Powered By Blogger

Friday, May 13, 2011

ऋतू रंग : ग्रीष्म – वैशाख



ऋतू येती ऋतू जाती ,ऋतू येती ऋतू जाती,
सुखदुखाच्या चक्रात ऋतू अपुले सोबती.
ऋतू येती, ऋतू जाती....!
ग्रीष्म वैशाखाच्या झळा, दाही दिशांना वणवा,
जीव उन्हाळ्याचा शोधे सावली गारवा,
त्याच अग्नीच्या शेवट लपे पावसाचा मोती.
ऋतू येती ऋतू जाती, ऋतू येती ऋतू जाती......!

या गाण्याच्या ओळी परवा कानावर पडल्या आणि अचानक उन्हाळ्याच्या या ऋतू कडे लक्ष वेधलं गेलं. हिवाळा आणि पावसाळा हे बऱ्याच लोकांना आवडणारे ऋतू पण उन्हाळा मात्र कोणालाही मनापासून आवडतं नाही. त्या मुळे या ऋतू मध्ये काय विशेष असतं हे दुर्लक्षितच केलं जातं. किंबहुना विशेष काही असतं हेच माहित नसतं. अंगाची लाही लाही करणारं उन आणि चटके बसवणारी दुपार एवढाच खरंच उन्हाळा असतो का ? असा प्रश्न पडला. आणि मग अर्थातच उत्तरमिळे पर्यंत ते शोधणं अपरिहार्यच होतं.
कदाचित मी हा प्रश्न विचारण्याच्या आधीच निसर्गाने त्याला उत्तर तयार ठेवलं होतं. मागचे २ आठवडे सगळी कडे निसर्गाने रंगांची उधळण करून ठेवली आहे. कोरड्या, तप्त आणि तहानलेल्या निसर्गाने २ आठवड्यातच आपलं रूप पालटलेलं दिसलं आणि सगळे कडे रंगीबेरंगी फुलांची उधळण करून ठेवलेलं जाणवलं.

 
रोज सकाळी ऑफिसला जाताना रस्त्याच्या आजूबाजूने गुलमोहोर, बहावा, गुलबक्षी, चाफा अशी अनेक झाडं फुलांनी बहरलेली दिसू लागली. आणि नकळतच लक्ष वेधून घेऊ लागली. मग एक दिवस सकाळी लवकर निघून हे सौंदर्य फोटो मध्ये बंदिस्त करायचं ठरवलं. आणि बघता बघता ४०-५० गुलमोहोर, १५-२० गुलबक्षी, ८-१० चाफा, २०-२५ बहावा याच बरोबर नावं माहित नसलेल्या अनेक झाडांच जवळून निरीक्षण करता आलं आणि निसर्गाच्या या अद्भूत किमयेला दाद सुद्धा देता आली.
एप्रिल आणि मे महिने हे तापमानाचा उच्चांक गाठणारे महिने. आणि याच महिन्यांमध्ये मनाला सुखद अनुभव देणारी हि फुलं पाहून आश्चर्य तर वाटतच पण त्याच बरोबर या सगळ्यातून निसर्ग काही संदेश देत असावं का ? असंही वाटून जातं.

 
गुलमोहोर हा मला मनापासून आवडणारा वृक्ष . त्याला पाहिल्यावर मला नेहमी या ओळी सुचतात.
तापत्या उन्हात गुलमोहोर उभा असतो फुलांनी बहरून,
निष्पर्णतेतल अस्तित्व जपत,
सागंत जगण्याचा नवा अर्थ,
आणि गात आकाशाचं गाणं ....!

मनाला नेहमीच नवी उर्मी देणारा असा गुलमोहोर हा खरोखर जेव्हा फुलांनी बहरतो तेव्हा त्याच्या पानाचं अस्तित्व सुद्धा उरत नाही ,फक्त उरतो तो लाल चुटुक फुलांच्या ताटव्यांचा मोरपिसारा. समांतर पसरलेल्या फांद्या आणि त्यावर असलेली लाल फुलं पाहून भर उन्हातही गार वाऱ्याची झुळूक आल्याचा भास होतो. त्याचा लाल रंग तापलेल्या धरतीला साजेसा असला तरी तो सुखावहच वाटतो. गुलमोहोरावर जसजशी लाल फुलं फुलू लागतात तसतशी हिरवी पाने गळून पडू लागतात. फुलांनी डवरलेल्या गुलमोहोराखाली उभं राहिल कि जो काही आनंद मनाला मिळतो तो प्रत्येकानं एकदातरी नक्कीच अनुभवावा. निळ्या आभाळाखाली लाल रंगाची उधळण करताना तापलेल्या सुर्याला तो काय सुचवत असावा ?
खचलेल्या मनाला नवी वाट दाखवणारा, संकटातही न डगमगता सामोरं जायला शिकवणारा आणि हे सगळं करताना तितक्याच मुक्तपणे आनंद उधळणारा गुलमोहोर हा प्रत्येकाच्याच आयुष्याच्या वाटेवरचा एक मार्गदर्शक असावा असं वाटून जातं.

 
गुलमोहोरा बरोबरच बहावा सुद्धा आपलं वेगळेपण दाखवत तेवढाच छान दिसतो. गर्द हिरव्या पानांमधून डोकावणारी पिवळी फुले उन्हामध्ये अजून उठून दिसतात. झाडा खाली पडलेला पिवळ्या फुलांचा सडा जणू काही तप्त धरतीला अभिषेक करत असल्यासारखा भासतो. झाडांनी फुलांचे अलंकार घातले आहे कि काय असं वाटावं अशा प्रकारे फुलं एकमेकांत गुंफून गेलेली दिसतात.

 रंगांच्या बरोबर सुगंध असलेली फुलं म्हणजे चाफा. चाफ्याच्या फुलांनी बहरलेला वृक्ष पाहून डोळ्याचं पारणं फिटल्या शिवाय राहत नाही. बाहेर शुभ्र पांढऱ्या आणि देठापाशी पिवळ्या होणाऱ्या पाकळ्या आणि असे संपूर्ण झाडावर पसरलेले झुपके पाहून जणूकाही चाफा येणाऱ्या कोवळ्या उन्हाला हजार हातांनी आलिंगन देतोय कि काय असं वाटून जातं. त्यामुळेच कि काय भर उन्हात चाफ्याच्या झाडाकडे पाहून आपोआपच उन कमी झाल्यासारखं वाटतं. निर्भीड पणे परिस्थितीला सामोरं जाताना जपावी लागणारी विनम्रातही चाफ्याच्या झाडाकडे पाहून तितकीच प्रभावी पणे दिसते. आणि चाफ्याच्या सुगंधाने मंत्रमुग्ध होऊन जणूकाही वाराही त्याचीच गाणी गातोय असं वाटून जातं.

हे सगळं पाहताना कधी कधी मग मला आठवतो तो आज्जीच्या गावाला असलेला आडावरचा चाफा. या चाफ्याच्या फुलांची केलेली अंगठी आणि पाच बोटात पाच फुलांच्या अंगठ्या घालून घरभर मिरवलेले, जगलेले, अनुभवलेलं ते बालपणीचं सुखाचे दिवस. काळ्या दगडावर पडलेली शुभ्र फुलं आठवून त्या दगडांचा हेवा वाटतो आता. त्या निर्जीव दगडालाही क्षणभर हुंकार फुटत असावा असं मनोमन वाटत राहतां. आज इतक्या वर्षांनी तोच चाफा मला पुन्हा तसाच भासला जेव्हा रस्त्याच्या कडेला बहरलेला दिसला आणि क्षणभर थांबून त्याचं सौंदर्य डोळ्यात भरून आणि सुगंध श्वासात भरून मी पुढे निघालो.

 
लाल गुलमोहोर, पिवळा बहावा आणि शुभ्र चाफा झाल्यवर मग मला भावली ती गुलबक्षीची रंगीबेरंगी कागदाची फुलं. फुललेली गुलबक्षी हि मला हवेत अंथरलेल्या एखाद्या चादरी प्रमाणे भासते.  दाटीवाटीने फुललेली फुलं झाडाच्या फांद्यांना जेव्हा पूर्ण झाकून टाकतात तेव्हा दिसणारं रूप हे फार आगळ दिसतं. गुलबक्षीच्या पाकळ्या या गुलाबी, पिवळ्या, पांढरा रंगाच्या फुलपाखराच्यापंखां सारख्या दिसतात. सहजासहजी कुठेही आढळल्यामुळे गुलबक्षी तसं दुर्लक्षित केलं जातं पण ठिकठिकाणी बहरलेली गुलबक्षी पाहून डोळ्यांना नक्कीच एक सुखावह आनंद मिळतो.


भर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये निसर्गाने धारण केलेलं हे देखणं रूप पाहून थक्क व्हायला तर होतंच पण त्याच बरोबर रोजच्या रहाटगाड्यात पिचून जाणाऱ्या रुक्ष जीवनात सुद्धा नवीन रंग कसे भरतां येतील आणि ऋतू पालटण्याची नुसती वाट पाहण्या ऐवजी आलेल्या ऋतूत असलेले रंग कसे खुलवता येतील याची जाणीव निसर्ग नकळत कसा करून देतो याची जाणीव होते . या धावत्या युगात निसर्गाचे हे संकेत आपण ओळखायला थोडा वेळ आपण नक्कीच राखून ठेवायला हवा नाही का? कारण या शाश्वत गोष्टी जपल्या नाहीत तर बेचव आणि बेरंगी आयुष्यात कृत्रिम रंग भरायची वेळ आपल्यावर येऊ शकते.
मग बाहेर चालताय ना ? कदाचित तुमच्या घराजवळचा एखादा गुलमोहोर ,चाफा,बहावा वाट पाहत असेल एखाद्या वाटसरूची जो त्याच्या सावलीत क्षणभर विसावेल आणि त्या फुलांच्या रंगांमध्ये नवा रंग शोधेल.
                 .........  आनंद



Sunday, April 24, 2011

मला भेटलेल्या वाटा – भाग २



पहिल्या भागाप्रमाणेच या भागातही मला फिरताना वेळोवेळी भावलेल्या वाटा आणि त्यांचे मला गवसलेले अर्थ आणि शेवटी मिळालेली नवीन वाटा शोधण्याची उर्मी हेच मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे.
वाटा या नेहमी गवसत असतात असं मला नेहमी वाटतं ते याच कारणामुळे, शोधून सापडतो तो रस्ता असतो पण चालताना मधेच गवसते ती वाट असते. भलेही मग इतरांसाठी ती वाट कदाचित रस्ता असू शकेल पण नव्यानं त्यावरून पुढे जाणाऱ्या माणसासाठी ती नवी वाटच असते.
या वेळच्या वाटा जरा वेगळ्या आहेत, आणि वेगळ्या अशासाठी कि त्या वाटा अनुभवण्यासाठी त्यांची ओळख असणं जास्त महत्वाचं आहे, कारण या सगळ्या वाटा जगाच्या दृष्टीकोनातून पहिल्या तर त्यांचं अस्तित्व नगण्य ठरेल. पण तरीही या वाट मला भावल्या त्या त्यांच्या याच वेगळेपणामुळे. 
 
धुक्यातल्या डोंगर वाटा :



धुकं म्हटलं कि आपल्या समोर पांढरा धुसर हवेचा तरंगणारा थर समोर येतो. डोंगर दर्यातून जाणाऱ्या डोंगर वाटा जेव्हा या धुक्यामध्ये हरवतात तेव्हा त्यांना शोधण्याचा आनंदही आपल्याला देऊन जातात. धुक्या मध्ये हरवलेल्या या वाटा मला भावतात त्या अशासाठी कि समोरचं दिसत नसलं तरीही आयुष्यात प्रवास करत राहा असं त्या सांगत असाव्यात असं मला सारखं भासतं. आयुष्यात बऱ्याचदा अशी वळणं येतात आणि समोरचं आयुष्य धुसर वाटू लागतं पण अशा वेळी ती वाट धुसर करणारं संकटांच धुकं हे क्षणिक आहे आणि ते गेल्यावर समोरची वाट दिसू लागेल असं जणू काही त्या सांगत असतात. धूक्यातल्या वाटेची अजून एक मजेशीर गोष्ट अशी असते कि आपण जसजसं पुढे जात असतो तसतस समोरची वाट आपल्याला आपोआप दिसू लागते पण मागे गेलेली वाट पुन्हा धुक्यामध्ये हरवून गेलेली असते. जगण्याची नवी उमेद देतानाच दुःखी आठवणींच्या भूतकाळाला विसरून जाण्याची कानपिचकी सुद्धा या वाटा मारून जातात. सूर्याची किरणे आल्यावर धूक्याला निरोप देताना पोरकी झालेली वाट स्वतःच्या मनाची समजूत काढून पुन्हा पहाटेच्या धुक्याची वाट पाहू लागते. आणि शेवटी आपल्यासाठी सोडून जाते ती खुणावणाऱ्या नव्या क्षितीजावरच्या उद्याची नवी आशा.
 

वाट अडवणाऱ्या वाटा :


वाट अडवणाऱ्या या वाटा हा माझ्या साठी खूप चिकित्सेचा विषय आहे. कारण प्रत्येक प्रवासात आपला मार्ग रोखणाऱ्या वाटा भेटतच असतात. फोटोतल्या वाटा सुद्धा पुढच्या प्रवासाआधी आपल्याला थांबवतात आणि आत्तापर्यंत केलेल्या प्रवासाची उजळणी करायला भाग पाडतात. या वाटा इतरांच्या आवडीच्या नक्कीच नसतात कारण मार्गात अडथळे असलेल्या वाटा पेक्षा दूरच्या पण विनाअडथळ्याच्या वाटा लोकांना जास्त जवळच्या वाटतात. या वाटांच्या चेकपोस्ट वर आत्तापर्यंत केलेल्या प्रवासाचा आढावा तर घेता येतोच पण त्याच बरोबर पुढच्या प्रवासासाठी मनाची तयारी सुद्धा करता येते आणि येणाऱ्या आव्हानांना सामोरं जाताना लागणारं बळ सुद्धा इथेच मिळते.
वाट अडवूनही या वाटा आपल्याला आपलंसं करतात आणि या वाटांना मागे सोडून जाताना मला उगाचच मनात हुरहूर वाटते. कदाचित सगळ्यांच्या टीकेला पात्र ठरलेल्या या वाटांना आपलं स्वगत सांगायला कोणी भेटत नसावं असं वाटत राहत.
 
सुखावणाऱ्या वाटा :


सुखावणाऱ्या असल्या तरी या वाटा सगळ्यांना सापडतातच असं नाही. कुठलीही सीमा ,बंधन, ओझं नसणाऱ्या या वाटा हवं तस आयुष्य जगणाऱ्या एखाद्या मुक्त पाखरा प्रमाणे असतात. आजूबाजूला वाढलेली झाडे सुद्धा या वाटा अजून सुखावणाऱ्या कशा करता येतील याचीच काळजी करताना दिसतात. आणि आपली सावली अगदी मनसोक्त पणे वाटेवर उधळत असतात.
दुसऱ्या फोटोतली नदी काठची वाट हि सुखावणारी कशी असं प्रश्न बऱ्याच जणांना पडू शकतो पण या वाटेवरून जर प्रवास केला असेल तर मग त्यातलं सुख हे सांगण्याची गरज पडूच शकत नाही. संथ पणे वाहणारी नदी आणि तिच्या काठावरून छोट्या मोठ्या दगड गोट्यांची वाट हि मनाला एक अनामिक आनंद देते. नदी सोबत असल्या मुळे या वाटेला एकटेपणा हा कधीच नसतो. हातात हात घालून चाललेल्या मैत्रिणी सारखी हि वाट चालणाऱ्यालाही एकटे पणा भासू देत नाही.  दूरदूर पणे कितीही चालत राहिला तरी वाट संपूच नये असं वाटत राहत.
आयुष्यातल्या दुःखांना विसरायला लावणाऱ्या या वाटा मला काय पण सगळ्यांनाच हव्याहव्याश्या असतात. शेवटी सुख प्रत्येकालाच हवं असतं नाही का ?


 दडलेल्या वाटा :

  
दडलेल्या वाटा या कधी स्वतः दडतात तर कधी समोरच्या नव्या वाटेला दडवून ठेवतात. आजूबाजूला असलेला गर्द झाडीमुळे या वाटा अजूनच गुढ वाटतात आणि वळणानंतरची नवी वाट काय असेल हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण करतात. कधी जंगलातून, कधी डोंगरातून या दडलेल्या वाटा प्रवास करताच राहतात. आयुष्याच्या अनिश्चीततेची जाणीव करून देतानाच सतर्क राहण्याचा सल्ला त्या प्रत्येकालच देतात. आयुष्यात येणारी वळणं आणि आयुष्यात दडून राहिलेल्या अनेक वाटा ओळखण्यासाठी गरज असते ती फक्त विचारपूर्वक परीक्षणाची आणि स्वतःवरच्या विश्वासाची.   दडलेल्या वाटेला टाळता येत नसलं तरी त्याच वाटेला सुखावह नक्कीच करता येतं. शेवटी दडलेलं ओळखलं कि मिळणारा आनंद हा मोठाच असतो. आणि तो फक्त अनुभवायचा असतो तो कुठल्याही किमतीला विकत घेतं येत नाही. आणि म्हणूनच दडलेल्या वाटा सगळ्यात जास्त आनंद देऊन जातात.

.......आनंद

Sunday, March 27, 2011

मला भेटलेल्या वाटा – भाग १


 

सरळ वळण हा लेख लिहिला तेव्हा पासून मनात विचार येत होता कि वळणं ज्या रस्त्यावर असतात त्या वाटां बद्दल काहीतरी लिहिलं पाहिजे. शेवटी वळणांना अर्थ येतात तेच मुळी वाटां मुळे. कधीतरी अचानक समोर येऊन ठेपणारी वळणं जेवढी लक्षात राहतात तेवढ्याच त्या वाटा राहतातच असं नाही.
आज वर फिरताना ज्या ज्या वाटा मला भावल्या त्या वाटा पुन्हा आठवल्या आणि नेहमी प्रमाणे मी काढलेले फोटो पुन्हा मदतीला धावून आले. याच सगळ्या वाटा आणि त्यांच्या मागे दडलेले आपल्या आयुष्याशी जवळीक साधणारे त्यांचे रंग, भाव आणि मुख्य म्हणजे त्याच वाटांवरची सरळ वळणे यांचा मला गवसलेला अर्थ.

धावत्या वाटा :

 
महामार्गावरच्या धावत्या वाटा मला नेहमीच एखाद्या राज मार्गाप्रमाणे भासतात. स्वतःच्या वेगाचा अभिमान बाळगणाऱ्या आणि प्रसंगी गर्वही करणाऱ्या या वाटा मात्र प्रत्येक प्रवासात भेटतच राहतात. त्यावर सुसाट वेगाने धावणारी वाहने आणि त्या मधली त्या राज मार्गावर खुश असलेली माणसे हि मला तेवढीच भाग्यवान वाटतात. अशा या वाटा मात्र प्रत्येकाच्याच नशिबात नसतात, कारण या वाटांना जोडणारे रस्तेच काहींच्या आयुष्यात नसतात. अशा वेळी मात्र दूर वरून या वाटांना पाहणं एवढाच हाती उरतं. आपल्या आयुष्याशी तुलना केली तर हेच दिसून येतं धावती आणि वेगवान आयुष्य प्रत्येकालाच मिळत नाही. पण ते मिळालं नाही म्हणून काही संथ वाटांवरून जाणारे काही कमनशिबी ठरत नाहीत, कारण या धावत्या वाटांवरून जाताना एखादी चुकसुद्धा सगळं उध्वस्त करू शकते आणि नेमका हेच न कळल्यामुळे अनेक आयुष्य सुरु होण्या आधीच संपतात आणि मागे सोडून जातात याच धावत्या वाटांवरचे डागाळलेले अनुभव. म्हणूनच प्रसंगी हतबल झालेल्या या वाटा मला खूप एकाकी वाटतात आणि त्याचं एकसुरी आयुष्य हे एखाद्या पिंजऱ्या सारखं बंदिस्त....!

नागमोडी वाटा :
 
वरच्या फोटो मधली डावीकडची वाट हि रायरेश्वर ची आहे तर उजवी कडची वाट हि चिखलदरा येथील. डोंगरामधून धावणाऱ्या या नागमोडी वाटा मला भावतात ते त्यांच्या अनिश्ततेमुळे आणि त्यांच्या पुढंच वळण दडवून ठेवणाऱ्या खोडकर वृत्ती मुळे. स्वताच्या मनाप्रमाणे हवा तिथे वळण घेणाऱ्या या वाटा मला खूप स्वावलंबी आणि स्वतंत्र वाटतात. आजूबाजूच्या झाडाझूडपाना या वाता हव्या हव्याश्या वाटत असाव्यात असं वाटतं. कारण या वाटांच्या वळणांप्रमाणे ती झाडेही स्वतःला सावरून घेतात. या नागमोडी वाटा प्रत्येकाच्याच आयुष्यात कधी न कधी येतातच आणि या वाटेच्या वळणावर आल्यावर माणूस गोंधळतो , पुढचं वळण कसं असेल याचा विचार करतानाच कधी अचानक एखादा सुखद धक्का मिळतो तर कधी तो अनुभव भाम्बावाणारा ठरतो. म्हणूनच स्वतः बरोबरच इतरांचं जगणं बदलवण्याऱ्या या वाटा मला आयुष्यातल्या एका न उलगडलेल्या कोड्या प्रमाणे भासतात.  

 
जंगल वाटा :

 
मेळघाटातल्या जंगलातल्या या वाटा माझ्या सगळ्यात आवडत्या वाटा आहेत. आजूबाजूच्या जंगलाच्या सोबतीने हातात हात घालून चालणाऱ्या निरागस अशा या वाटा स्वतःच्याच धुंदीत बागडणाऱ्या छोट्या मुली सारख्या वाटतात. आजूबाजूच जंगलच या वाटेची काळजी घेतं असं भासतं.
जेव्हा मी पहिल्यांदा या वाटांवरून गेलो तेव्हा या वाटांवरून जाताना झाडांच्या पानांची सळसळ हि जणू काही माझं स्वागतच करत होती. फांद्यावर बसलेली पाखरं स्वतःच्याच धुंदीत चिवचिव करत गाणी गात होती. गर्द झाडीमधून डोकावणारं निळ आकाश सुद्धा जणू काही या जंगलवाटे कडे डोकावून पाहत असल्या सारखं क्षणभर मला जाणवलं. कदाचित त्यालाही या वाटेवरून एकदा तरी चालावं असं वाटत असेल. शांतता म्हणजे काय हे मला त्या जंगलातल्या किलबिलाटातहि जाणवत होतं. कारण जंगलाचा आवाज हाच मुळी शांततेचा असतो असं माझं ठाम मत आहे. या वाटेवरून चालताना ती कधी संपूच नये असं वाटत राहता.
यातच पावसाची एक सर् आली आणि हि जंगल वाट ओली झाली ,पाण्याचे ओघळ वाटेवरून घरंगळून उजव्या बाजूला पाण्याचंछोटं डबकं साचलं. आणि जणू काही त्यात पडलेल्या आकाशाच्या प्रतीबिम्बाने त्या वाटे वरून जाण्याची आपली इच्छा अशा प्रकारे पूर्ण करून घेतली कि काय असा प्रश्न मला पडला. आणि निसर्गाच्या या नितळ चेहऱ्याची थोडीशी झलक आपण पहिली याच आनंदात मी पुन्हा ती वाट चालू लागलो.

गुढ वाटा :


 
रायरेश्वर पठारावरच्या या धुक्यात हरवलेल्या गुढ धुसर वाटा मला नेहमीच पेचात टाकतात. नागमोडी वाटांची अनिश्ततता तर या वाटांमध्ये खच्चून भरलेली तर आहेच पण त्याच बरोबर धुक्यात हरवलेल्या या वाटा गुढ सौंदर्य स्वतःमध्ये दडवून ठेवल्या सारख्या दिसतात.
धुक्यात समोरचं काही दिसत नाहीच पण जेव्हा आपण त्या धुक्या मध्ये शिरतो तेव्हा मात्र आपल्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला होते आणि अर्थातच आजूबाजूला असलेल्या निसर्गाच्या किमेयेचीही. डावीकडच्या फोटो मध्ये दरीच्या बाजूने धुक्यात चाललेली गाडी आणि जणू काही जगाशी संपर्कच नसल्यासारखी ती गुढ वाट मला आजही तितकीच भावते जितकी त्या वाटेवर गाडी चालवताना मला ती तेव्हा भावली होती. प्रत्येक वळणावर मनात निर्माण होणारी उत्सुकता आणि त्यावर प्रत्येक वेळी मिळणारं सुखद उत्तर असं तो प्रवास करत ती वाट पठारावर पोहोचली.
पठारावर पोहोचल्या नंतर तीच गुढ वाट एक पायवाट झाली आणि झाडाझुडपातून जेव्हा जाऊ लागली तेव्हा ती आणखीनच सुंदर वाटू लागली आणि एका मोठ्या वृध्द झाडाच्या पसरलेल्या फांद्यांच्या खालून पुन्हा दिसेनाशी झाली. जणू काही त्या वृध्द झाडाच्या आश्रयाने ती इतकी सुरक्षित झाली होती कि आजूबाजूचा भानच तिला उरलं नव्हतं . 

लाल मातीच्या पायवाटा :



 
राजगडाच्या वाटेवरच्या या लाल मातीच्या वाटा खरतर वाटा नव्हेतच ,कारण पावसाळ्यात याच वाटा पाणी वाहून नेणाऱ्या जल वाहिन्याच होऊन जातात. पण तरीही प्रत्येक ट्रेक मध्ये त्या कुठे नं कुठे तरी भेटतात आणि या वाटांवरूनच अनेक जण अनेक किल्ले सर करतात.
कधी फसव्या ,कधी आखूड, कधी निसरड्या, कधी पसरट, कधी खडकाच्या तर कधी आजूबाजूच्या गवताने झाकून गेलेल्या या वाटा प्रत्येक भटक्यांच्या फार जवळच्या असतात. चुकलेल्या वाटाही बऱ्याचदा नव्या वाटांचा शोध लावून देतात.  आजूबाजूच्या वाळलेल्या झाडा झुडपांना घासत खर खर असं आवाज करत या वाटांवरून जाताना त्या कधी आपल्याशी बोलू लागतात हेच कळत नाही. उन डोक्यावर आलेलं असताना काही वाटा झाडाच्या सावली मधे एखादा खडक समोर आणून ठेवतात आणि नकळत आपल्याला बसायला सांगतात. 
चालता चालता एखाद्या ठिकाणी अचानक वाटेला फाटा फुटलेला असेल तर एक वाट नकळत हाक मारून बोलावते आणि आपल्याला तिच्या सोबत घेऊन जाते. ऋतू प्रमाणे रूप बदलणाऱ्या या वाटा त्याच्या याच गुणधर्मामुळे लक्षात राहतात आणी पुन्हा पुन्हा या वाटांवरून गेलं तरीही नव्या वाटतात.

                                           ....आनंद


Saturday, March 19, 2011

सरळ वळण .....!




चालता चालता ठेच लागावी आणि आणि आयुष्याने वळण घ्यावं असं होतं कधी कधी. माणूस म्हणून जगण्याचा अट्टाहास असेल तर मात्र कुठलीही पायवाट असेल तरीही निराशा येत नाही. आता पर्यंत बराच फिरलो, कोणाच्या मते खूप कमी असेल कदाचित कोणाच्या मते फार जास्त असेल पण या सगळ्यात मला गवसत गेलं ते या निसर्गाचं गुढ आणि ते या पुथेही चालूच राहील या शंका नाही. पण या सगळ्याला सुरुवात झाली ती शेवटी इथूनच आणि संपणार सुद्धा इथेच, म्हणून मग ठरवलं थोडं मागे वळून पहायचं आणि तोच जाणवलं कि खूप वळणं येऊन गेली आहेत आणि सगळी मी सरळपणे पार करत आलो आहे आणि याच वरून सुचलं या वेळच शीर्षक “सरळ वळण “.
तर अशा अनेक सरळ वळणावर मला गवसलेली निसर्गाची रूपे, चमत्कार आणि खूप साध्य वाटणाऱ्या अशक्यप्राय गोष्टी.

गवतावरचे थेंब :
 
वाटेवरून जाताना सहज गवतावर पाण्याचे थेंब दिसले. थेंबांनी अर्थातच त्यांच्या सौंदर्यामध्ये भरच घातली होती .मनात विचार सहज विचार आला खरंच गवतासाठी त्या थेंबांच महत्व जास्त असेल कि थेंबाला त्या गवताच्या पात्याचा आधार वाटत असेल ?  आपलं आयुष्यही असाच असतं नाही का ? आपलं आपलं म्हणून आपण शोधात बसतो ते खरंच आपलं असतं , कि जे आपल्या कडे आहे पण जाणवत नाही ते आपलं असतं?
कदाचित यातच आयुष्याचं कोडं दडलेलं असावं. आपण आपल्या परीनं ते शोधण्याचा प्रयत्न करायचा बस्स.......!

विहीर :
 
राजगडच्या पायथ्याशी गावात या विहिरीचा फोटो जेव्हा मी काढला तेव्हा मनात हा विचार नव्हता जो आता आलाय.  आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक गोष्टी आपल्या आयुष्याशी किती साधर्म्य दाखवत असतात , आपण त्या कडे कधी अनाहतपणे तरी कधी जाणूनबजून दुर्लक्ष करत असतो. विहीर हि एक अशीच मला भूल घालणारी व्यक्ती. हो व्यक्तीच. कारण मला दरवेळी विहीर पाहिल्यावर तिला एक व्यक्तिमत्व असलयाचा भास होतो. पावसाळ्यात पाण्याने भरून आनंदाने भरलेली आणि उन्हाळ्यामध्ये पाणी खोल गेल्यावर रडवेली झालेली विहीर मला फार जवळची वाटते. तिचे बदलणारे भाव जाणायला कुणालाच वेळ नसतो असं सारखं जाणवतं. कठडयावरून पाणी भरणारी मानसं आपल्याशी कधीतरी बोलतील अशी वेडी अशा लावून बसलेली विहीर मला फार निरागस वाटते.


 
पहिला सूर्योदय :

नवीन वर्षाचा पहिला सूर्योदय टिपताना फार भारावून जायला झालं होतं मला. पहाटे झाडांच्या फांद्या मधून येणारी ती कोवळी किरणे पाहून क्षणभर वाटलं यांना कळत असेल का नवीन वर्ष , त्यांना असेल का त्याचा अप्रूप ? कि ती आपली नेहमी प्रमाणे सकाळी धरणीला भेटायला आली असतील ?  पहाटेच्या त्या किरणांनी मला पुन्हा एकदा पेचात टाकलं होतं. आणि माणूसपणाच छोटे पण सिध्द केलं होतं. नवीन वर्षाच्या स्वागताला माणूस जय्यत तयारी करत असतो , पण हि किरणे मात्र आपसूक पणे नेहमी प्रमाणे येत राहतात. न कुठला हेवा न कुठला अहंकार . माणसाला येऊ शकतं असं राहता ? सगळ्या काल्पनिक बंधनांना तोडून फक्त माणूस होता येईल ?
अवघड आहे खरं पण अशक्य नक्कीच नाही , ........नाही का ?

 
इंद्रधनू : 
 


चिखलदरा इथे गाविलगडला काढलेला हा दुहेरी इंद्रधानुश्याचा फोटो पाहून मला अजूनही हरवून जायला होतं. पश्चिमेला सूर्य अस्ताला जात होता आणि पावसाची एक सर् जणू काही त्याला निरोप द्यायला धावून आली होती. आणि दोघांच्या मिलनातून पूर्वेला इंद्रधनू कधी उमटलं हे कळलंच नाही. डोंगराच्या एका टोका पासून दुसऱ्या टोकापर्यंत अर्धगोलाकार इंद्रधनु मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो. कितीही वेळा पाहिलं तरी मन भरत नव्हतं.  क्षणिक मिलनातून जन्मलेलं इंद्रधनू सुद्धा क्षणिकच असतं पण त्या छोट्या आयुष्यात ते अनेकांना भुरळ घालत.  अजून थोडं जगावं असं त्याला वाटत नसेल का ? पण वाटलं तरी त्याच्या हातात काहीच नसतं. त्याचं आयुष्य पराधीन असतं. पण तरीही ते जेव्हा जेव्हा जन्म मिळेल तेव्हा सप्तरंगाच दाखवतं आणि काळवंडलेल्या आकाशाला नवे रंग देतं.
मला वाटतं इंद्रधनू आयुष्यात असलेल्या सप्तरंगांची आठवण माणसाला करून देत असावं. मळभ
चढलेल्या आयुष्याला नवीन रंगांची ओळख करून देत असावं. आणि आयुष्याच्या अनिश्तीततेची जाणीव सुद्धा.
 
फुलपाखरू :
 
फुलपाखराचे फोटो काढणं हा हि माझा एक आवडता छंदच आहे. फोटोतल फुलपाखरू राजगडला काढलेलं आहे. मुळात फुलपाखरू हेच मुळी मला एक अशक्यप्राय गोष्ट वाटते. देवाने माणसाला घडवायला जेवढा वेळ दिला असेल त्या पेक्षा कितीतरी जास्तपट वेळ फुलपाखरू घडवायला त्याने दिला असला पाहिजे. कारण सौंदर्य म्हणजे काय हे फक्त इथेच कळतं.  फुलपाखरू काय, इंद्रधनू काय, सर्वात सुंदर अशा गोष्टीचं आयुष्य हे कमीच असतं. , जेमतेम हातावर मोजता येईल इतक्या दिवसांच आयुष्य लाभलेलं फुलपाखरू भिरभिरत जेव्हा फिरत असतं तेव्हा वाटतं कि छोट्याश्या आयुष्याचा पुरेपूर उपभोग घेण्यासाठी तर ते धडपडत नसेल ? रायगडावर एकदा वाऱ्याच्या प्रवाहाशी झुंज देणार फुलपाखरू पाहिलं आणि वाटलं स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि हक्क साठी लढण्याचं बळ कुठून येत असेल त्याच्यात ?

आंतरिक सौंदर्या पेक्षा बाहरी सौंदर्याला सर्वस्व मानणाऱ्या जगात स्वतःच्या सौंदर्याची जाणीव सुद्धा नसलेलं ते फुलपाखरू मला निगर्वीपणाचा एक चमत्कारच वाटतं.

                                                                      .....आनंद
             

Sunday, February 20, 2011

रायगड – पाली Bike Expedition Trip - 12 Feb 2011


फेब्रुवारी महिना जसा सुरु झाला तसं या महिन्यामधल्या आऊटिंगचा विचार मनात घोळत होता. आणि शनिवार रविवार असं रायगड, पाली, असा प्लान ठरला. पण या वेळी बाईक वर जायचं असा मनात येत होतं आणि मग शेवटी तोच बेत केला.
शनिवारी पहाटे ६.३० वाजता पौड रोड वरून चांदणी चौक, ताम्हिणी, निजामपूर या रोड ने जायचं ठरवलं. या मार्गाने पहिल्यांदाच जात असल्यामुळे थोडी माहिती काढून ठेवली होतीच. थंडी तशी ओसरू लागली असली तरी पहाटे मात्र चांगलाच गारवा जाणवत होता. पिरंगुट ओलांडून पौड पर्यंत आलो. इकडे थंडी जरा जास्तच होती. मुळशी ओलांडून ताम्हिणी च्या रस्त्याला लागल्यावर मात्र  मन नेहमी प्रमाणेच हरवून गेलं. 

 पूर्वेला सूर्य अजून उगवत होता. रस्त्याच्या आजूबाजूला मधेच एखादं घर झोपेतून जागं होत होतं. आणि त्याची खूण म्हणून छपरातून जणू काही ढग बाहेर सोडत होतं. काही ठिकाणी पाणी तापवण्यासाठी पेटवलेल्या बम्बातून येणारा धूर तसाच वर साचून राहिला होता, आणि तो ढगासारखा भासत होता. डोंगराच्या कुशीत लपलेली घरं पाहून त्यांचा हेवा वाटत होता. ती सर्व घरं खरं अर्थाने निवारा वाटत होती.
ताम्हीनीतून तसाच पुढे निजामपूर च्या दिशेने निघालो. मध्ये विले भागडचा  MIDC लागलं. भागड वरून निजामपूर आणि मग माणगाव असं सरळ रोड आहे. रस्ता अतिशय सुंदर आहे. इथे सुंदर म्हणजे रस्त्याच्या सद्य परिस्थिती बद्दल बोलत आहे. साधारण २ तासा मध्ये माणगावला पोहोचलो. इथून पुढे NH 17 वरून सरळ महाड पर्यंत जातं येतं. निजामपूर वरून पाचोड ला सुद्धा जातं येतं पण त्या रोड बद्दल माहिती नसल्या मुळे माणगाव वरूनच आलो.महाड ला पोहोचल्यावर रायगड रोड ने सरळ रायगड पर्यंत पोचता येतं. साधारण ३.१५ तासा मध्ये रायगड ला पोहोचलो. 


रात्री तिथेच मुक्काम करायचं असल्यामुळे आधीच रुम बुकिंग करून ठेवलं होतं. तिथे थोडं फ्रेश होऊन साधारण ११.४५ ला रोपवे चा बुकिंग केलं . हा रोपवे Jog Engineering Limited ने १९९४ मध्ये बांधायला सुरु केला आणि १९९६ मध्ये तो बांधून पूर्ण झाला. मी पहिल्यांदाच रोपवे मध्ये बसत असल्यमुळे मनात प्रचंड उत्सुकता होती.  परदेशात जाऊन तिथल्या गोष्टींचा माणस किती कौतुक करतात आणि आपल्या देशात आणि तेहि महाराष्ट्रात असलेल्या या आणि इतर अनेक गोष्टी आपण किती सहज उडवून लावतो किवा दुर्लक्षित करतो याचं नवल वाटलं. ७६० मिटर चा तो रोपवे पाहून Engineering च्या कौशल्याला खरंच दाद द्यायला होत होतं. आणि हा रायगड सारख्या किल्ल्यावर आहे याचंही कौतुक वाटत होतं.
१६७४ मध्ये शिवाजी महाराजांनी रायगडला स्वराज्याची राजधानी केलं. आणि तेव्हा पासून रायगड इतिहासाचा साक्षीदार म्हणून उभा आहे. अशा या पावन गडावर ठिकठिकाणी स्वराज्याच्या खुणा दिसून येतात आणि त्या काळातील पुढारलेल्या संस्कृतीची जाणीव होते. अतिशय योजनाबद्ध अशी गडाची बांधणी आणि अगदी सूक्ष्म गोष्टीमधेही दिसणारी शिस्ताबद्धता पाहून भारून जायला होतं.
राणी महाल, दरबार, मेणा दरवाजा जेथून जिजाऊ येऊन किल्ल्य्वर पहाणी करून जायच्या, जगदीश्वर मंदिर ,पालखी दरवाजा ,बाजारपेठ ,महादरवाजा अशा अनेक गोष्टी आपल्याला भूतकाळ समोर उभा करतात. बाजारापेठेतील दुकानांची रचना पाहून तर फार नवल वाटतं. दुकानाच्या मागच्या भागात सामानाची साठवणूक करायची खोली, पुढच्या भागात विक्रीचा उंचवटा, हे सगळं पाहून त्या काळातही किती विचार करून रचना केली जायची हे सिद्ध होतं.
नगारखान्याच्या दरवाजासमोर चा acoustic design पाहून थक्क व्हयला होतं. २०० फुट अंतरावरचा हळू आवाजात बोललेलं महाराजांच्या पुतळ्यासमोर उभा राहुन अगदी स्पष्ट ऐकू येतं. दरबाराची शिस्त किती कडक होती हे या वरून दिसून येतं.


टकमक टोक , हिरकणीचा बुरुज यांच्या अख्ख्यिका तर इतिहासात अजून कित्येक वर्ष ऐकल्या आणि बोलल्या जातील. आणि सर्व मराठ्यांचं उर अभिमानाने भरून येत राहील. शिवाजी महाराजांचा पावन स्पर्श ज्या भूमीला झाला त्या भूमीला प्रत्येकाने एकदा तरी भेट द्यायलाच हवी यात कुठलीच शंका नाही. महाराजांच्या समाधी समोर नतमस्तक होऊन प्रत्येकाने त्या राजाला मनोमन मुजरा केल्याशिवाय राहवत नाही हेच खरं. सर्व गड पाहून मन भारावून जातं.
साधारण ६ वाजण्याच्या सुमारास परतीच्या वाटेला लागलो. राहण्याची सोय पायथ्याशी असल्यमुळे गडावरून खाली उतरणं गरजेचंच होतं. म्हणून मनात नसतानाही खाली आलो.
साधारण ७.३० वाजताच गाव झोपी गेलं आणि एक गुढ अशी शांतता पसरली. शहरात कधीच न अनुभवता येणारी ती शांतता इथे मात्र रोजच वास्तव्याला असते हे पाहून आपल्या छोटेपणाची पुन्हा एकदा जाणीव झाली. आकाशात चांदण्या चमकत होत्या, आणि चंद्र आपला पांढरा प्रकाश गडावर पांघरत होता. रात्रीच्या मिट्ट काळोखातही गड मात्र अतिशय निडर आणि सुंदर भासत होता.
पहाटे ६.३०ला मला जाग आली. बाहेर येऊन पहिल तर गडामागून सूर्य किरणे दिसू लागली होती. आणि पुन्हा नव्या पहाटेचं स्वागत करायला पाखरं गाणी गात होती. मागे असलेल्या विहिरवर पुन्हा मोट फिरत होती. 

९.३० वाजता रायगडावरून निघालो . पाचोड गावात आल्यावर पाली साठी रस्त्याची चौकशी केली. गावकऱ्यांनी महाडला न जाता सरळ समोरच्या रस्त्याने जायला सुचवले. थोडा रस्ता मध्ये खराब आहे पण गाडी जाते असंही सांगितलं. त्या प्रमाणे निघालो. सुरुवातीला बरा असलेला रस्ता हळूहळू आपला रूप बदलायला लागला. मध्ये छोटी छोटी गावं, वाड्या लागत होत्या. थोड्या वेळाने पूर्ण दगडाचा कच्चा रस्ता सुरु झाला. लाल माती आणि खडक या मधून बाईक चालवताना दमछक होत होती. थोड्या वेळात खराब रस्ता संपला. आणि चांगला रस्ता सुरु झाला. गुगल च्या map वर नसणारा हा रस्ता मात्र मला एक वेगळाच अनुभव देयुन गेला. आजूबाजूला गर्द झाडी, त्या मधून गेलेला रस्ता, पसरलेले डोंगर, आणि दूरदूर माणसांचा अगदी सूक्ष्म अस्तित्व हे फार सुखावणार होतं. साधारण तीन डोंगर पार केल्यावर आम्ही माणगावच्या दिशेला लागलो. थोड्याच वेळात माणगाव आलं आणि आम्ही पुन्हा NH 17 ला लागलो.
NH 17 वर साधारण ४० K.M. सरळ गेल्यावर कोलाड च्या जवळ पालीला जाण्यासाठी फाटा लागतो. तिथून पाली ८ K.M आहे. १२ वाजता पालीला पोहोचलो. गणपतीचा दर्शन घेऊन महाप्रसाद घेतला. थोडा वेळ मंदिरात बसून मग परतीचा प्रवास सुरु केला. पाली वरून खोपोली आणि मग खंडाळा, लोणावळा आणि मग वाकड मार्गे पुन्हा पौड रोडला पोहोचलो.
साधारण ३६० K.M च्या या प्रवासात मात्र पुन्हा एकदा काही नवीन गोष्टी गवसल्या. आणि नेहमीची वहिवाट सोडून कधीतरी नव्या वाटा शोधल्या पाहिजेत हे जाणवलं, कारण नव्या वाटाच नवं बळ देत असतात काहीतरी न अनुभवलेलं अनुभवायला. पण समोर येईल ये स्वीकारण्याची मनाची मात्र तयारी हवी हे मात्र खरं. शेवटी प्रत्येक प्रवास हा काहीतरी शिकवतच असतो मग तो दूरचा असो नाहीतर जवळचा. याच विचाराने पुढचा प्रवासाचा बेत आखण्याची उर्मी दिली हीच कदाचित या वेळच्या प्रवासाने दिलेली भेट होती.


                                                                  ....आनंद