऊटिंगचा विचार मनात घोळत होता. आणि शनिवार रविवार असं रायगड, पाली, असा प्लान ठरला. पण या वेळी बाईक वर जायचं असा मनात येत होतं आणि मग शेवटी तोच बेत केला.
शनिवारी पहाटे ६.३० वाजता पौड रोड वरून चांदणी चौक, ताम्हिणी, निजामपूर या रोड ने जायचं ठरवलं. या मार्गाने पहिल्यांदाच जात असल्यामुळे थोडी माहिती काढून ठेवली होतीच. थंडी तशी ओसरू लागली असली तरी पहाटे मात्र चांगलाच गारवा जाणवत होता. पिरंगुट ओलांडून पौड पर्यंत आलो. इकडे थंडी जरा जास्तच होती. मुळशी ओलांडून ताम्हिणी च्या रस्त्याला लागल्यावर मात्र  मन नेहमी प्रमाणेच हरवून गेलं. 

 पूर्वेला सूर्य अजून उगवत होता. रस्त्याच्या आजूबाजूला मधेच एखादं घर झोपेतून जागं होत होतं. आणि त्याची खूण म्हणून छपरातून जणू काही ढग बाहेर सोडत होतं. काही ठिकाणी पाणी तापवण्यासाठी पेटवलेल्या बम्बातून येणारा धूर तसाच वर साचून राहिला होता, आणि तो ढगासारखा भासत होता. डोंगराच्या कुशीत लपलेली घरं पाहून त्यांचा हेवा वाटत होता. ती सर्व घरं खरं अर्थाने निवारा वाटत होती.
ताम्हीनीतून तसाच पुढे निजामपूर च्या दिशेने निघालो. मध्ये विले भागडचा  MIDC लागलं. भागड वरून निजामपूर आणि मग माणगाव असं सरळ रोड आहे. रस्ता अतिशय सुंदर आहे. इथे सुंदर म्हणजे रस्त्याच्या सद्य परिस्थिती बद्दल बोलत आहे. साधारण २ तासा मध्ये माणगावला पोहोचलो. इथून पुढे NH 17 वरून सरळ महाड पर्यंत जातं येतं. निजामपूर वरून पाचोड ला सुद्धा जातं येतं पण त्या रोड बद्दल माहिती नसल्या मुळे माणगाव वरूनच आलो.महाड ला पोहोचल्यावर रायगड रोड ने सरळ रायगड पर्यंत पोचता येतं. साधारण ३.१५ तासा मध्ये रायगड ला पोहोचलो. 


रात्री तिथेच मुक्काम करायचं असल्यामुळे आधीच रुम बुकिंग करून ठेवलं होतं. तिथे थोडं फ्रेश होऊन साधारण ११.४५ ला रोपवे चा बुकिंग केलं . हा रोपवे Jog Engineering Limited ने १९९४ मध्ये बांधायला सुरु केला आणि १९९६ मध्ये तो बांधून पूर्ण झाला. मी पहिल्यांदाच रोपवे मध्ये बसत असल्यमुळे मनात प्रचंड उत्सुकता होती.  परदेशात जाऊन तिथल्या गोष्टींचा माणस किती कौतुक करतात आणि आपल्या देशात आणि तेहि महाराष्ट्रात असलेल्या या आणि इतर अनेक गोष्टी आपण किती सहज उडवून लावतो किवा दुर्लक्षित करतो याचं नवल वाटलं. ७६० मिटर चा तो रोपवे पाहून Engineering च्या कौशल्याला खरंच दाद द्यायला होत होतं. आणि हा रायगड सारख्या किल्ल्यावर आहे याचंही कौतुक वाटत होतं.
१६७४ मध्ये शिवाजी महाराजांनी रायगडला स्वराज्याची राजधानी केलं. आणि तेव्हा पासून रायगड इतिहासाचा साक्षीदार म्हणून उभा आहे. अशा या पावन गडावर ठिकठिकाणी स्वराज्याच्या खुणा दिसून येतात आणि त्या काळातील पुढारलेल्या संस्कृतीची जाणीव होते. अतिशय योजनाबद्ध अशी गडाची बांधणी आणि अगदी सूक्ष्म गोष्टीमधेही दिसणारी शिस्ताबद्धता पाहून भारून जायला होतं.
राणी महाल, दरबार, मेणा दरवाजा जेथून जिजाऊ येऊन किल्ल्य्वर पहाणी करून जायच्या, जगदीश्वर मंदिर ,पालखी दरवाजा ,बाजारपेठ ,महादरवाजा अशा अनेक गोष्टी आपल्याला भूतकाळ समोर उभा करतात. बाजारापेठेतील दुकानांची रचना पाहून तर फार नवल वाटतं. दुकानाच्या मागच्या भागात सामानाची साठवणूक करायची खोली, पुढच्या भागात विक्रीचा उंचवटा, हे सगळं पाहून त्या काळातही किती विचार करून रचना केली जायची हे सिद्ध होतं.
नगारखान्याच्या दरवाजासमोर चा acoustic design पाहून थक्क व्हयला होतं. २०० फुट अंतरावरचा हळू आवाजात बोललेलं महाराजांच्या पुतळ्यासमोर उभा राहुन अगदी स्पष्ट ऐकू येतं. दरबाराची शिस्त किती कडक होती हे या वरून दिसून येतं.


टकमक टोक , हिरकणीचा बुरुज यांच्या अख्ख्यिका तर इतिहासात अजून कित्येक वर्ष ऐकल्या आणि बोलल्या जातील. आणि सर्व मराठ्यांचं उर अभिमानाने भरून येत राहील. शिवाजी महाराजांचा पावन स्पर्श ज्या भूमीला झाला त्या भूमीला प्रत्येकाने एकदा तरी भेट द्यायलाच हवी यात कुठलीच शंका नाही. महाराजांच्या समाधी समोर नतमस्तक होऊन प्रत्येकाने त्या राजाला मनोमन मुजरा केल्याशिवाय राहवत नाही हेच खरं. सर्व गड पाहून मन भारावून जातं.
साधारण ६ वाजण्याच्या सुमारास परतीच्या वाटेला लागलो. राहण्याची सोय पायथ्याशी असल्यमुळे गडावरून खाली उतरणं गरजेचंच होतं. म्हणून मनात नसतानाही खाली आलो.
साधारण ७.३० वाजताच गाव झोपी गेलं आणि एक गुढ अशी शांतता पसरली. शहरात कधीच न अनुभवता येणारी ती शांतता इथे मात्र रोजच वास्तव्याला असते हे पाहून आपल्या छोटेपणाची पुन्हा एकदा जाणीव झाली. आकाशात चांदण्या चमकत होत्या, आणि चंद्र आपला पांढरा प्रकाश गडावर पांघरत होता. रात्रीच्या मिट्ट काळोखातही गड मात्र अतिशय निडर आणि सुंदर भासत होता.
पहाटे ६.३०ला मला जाग आली. बाहेर येऊन पहिल तर गडामागून सूर्य किरणे दिसू लागली होती. आणि पुन्हा नव्या पहाटेचं स्वागत करायला पाखरं गाणी गात होती. मागे असलेल्या विहिरवर पुन्हा मोट फिरत होती. 

९.३० वाजता रायगडावरून निघालो . पाचोड गावात आल्यावर पाली साठी रस्त्याची चौकशी केली. गावकऱ्यांनी महाडला न जाता सरळ समोरच्या रस्त्याने जायला सुचवले. थोडा रस्ता मध्ये खराब आहे पण गाडी जाते असंही सांगितलं. त्या प्रमाणे निघालो. सुरुवातीला बरा असलेला रस्ता हळूहळू आपला रूप बदलायला लागला. मध्ये छोटी छोटी गावं, वाड्या लागत होत्या. थोड्या वेळाने पूर्ण दगडाचा कच्चा रस्ता सुरु झाला. लाल माती आणि खडक या मधून बाईक चालवताना दमछक होत होती. थोड्या वेळात खराब रस्ता संपला. आणि चांगला रस्ता सुरु झाला. गुगल च्या map वर नसणारा हा रस्ता मात्र मला एक वेगळाच अनुभव देयुन गेला. आजूबाजूला गर्द झाडी, त्या मधून गेलेला रस्ता, पसरलेले डोंगर, आणि दूरदूर माणसांचा अगदी सूक्ष्म अस्तित्व हे फार सुखावणार होतं. साधारण तीन डोंगर पार केल्यावर आम्ही माणगावच्या दिशेला लागलो. थोड्याच वेळात माणगाव आलं आणि आम्ही पुन्हा NH 17 ला लागलो.
NH 17 वर साधारण ४० K.M. सरळ गेल्यावर कोलाड च्या जवळ पालीला जाण्यासाठी फाटा लागतो. तिथून पाली ८ K.M आहे. १२ वाजता पालीला पोहोचलो. गणपतीचा दर्शन घेऊन महाप्रसाद घेतला. थोडा वेळ मंदिरात बसून मग परतीचा प्रवास सुरु केला. पाली वरून खोपोली आणि मग खंडाळा, लोणावळा आणि मग वाकड मार्गे पुन्हा पौड रोडला पोहोचलो.
साधारण ३६० K.M च्या या प्रवासात मात्र पुन्हा एकदा काही नवीन गोष्टी गवसल्या. आणि नेहमीची वहिवाट सोडून कधीतरी नव्या वाटा शोधल्या पाहिजेत हे जाणवलं, कारण नव्या वाटाच नवं बळ देत असतात काहीतरी न अनुभवलेलं अनुभवायला. पण समोर येईल ये स्वीकारण्याची मनाची मात्र तयारी हवी हे मात्र खरं. शेवटी प्रत्येक प्रवास हा काहीतरी शिकवतच असतो मग तो दूरचा असो नाहीतर जवळचा. याच विचाराने पुढचा प्रवासाचा बेत आखण्याची उर्मी दिली हीच कदाचित या वेळच्या प्रवासाने दिलेली भेट होती.


                                                                  ....आनंद

Sunday, January 23, 2011

महाबळेश्वर ट्रीप - २२ जानेवारी २०११



मानव्य :
मानव्य हि smt. विजयाताई लवाटे यांनी १९९५ साली स्थापन केलेली संस्था पुण्यापासून साधारण १२ km अंतरावर भूगाव या गावात आहे. जन्मतःच H.I.V +ve असणाऱ्या मुलांची तिथे राहण्याची ,शिक्षणाची आणि त्याच बरोबर त्यांची औषधं तसेच दवाखाना याची सोय इथे केली जाते.
माझ्या कंपनीमधल्या Coportate Social Responsiblity (CSR) ग्रुपमार्फत मी या संस्थेशी जोडला गेलो. संस्थेचा सगळा पसारा पाहूनखरंच अगदी भरून यायला होतं. मागच्या वर्षी दिवाळी च्या निमित्ताने १-२ कार्यक्रमाच्या मधून तिथल्या मुलाचं भावविश्व जवळून पाहायला मिळालं.  याचंच पुढचं पाउल म्हणून २२ जानेवारीला या मुलांबरोबर आम्ही सगळ्यांनी महाबळेश्वर ट्रीप ठरवली. १० लोकांचे २० हात कामाला लागले आणि शेवटी एक वेगळा दिवस अनुभवून आम्ही सगळे रात्री परत आलो.
मात्र परत आल्यानंतर मनामध्ये विचारांचं नुसता काहूर माजलं. एका दिवसात त्या मुलांनी मला अनेक अवघड प्रश्नांची खूप सोपी उत्तरं दिली होती आणि मलाच अनेक अवघड प्रश्न घातले होते. त्यामुळे लिहाव तर लागणारच होतं.
संस्थेमध्ये एकूण ५० मुलं आहेत त्यामधे २१ मुली आणि २९ मुलं. सकाळी ७.३० वाजता निघायची वेळ ठरली. एवढ्या सकाळी मुलं तयार होतील कि नाही असे विचार मनात येत होते पण ठरल्यावेळेला आम्ही संस्थेमध्ये गेलो तोच समोरचं दृश्य पाहून मला माझ्याच विचाराचं हसू आलं. सगळी मुलं स्वेटर घालून २ -२ च्या जोड्या करून आधीच रांगेमध्ये उभी होती. सगळ्या मुलांना २ बस मध्ये बसवून शेवटी आम्ही ८.३० वाजता निघालो. आपण सगळे फिरायला चाललो आहोत या कल्पनेनंच मुलं खूप खुश दिसत होती. आणि त्यांच्या चेहरया वरचा आनंद पाहून मल छान वाटत होतं. बस मधल्या टीव्ही वर कार्टून बघण्यात त्यांना खूप मजा वाटत होती. मधेच वाटेत लागणारा घाट, बोगदा, डोंगर हे पाहण्यातही मुलं गुंग होती. 

पाचगणी :
 साधरण ११ वाजता आम्ही पाचगणी ला टेबललेंड ला पोहोचलो. तिथे फिरण्यासाठी घोडागाड्या घेतल्या . प्रत्येक गाडी मध्ये ८ जण असं बसवून आम्ही राईड ला निघालो. घोडागाडी मध्ये बसल्यावर तर प्रत्येक प्रत्येकाला काय करू आणि काय नाही असं झालं होतं. घोडा गाडीची ती धावती राईड संपल्यावर तिथे असलेल्या केव्हस पाहण्यासाठी आम्ही सगळे खाली उतरलो. तिथली माकडं पाहून मुलांना खूप गम्मत वाटत होती. कधीही न घेतलेला अनुभव पहिल्यांदा घेतल्यावर मनात काय काय होत असेल याचा विचार मी करत होतो आणि त्याच बरोबर माझ्या आयुष्यातल्या अशा प्रसंगाची आठवण जागी करायचं प्रयत्न सुद्धा. पाचगणी मधेच आम्ही मग जेवण्यासाठी एके ठिकाणी थांबलो. भूक लागल्यामुळे लागल्यामुळे सगळे अगदी मनसोक्त जेवलो. आणि मग महाबळेश्वर साठी निघालो.
                                  
                                                                                                            


महाबळेश्वर मंदिर :  पाचगणी मधून निघाल्यावर सगळे पुन्हा ताजेतवाने झाले होते. आणि मग मी गिफ्ट देणार असं सांगून त्यांना गाणी म्हणायला सांगितली. सगळ्या मुली इतक्या छान गात होत्या, कि मी आणि माझ्या बरोबरचे माझे सहकारी अगदी थक्क होत होतो. सगळयाच मुलीचं पाठांतर आपल्याला लाजवेल असं होतं. आणि एक थांबताच दुसरी आपला आवाज त्यात मिसळत होती. हे सगळं होत असताना त्यांनी मला त्यांच्यात कधी सामावून घेतला कळलंच नाही. आनंददादा अशी त्यांची हाक मला फार आपली वाटत होती. आम्ही मग संदीप खरे  आणि सलील कुलकर्णीची  गाणी सुरु केली. , मी मोर्चा नेला नाही, मी हजार चिंतानी , अगोबाई ढगोबाई, दमलेल्या बाबांची कहाणी, अशी खूप गाणी गायली. मनात विचार आला “दमलेल्या बाबांची कहाणी” हे गाताना आई आणि बाबा नसलेल्या त्या जीवाला ती आर्तता कोण देत असेल ? काय काय विचार येत असतील त्या सगळ्यांच्या मनात ? क्षणाक्षणाला डोळे भरून येत होते.
सगळ्यांना गिफ्ट वाटून झाली. आणि मग “चिमुकल्या चोची मध्ये आभाळाचे गाणे” हे नवीन गाणं मी त्यांना शिकवलं आणि त्यांनाही ते आवडलं. आणि अगदी १०-१५ मि. मध्ये सगळ्याजणी अगदी सुरात ते म्हणू लागल्या. आणि मग मात्र सरीवर सरं, आताशा असे हे , नसतेस घरी तू जेव्हा हि सगळी गाणी त्यांनी माझ्याकडून आनंददादा अजून एक अजून एक अशी करत गाऊन घेतली. आणि त्यांची ती फर्माईश मी हि नाकारू शकलो नाही आणि गाणी झाल्यावर ती आम्हाला वहीमध्ये लिहून हवी आहेत अशी अट घालून मग मला थांबायची परवानगी मिळाली. परक्याला आपलासं करण्याचं एक अजब रसायन लहान मुलांकडे असतं असा माझा ठाम विश्वास आहे आणि ते पुन्हा एकदा सिध्द झालं होतं. या मुलांनी मला आपलंसं तर केल होतंच पण त्याच बरोबर एक नवा विश्वास सुद्धा दिला होतं आणि तो म्हणजे माणसं जोडणे हि कला फार सोपी असते आणि त्या साठी गरज असते ती फक्त निर्मळ मनाने केलेल्या  प्रामाणिक प्रयत्नांची.



 
महाबळेश्वर च्या मंदिरामध्ये दर्शन घेतल्यावर आम्ही आर्थर पोईंट , एको पोईंट साठी निघालो. आर्थर पोईंट वरून दूरदूर वर दिसणारे डोंगर पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं आणि आपण इतक्या उंचीवर आहोत याचं अप्रूप. सूर्य अस्ताला निघालाच होता. सावित्री पोईंट वरून तो लाल गोळा डोंगामागे कसा जातोय हे बस मधूनच पहिल. आणि परतीची वाट धरली. या सगळ्यात पोईंट म्हणजे काय, अस्त म्हणजे काय, एको म्हणजे काय, शंकरा समोर नंदी का असतो, पंचकुंड म्हणजे काय असे बालसुलभ प्रश्न विचारून मला अगदी त्यांनी घेरून सोडलं होतं.

जेव्हा मी त्यांना सांगितलं कि आता आपण परत जायच आहे तेव्हा एका चिमुकलीचि प्रतिक्रिया ऐकून मला अक्षरशः भरून आलं. “ती म्हणाली अरे दादा मलानं लवकर घरी जायला नको वाटतंय कारण हे रस्त्या वरचे दिवे बघायला फार आवडतं,  मला ते कधीच दिसत नाहीत. कारण आम्ही बाहेर फार जातच नाही. “ काय बोलणार त्या चिमुकलीला ? स्वतःमध्ये अखंड तेवणारा दिवा असणऱ्या तिला अशा कृत्रिम प्रकाशाची काय गरज होती. उलट मनाची दारं बंद करून आत प्रकाशाची अपेक्षा करणाऱ्या मुखवटे असणाऱ्या माणसांपेक्षा हि चिमुकली फार थोर होती.
गाणं लिहून देण्यासाठी दुसऱ्या एका चिमुकलीचि वही तिने दिली, आणि ती पाहून मी थक्क झालो. आज सकाळ पासून काय काय पाहिलं, घडलं केलं, यातले सारांश असलेले शब्दतिने लिहून ठेवले होते. त्याच वहीत गाणं लिहिलं आणि तिला दिलं.
साधारण दोन तासाने खेडशिवापूरला पोहोचलो. तिथे रात्रीचं जेवण केलं. जेवायला बसल्यावर मी त्यांच्या शेजारी बसाव म्हणून चिमुकल्या मागे लागल्या. शेवटी सगळ्यांना बसवून जेवण दिलं. तिथेच बाहेर एका झाडाला हिरव्या दिव्यांची लायटिंग केली होती. तोच एक चिमुकलीने मला विचारलं “ दादा झाडाला पण असे दिवे लावतात का रे ?” मी म्हटलं हो. त्यालाही सजवायला नको का. आणि चटकन मनात विचार आलं हिला कोण सजावत असेल असं ?  
थोड्याच वेळात गाडीतून पुण्याची वाट धरली. गाडी मध्ये बसल्यावर पुन्हा सगळ्यांनी गाणी म्हटली. खरं म्हणजे शेख सर आणि माझ्याकडून मुलींनी म्हणवून घेतली. J आता आपण परत जाणार हि जाणीव त्यांना होऊ लागली होती. “परत कधी येशील रे आनंददादा” ? , “ आमचा तो गुप् फोटो देशील का रे आणून आम्हाला “ ? असे प्रश्न सगळ्या मला विचारून लागल्या. मीही लवकरच परत येईन असं भरवसा त्यांना दिला.


आयुष्यातली किती वर्ष अजून बाकी आहेत हे माहित नसलेले ते निष्पाप जीव आणि त्यांची जगण्याची धडपड पाहून आपण किती सुखाने ओसंडून वाहत आहोत याची जाणीव होते. शुल्लक गोष्टीवरून बिनसणारी नाती, येणार फ्रश्त्रेशन, कोलमडनारी मने आजूबाजूला पहिली कि वाटतं किती पोकळ आहे हे सगळं. दिलेलं आयुष्य आहे तसा स्वीकारणारे किती असतात ? आणि किती मध्ये ती सामोरा जायची हिम्मत असते ?  
अर्धा तासात पुण्यात पोहोचलो. बस मधून उतरून संस्थेकडे जाताना आकाशात चांदणं पसरलं होतं. आकाशातलं टीकाटनं (३ चांदण्या एका रेषेत ) दिसत होतं. मागे चंद्र शुभ्र प्रकाश शिंपडत होता. आणि मुलं चालत असलेली वाट जणू काही तो प्रकाशित करत होता. 

“या मुलांच्या आयुष्यात प्रकाश असाच कायम ठेव आणि कधीही निराशेचा काळा ढग येऊ देऊ नकोस ही

एकच प्रार्थना मी केली. आणि निरोप घेऊन परतलो.

                                                                          .....आनंद




Thursday, January 6, 2011

राजगड - १ जानेवारी २०११


राजगड -  १ जानेवारी २०११


वर्षाचा पहिला दिवस. आणि खास सुद्धा १/१/११.
या वेळी तो मी साजरा करायचं ठरवला होता राजगड चा ट्रेक करून. भटकंती हा आवडता विषय तर आहेच पण या वेळी त्याही पेक्षा जास्त महत्वाचा होतं ते मला माझ्या साठी वेळ देणं. हाच विचार करून ठरवलं आणि गेलो. 
३१ डिसेंबर च्या नशील्या रात्रीतून जग अजून जागा व्ह्याच्या आधीच १ जानेवारीच्या पहाटे राजगड चा रस्ता धरला. नवीन वर्ष साजरा करायचं आणि ते हि नशा करून आणि त्यात नशे मध्ये नव्या वर्षाचे संकल्प करून हा विचारच माझ्या कल्पेनेच्या पलीकडचा आहे .याचा अर्थ असा नाही कि नशा करूच नये किंवा त्यात गैर आहे कारण तो पूर्ण पणे वेगळाच वादच मुद्दा होईल. असो.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी केलेला राजगड चा ट्रेक हा एक अविस्मरणीय असा अनुभव ठरला.आणि नवीन वर्षाची सुरुवात हि खूप दिवस स्मरणात राहिला अशा या ट्रेक ने झाली. राजगड हा मला आवडणारा गड , कितीही वेळा गेलं तरी नेहमीच वेगळा भासणारा आणि नवीन रूपे दाखवणारा गड.
भटकंती प्रिय असल्यामुळे मागच्याच आठवड्यात कोल्हापूर आणि पन्हाळा झाला तरी लगेच पुन्हा अजून एक गड सर् करण्याची इर्षा काही कमी झाली नव्हती त्यामुळे  नवीन वर्ष वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची माझी परंपरा या वेळीही मोडली नाही आणि भल्या पहाटे मी राजगड ची वाट धरली आणि मस्त गारवारा अंगावर झेलत कोवळ्या उन्हा मध्ये गड कधी सर् झाला कळलाच नाही. निसर्ग आपल्याला दोन्ही हाताने भरभरून देत असतो याची प्रचीती क्षणाक्षणाला आली.




७.३० – ८ वाजता राजगड च्या पायथ्याशी पोचलो . डोंगरामागून उगवणारा नव्या वर्षाचा पहिला सूर्य दिसत होता . कॅमेरा सरसावून त्याचा मस्त फोटो घेतला. तोच झाडावर एक खारुताई जणू काही फोटोसाठीच तयार होऊन बसलेली दिसली . चिंचेच्या झाडाच्या फांदी मधून कोवळी किरणे अशी काही तीरा सारखी पुढे सरसावली होती कि जणू काही नवीन वर्षाची ओढ त्यांनाही वेड लावत होती.
मस्त पैकी फक्कड चहा पिऊन राजगडाच्या दिशेची वाट धरली. तोच समोर गावातल्या घरासमोरची एक भली मोठी विहीर समोर आली. हल्ली विहीर या प्रकाराने मला वेड लावलेच आहे . पाणी काढण्य साठी मोट लावलेली ती विहीर पाहून आणि त्या वर पाणी भरणाऱ्या म्हाताऱ्या आज्जी पाहून स्वतःचं छोटे पण जाणवलं. आपण शहरातली मानसं किती शुल्लक गोष्टीवरून चिडतो, भांडतो, आणि निराश होतो. पण इथे तर प्रगतीचा स्वप्नाचा किती दूर आहे . पण तरीही माणूस म्हणून हि साधी मानसंचं  मला जास्त जवळची वाटतात. त्या विहिरीच्या कठड्यावर उभा राहुंन तिचे ४-५ फोटो घेतले. मला नेहमी एक गुढ असा भास विहीर देते . काहीतरी खूप दडलेला आहे तिच्या मध्ये असा वाटत राहता. पण तरीही ती मला हतबल वाटत नाही उलट नेहमीच स्वतःशी हसत आहे असा वाटत राहत. जणू काही स्वतःमधेच गुंग अशी एखाधी अबोल राजकन्या.
विहिरीला मागे टाकून पुढची वाट धरली. उन खुपच कोवळा होतं आणि हवेत मस्त गारवा होता. इथे मनात हाच विचार आला कि नक्की काय हवा असतं माणसाला ? माणसाचं माणूस पण जपण्यासाठी इतके का कष्ट पडावेत ?





हिवाळा असल्या मुळे बरीच झाडा आपली जुनी पाने सोडून नव्या पालवीला जागा करून देत होती. कोण सांगत असेल झाडांना असा करायला ? जुनी पानें गलाल्यानंतर नवीन पाली फुटेलच हा विश्वास कोण देत असेल त्यांना ? कि आपण माणसाच फक्त भित्री असतो ? झाडे मात्र डोळे झाकून जी गोष्ट करत राहतात तीच माणूस मात्र कधीच करू शकत नाही हा विचार मनात आला आणि झाडांचा हेवा वाटला आणि तितकीच ती मोठी वाटली .
लालमातीची वाट संपून आता खडकाळ पायवाट सुरु झाली, दोन्ही बाजूने दाट झाडी आणि मधून गेलेली पायवाट. गर्द झाडी मध्ये मधेच होणारा सळसळ असा आवाज. डोंगराच्या उतारावर आपसूक पणे आलेली एकाच जातीची छोटी झुडपे इतकी लयबद्ध पणे उगवली होती जणू काही कुणी तरी शेतीच लावली आहे अशी भासत होती.
जसजसे वर चढत होतो तसा वाऱ्याचा आवाज वाढत होता आणि गारवारा बोचत होता. भर उन्हात थंडी भरेल इतका गारवारा पाहून निसर्गाची गम्मत वाटली . भर उन्हात जराही घाम इत न्हवता तो यामुळेच.
साधारण १ तासाने चोर दरवाज्या पर्यंत पोहचलो. त्या आधीची रॉक ची चढण मस्तच आहे. घोंगावणारा वारा, मागे खोल दरी आणि वर खुणावणारा राजगड. तिथल्याच एक खडकावर बसलो. दूर पर्यंत जणूकाही कुणीच नाहीये अस भासत होतं. प्रत्येक ट्रेक मध्ये एक असा क्षण असतो त्या क्षणी तुम्हाला वाटता कि हाच तो क्षण ज्या साठी हि सगळी धडपड केली . आणि माझ्यासाठी तो पहिला क्षण असाच होता.
आणि माझ्या नशिबाने तो मी अजून गडावर प्रवेश करण्या पूर्वीच आला होता.
चोर दरवाज्यातून गडावर प्रवेश केला. ३१ डिसेंबर गडावर साजरा करणारी काही हौशी मंडळी तिथे बघून छान वाटला. पद्मावती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. आणि मग सुवेळा माची कडे प्रस्थान केला. जाताना वाटेत राजवाड्याचे अवशेष दिसतात. ते पाहून खरोखर भरून यायला झालं आणि तोच समोर भगवा झेंडा वाऱ्याबरोबर झुंज देत फडकत होता. तो पाहून उर अभिमाने भरून आला कारण मागे बालेकिल्ला खुणवत असतो.
सुवेळा माची कडे जाणाऱ्या वाटेवर खूप सारी फुलपाखरे असणार असा मनात वाटत होताच आणि ती शक्यता प्रत्यक्षात उतरल्यावर तर आनंदच झाला . फार फुलपाखराच्या जाती काळात नसल्या तरी त्यांना कॅमेरा मध्ये बंदिस्त मात्र केला.
सुवेळा माची कडे जाताना मध्ये बिग होल लागता. मोठ्या खडका मध्ये असलेला ते होल अगदी पायथ्याच्या गावातूनच बघताना खुणावत असतं. त्या मध्ये एक अर्धा तास बसलो. एका बाजूला खोल दरी आणि एका बाजूने येणारा गारवारा . ट्रेक साध्य झाल्याचा हा तो दुसरा क्षण . थोड्या वेळाने खाली उतरून .पुन्हा पद्मावती माची कडे निघालो.
पद्मावती माची वरच येऊन जेवण केलं. गडावरच्या विहिरीचा पाणी इतका थंड होतं कि हात जणू काही गोठले. ते थंड पाणी तोंडावर मारला आणि इतकं फ्रेश वाटला कि अजून काही मिळाला नाही तरी चालेल असा वाटून गेला.
थोडा वेळ पद्मावती माची वर बसलो , मागच्या बाजूला असलेला तोरणा सुद्धा ढगांच्या आड लपछापिचा खेळ खेळत होता. राजगडाच्या तटबंदीवरून पुन्हा चोरदरवाजाच्या दिशेने वाट धरली.
तोच माकडांचा कळप समोर मस्त पैकी उड्या मारत होता. जवळ जातात सगळे दूर पळाले. चोर दरवाज्यातून पुन्हा गड उतरायला सुरुवात केली.





येताना मन खूप मोकळ मोकळ झालं होतं. आत काहीतरी दबून राहिलेलं आपसूक पणे बाहेर यावं आणि ते येताना एक अनामिक आनंद देऊन जावं असा काहीसं झालं होतं. मागे वळून पाहताना गड अजूनही तसाच भासत होता. पण आता मी मात्र वेगळा होतो. काही गोष्टी खरच समजण्या पलीकडच्या असतात. आणि त्यांचा अर्थ न लावलेलाच बर असतं.
असा हा दिवस आयुष्यभर स्मरणात राहील यात कुठलीच शंका नाही. आणि त्या बरोबरच लक्षात राहतील ते अगणित क्षण जे विकत घेता येत नाहीत.
माणूस किती छोटा आहे आणि आपल्याला अजून किती आणि काय काय आहे करायला याचीही जाणीव झाली. सरळ रेशेतल्या आयुष्याला अचानक अनेक वाटा फुटतात ना अगदी तसा होता कधी कधी. अचानक एखादी पायवाट पुढे खुणावत येते आणि आपल्याला आपसूक पणे तिच्या बरोबर घेऊन जाते. वाट चुकण्यात सुद्धा कधी कधी मजा असते कारण त्यातूनच नवीन वाटा सापडत असतात आणि गवसत असतो आपल्यातला हरवलेला मी”.
या वेळीही तो मला गवसला ,कदाचित हेच हवा असता प्रत्येकाला पण त्याची योग्य वेळी जाणीव होणं महत्वाचं, नाहीतर हाती काही उरेल याची अपेक्षा करणंच चुकीचा.
नवीन वर्षासाठी नवीन उर्मी मनात घेऊन ट्रेक वरून परत आलो तेच मुळी मनात नवी अशा घेऊन आणि पुन्हा याच इर्षेन अजून एक नवा गड सर् करण्याचं ठरवूनच.
आनंद