Powered By Blogger

Friday, September 30, 2016

जगण्यातला अर्थ





नको नभा तो तुझा पसारा
नको पर्वता तुझा नजारा
अफाट तुझिया दुनियेमध्ये,
एकही घरटे नसे पामरा....!

नको सागरा तुझा किनारा
नको दिशांचा तोच इशारा
धुंडाळूनी या जगास साऱ्या,
एकटाच तो फिरतो वारा....!

इथेच थांबून वळतो आता
इथेच थांबून जगतो आता
हरवून गेले तेच शोधतो
विसरून गेले ते आठवतो..!

हिशोब सारा इतका सोपा
अवघड उगाच करुनी बसलो,
उगा धावून काय मिळवले
चैन जीवाचा गमवुनी बसलो..!

सावलीत या सुखावतो अन,
ओंजळीत या घेतो माती...
विहीर अजून ती तशीच ओली,
कवेत घेतो काळे मोती...

कुठे झऱ्याची मंजुळ गाणी
कुठे वाहते नितळ  पाणी,
कुठे डोलते एकच पाते
जगास साऱ्या ते न्याहळते..!

प्रकाश खेळे लपंडाव अन
कधी सरी या डाव साधती,
ओथंबून हि पाने हिरवी
त्या तालावर स्वैर नाचती...

मुक्त पहाटे दिसे पाखरू,
बंधन त्याला नसे उडाया,
सांजवेळ हि येता दाटून,
घरट्यातच मग मिळते माया,

निसर्ग सांगे कसे वहावे
कसे लुटावे त्याचे देणे,
द्यावे घ्यावे आनंदाने,
अन नांदावे सोबतीने...!

साधे सोपे सरळ जगावे
नकोच खोटा तो देखावा,
श्वासाचे ते गणित नसावे,
जगण्याला या अर्थ द्यावा....!

                                                    आनंद
                                                                                                                         30 सप्टेंबर 2016




Thursday, August 25, 2016

नज्म : आशियाना

हिंदी मध्ये नज्म वगैरे लिहावी इतकं माझं हिंदी अर्थातच चांगलं नाही. पण एक वेगळा प्रयत्न म्हणून हा प्रयोग. कालच इथे मोठा भूकंप झाला, शे दोनशे माणसं बघता बघता नाहीशी झाली. डोंगरात वसलेलं गाव दिसेनासं झालं आणि नुसते दगड विटांचे ढिगारे दिसू लागले. बेघर झालेली लोकं आणि त्यांची उध्वस्त झालेली घरं म्हणजेच त्यांचे ते आशियाने . एका पक्ष्याचे नजरेतून हे पाहिलं आणि ओळी सुचत गेल्या.




खिडकीसे झाक कर डुबता सुरज देख रहा था मै , तभी एक कोने मै वो नन्हासा पंछी नजर आया.

कभी नीचे झुककर तो कभी नजर आसमा कि तरफ देखता रहा वो , जैसा कोई गेहरा साया ...

उससे आंख मिलाकर मैने कहा , अंधेरा घेर रहा है , पेड की टेहनी के उपर तेरा आशिया राह देख रहा होगा,
जा उड़ जा अपने आशियाने मै....


मुस्कुराके नजर छुपाते हुये उसने कहा, रास्ता याद नाही आ राहा है, जाने कहा जाना था, राहें भी धोका देंगी ऐसा तो नहीं सोचा था.
फिर मुडकर वो बोलता रहा, कभी आसमां से  कभी जमीन से ,
मै सुनता रहा, जानते हुए की शायद कुछ गहरा जख्म हुआ है उसे ...!
  
कल जिस पतें पर मेरा आशियॉं था ,वहा तो कुछ अलग ही नजारा है ,
ना वो राहें  दिखती है, ना वो नज़ारे दिखते है, कुछ तो पत्थर के ढेर पड़े है गाव मै,
ना जाने कौन छोड़ गया है पीछे अपना सामान.....

आधा अधुरा सा है सब कुछ, ना वो आवाज है ना वो बातों की गुफ्तगू ,
इतनी बैचैनी तो न थी मेरे आशियाने मै कभी , भले लब्ज़ कभी रूठे हो ...

सुर तो हमेशा बसते थे गलियोमै , उन्हिसे फिर शामे रंगीन हुआ करती थी ,
आज तो सिर्फ अंधेरा है, जाने वो खिड़की के कोने मै जलते हुए दियेमें “रूह” क्यों नहीं है,
बहते हुए हवा ने तो शायद बुझाया नहीं उसे,  या फिर किसीको आज वक्त का एहसास नहीं है...

लोग भी तो नहीं है आज, शायद कही गए है..
मैंने सोचा छत के ऊपर बैठकर थोडा इंतजार करू , शायद कोई गुजरेगा इस राह से ,
पर ना वो छत अभी वहां  है, ना मंजिलो को पोहोचाने वाले रास्ते ....

कुछ तो गुम हुआ है आज मेरा, नजारों का रंग है , या वादियोंकी वो  सरसराहट ,
जिससे कभी होती थी बाते बरसात की या फिर ठिठूरती  सर्दीयोकी ,

फिर कही रंग बदलते पेड़ खुश होके हम पंछियों को बुलाते थे , अपनी टहनी  पर खेलने,
फिर कुछ दिनों मै गिरा देते थे उन पत्तो को जमिन पर, और खुद खड़े रहते थे नए पत्तो के ख्वाब देखते हुए धुपमें ...!
बादल फिर कभी छॉंव  बन जाते थे उस उजड़े हुए पेड़ की ,

और फिर बरसती थी बूंदे  जो खुशबु संग लती थी मिटटी की, बाद मै पता चला इसे कहते है मौसम, हमें तो लगता था ये तो उस पेड़ की ये जिंदगी है , पर ये तो पूरी कौम की कायनात थी....!

आज वही ढूँढता रहा सेहरामे , पर कुछ ना मिला, कही दूर से एक माँ  आंसू बहाती नजर आई ,
फिर पता चला उसका नन्हा कही गम हुआ है उन पत्थरो के ढेर मै,
फिर मैंने गौर से देखा उन पत्थरो को , और मुझे नजर आई वो खिड़की की एक टूटी कांच, कही बिखरे दरवाजे तो कही पुराने तस्वीरों मै छुपा बचपन, तो कही मुरझाए फुलोकी एक टहनी  ..!
वही ढेर मै दब गए थे वो लब्ज , जो जिन्दा करते थे उस वादी को, और फिर जिंदगी चलने लगती थी सूरज के साथ हाथ मिलाकर ...

ये विराना तो न था आशियाँ मेरा , इसलिए भूल गया हूँ रास्ता अब मंजिल का जानबुजकर, शायद भुलनेपर फिरसे ख्वाब जिन्दा हो और सुबह होते ही नजर आ जाये वही पुराना आशियाना......!

तब तक बैठता हूँ यही पे, अंधेरा वैसे तो सब जहग है, रात गुजारने के लिए दिये  की जरुरत तो नहीं है अभी,
चाँद भी तो छुपा है डरकर  , और सितारों को बादल ने झॉंक  दिया है, शायद वो भी न देख सकते होंगे वो बिखरा हुआ आशियाँ आसमां से ,
आज जरुरत है ख्वाब की जो सच हो जाये दिन के उजाले मै और संवर  जाये मेरा आशियाँ फिर से बसंत की बहार में ....!


आनंद
२५ ऑगस्ट २०१६ 


Note : Grammatical correction helped by Gajanan Chavan :-) 

Wednesday, July 27, 2016

उगाचच सहजच 1 : Open Road Diaries :-

माणसं बदलतात कि भोवतालची परिस्थिती ?
मला विचाराल तर मी म्हणेन दोन्ही नाही.
मुळात बदलत काहीच नाही. एकाच ग्रहावर राहून एकीकडे रात्र अन एकीकडे दिवस असतोच कि. बदलतो तो दृष्टिकोन. आरसा मागे बघणारा असला तरी पुढे ठाकणाऱ्या धोक्यापासून आपल्याला वाचवण्यासाठीच असतो. गोष्टी आहेत तिथेच असतात, तरीही इगो आड येतोच. समस्या मोठी नसतेच मोठा असतो तो अहंकार. 

जगाने चांगलं म्हणावं म्हणून चाललेली धडपड खरतर माणूस म्हणून माणसालाच फार मागे नेते , तरीही चांगुलपणाची हाव काही जात नाही. आजूबाजूच्या कित्येक मनांमध्ये असूया नांदत असते हे डोळस माणसाला सुद्धा कळत नाही.
वाट फुटेल तिकडे धावणारं जग आजूबाजूला असताना खरंतर "साधं सरळ सोपं" हे शब्द जगण्याला लागू केले तर त्यातुन मिळणारा आनंद अनुभवणं एवढंच खरं आयुष्य असतं , बाकी सगळा इतरांसाठी मांडलेला देखावा असतो.  
साधेपणा हा मुळात विकत घ्यायचा प्रकार नाहीच तो उपजतच असावं लागतो.
                                                                आनंद
                                                                                                                            27
जुलै 2016

Monday, June 6, 2016

पाऊस इथला ,पाऊस तिथला

मायदेश सोडून दुसरी कडे जाण्याची हि काही पहिली वेळ नाहीच. तसं पाहायला गेलं तर इटली हा चौथा देश ,पण तरीही दरवेळी नव्या देशातला एक नवीन अनुभव घराची ती ओढ आणि नाळ अजून घट्ट करत असतो.

यावेळी इटली मधल्या पावसाने मायदेशातल्या पावसाच्या आठवणी जाग्या केल्या, एकाच वेळी दोन्ही कडे बरसत असूनही इथे परक्या देशात बसून खिडकीतून बघताना तोच पाऊस आपला वाटला नाही आणि आठवला तो चिंब पाऊस जो माझ्या मायदेशातल्या अंगणात , दारात, गावात शहरात ,बरसणारा. लहरी असूनही प्रत्येकाला किती लोभस आणि हवाहवासा असतो तो, तेव्हा जाणवलं कि मुळात तो आपल्या साठी जीवनाचा भाग आहे नुसतीच निसर्गाची किमया नाही.

तो नुसताच बरसत नाही तर धरणी ला गंधाळून चोहीकडे एक ताजेपणा भरून जातो. दूर डोंगरावरून धबधब्यांना जन्म देतो तर कुठे नदीत मिसळून एकरूप होऊन जातो. कुठे शिवारातल्या कोरड्या मातीच्या ढेकळांना सुखावून नवं बीजांकुर रुजवतो.
त्याला सीमा नसते मनसोक्त कुठेही बरसावं अन वाटलं तर रुसून बसावं. कधी हलक्या सरींनी गारव्याला बोलवावं तर कधी बेभान वाऱ्यावर थेंबानी आरूढ होऊन तिक्ष्ण बाणांसारख तुटून पडावं.

त्याला अर्थात शब्दात बांधणं कठीण,
शेवटी पाऊस हा पाऊसच असतो पण त्याला थोड्या वेगळ्या अंगाने पाहिलं तर त्यानेही प्रत्येक देशाची संस्कृती , तिथला पेहराव किंवा अगदी मानसिकता आत्मसात केली आहे कि काय असं वाटत राहतं.

पाऊस इथला अर्थात इटली चा आणि पाऊस तिथला अर्थात मायदेशातला...

पाऊस इथला,
वेधशाळेची वेळ पाळणारा
नियमात बसून बरसणारा,
पण तरीही,
व्हायोलिन च्या स्वरांसारखं
मनाच्या तारा छेडणारा...!

पाऊस तिथला,
भटक्या उनाड ढगांचा
वाटेल तिथे रेंगाळणारा,
गंधाळ ओल्या मातीचा,
हलक्या मधुर सुरांचा...!   ||1||

पाऊस इथला,
एकटा दुर्लक्षित,
सतत नाती शोधणारा
बरसून गेल्यावर सुद्धा
पाऊलखुणा मिटवणारा..!

पाऊस तिथला,
प्रार्थनेत, स्वप्नात
सतत डोकावणारा..
नद्या डोह शेत तलाव
साऱ्यात जीव ओतणारा..! ||2||

पाऊस इथला,
हुशार व पुढारलेला
हिशोबी आणि व्यवहारी..
वीज वादळ साऱ्याला
अंतर ठेवी दारी...!

पाऊस तिथला,
अडाणी अन निस्वार्थी
काहीच नसे स्वतःसाठी,
पाखरं, झाडं ,डोंगरांशी
बांधे रेशीमगाठी..!  ||3||

पाऊस इथला,
मुका आणि अलिप्त
एकटाच बरसणारा,
चिंब भिजवायला ,
आसुसलेला...!
 
पाऊस तिथला
चिखल माती पाण्याचा ,
कंदिलाच्या वातीचा,
चुली पुढल्या रात्रीच्या ,
सुखावणारया घासाचा..!


आनंद
5 जून 2016


Tuesday, May 31, 2016

माणसांतले “सूर” : भाग १

माणसांतले “सूर”  : भाग १

मुळात माणसांवर लिहावं असं खरतरं काही विशेष असं कारण नाही पण एक वेगळा प्रयत्न आणि त्यात आजूबाजूच्या म्हणा किंवा कुणा दुसर्याकडून कानावर आलेल्या अशा खऱ्या आणि तितक्याच काल्पनिक वाटाव्या अशा व्यक्ती रेखा किंवा मुळात त्या माणसांच्या प्रकृती या इतक्या लक्षवेधी आहेत कि थोडं विचार केला कि आपल्यालाच त्या खूप जवळच्या वाटू लागतात. अर्थात कुणालाही दुखावण्याचा हेतू नाहीच पण माणसातल्या विविधतेवर नजर टाकली तर किती गम्मत येते हा बघण्याचा हा खटाटोप. हे करताना मला जाणवलं कि खरतर आयुष्य सुरांचं बनलेलं आहे प्रत्येक जण आपला सूर जमेल तसा लावत असतो त्या मुळे प्रत्येक माणसाचा एक स्वतः चा असा सूर असतो आणि मग त्यात हवा तसा बदल करत तो जीवन गाणं गात असतो. प्रत्येकाच्या आयुष्याला स्पर्शणार्या या माणसांचे “सूर शोधण्याचा एक प्रयत्न इथे केलाय.


“नकार-तक्रार” सूर” आळवणारया व्यक्ती : अर्थात नावावरून जो अर्थ प्रतीत होतोय तशाच प्रकारची हि माणसे असली तरी या सगळ्याचं मूळ शोधणं गरजेचं आहेच. सर्वसाधारण पणे हि माणसे कधीच “हो” म्हणत नाहीत पण “तक्रार” ,“नकार” किंवा “नाही” चा सूर मात्र लावतात. अर्थात हो म्हणायला आधी ऐकावे लागते हि बाब वेगळी. पण मुळात नकार कशाला द्यावा हे हि कळू नये इतकी यांची मजल असते. उदाहरणे द्यायची झालीच तर खूप आहेत , जसे चहा गरम असेल तर “छे.. फार गरम आहे, मध्यम आहे तर साखर कमी आहे , साखर आहे तर कप तुटका आहे, कप छान नवीन आहे तर दुध चांगले नाही  आणि सगळे छान आहे तरी हवा खराब आहे आणि त्या मुळे चहा कसा चांगला लागत नाही हे सुद्धा हि माणसे सिध्द करू शकतात. यांच्याकडे कार असेल तर काही विचारूच नका, ,तुम्हाला यांच्या गाडीत बसायचा योग आलाच तर तुमच्या संवादात पुढची वाक्ये आलीच पाहिजेत, तुम्हाला काहीही करायची गरज नाही , “रस्ता कसा खराब आहे, रस्ता चांगला असेल तर लोक कसे नियम भंग करतात (हे बोलताना स्वतःची कार सिग्नल तोडून पुढे नेतील आणि उलट अशा पठ्ठ्यांना असेच केले पाहिजे हे हि सांगतील), कार कसा आवाज करते, हल्ली कार वाले किंवा गाडी दुरुस्त करणारे कसे फसवतात, सिग्नल बनवणारे लोक कसे मूर्ख आहेत, सगळे लोक एकाच वेळी कशाला घराबाहेर पडतात. अर्थात हे महाशय पण त्याच वेळेला गर्दीत असतात. अशा वेळी मला आपण स्वतः सुद्धा या गर्दीचा भाग आहोत हि गोष्ट हे लोक जाणूनबुजून विसरतात. पाउस पडला तरी यांना त्रास होतो आणि पडला नाही तर ग्लोबल वार्मिंग मुळे कसा दुष्काळ पडला आहे यावर एखादा मोठा लेख A.C च्या गार वाऱ्यात बसून लिहितील. अर्थात तो लेख  पेपर मध्ये छापून आला नाहीच तर आजकालचे पेपरवाले कसे पैसे खातात हे रद्दीचे पेपर विकता विकता  आपल्याला समजावतील.

  परवा असाच एक जण देव कसा निर्दयी आहे आणि मला जास्त वजन कसे दिले म्हणून दैवाला कोसताना पहिला अर्थात समोर ताटात असलेल्या पंजाबी भाजीला आणि रोटीला ऐकता येत नसल्यामुळे ती दोघं बिचारी काहीच करू शकत नव्हती आणि सकाळीच खाल्लेला बर्गर पोटातून मला का खाल्ले असं निषेध व्यक्त करू शकत नव्हताच. अर्थात इथे माझा कुणाचे “खाणे”  काढण्याचा हेतू मुळीच नाही. शेवटी मुद्दा आहे तो तक्रारीचा. प्रत्येक गोष्टीत काहीतरी कमी दिसणे हा गुण (खरतर अवगुण) असलेल्या या व्यक्तिरेखा त्यांच्या याच गोष्टी मुळे प्रकाश झोतात असतात. पण ते क्षणिक चमकण खरतर काही कामाचं नसतं.  
पण समजा कर्मधर्म संयोगाने तुम्हाला भेटलाच असा माणूस तर आपण काय करायचे हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. पण याचं उत्तर फार सोपे आहे कारण यांच्या नकार घंटे पुढे आपण फक्त “अच्छा .., हो, काय करणार, अरे वाह हो का ? , कसे काय ? ह्म्म्म्म , शशश., एवढाच करू शकतो अर्थात 
आपल्याला तेवढाच वेळ मिळतो. त्यात जर तुम्ही थोडाफार स्वतःच कल त्यांचा म्हणण्याकडे आहे असं दाखवलंत तर मग विचारूच नका कारण तुमची लवकर सुटका नाही. कधी कधी मला वाटतं अशा लोकांना स्वर्गात पाठवलं तरी हे असं म्हणायला कमी करणार नाहीत कि स्वर्ग फारच उंचीवर आहे बुवा, निदान जरा जमीन जवळ असती तर फेरफटका मारून येता आल असत. (अर्थात असे लोक नक्की कुठल्या स्वर्गात जातात हि बाब अलाहिदा J). 

या सगळ्यात गमतीचा भाग बाजूला ठेवला तर थोड्याफार फरकाने आपण सगळेच या तक्रार वर्गातले असतो. अर्थात प्रत्येकात त्याचे प्रमाण कमी जास्त असते. सुखवस्तू घरात राहून सुद्धा हल्ली प्रत्येकामध्ये तक्रारीचा सूर नक्की येतो कुठून हे शोधायचा प्रयत्न केला तर असं दिसतं कि खरतर तो आपल्याच नव्या जीवन शैलीतून आला आहे. त्या सुराचा अर्थ न जाणता एकाने तो आळवला कि इतर आपोआप त्याच्यात आपला सूर लावतात. अजून एखाद्या घोळक्याला तो सूर ऐकू गेला कि त्याचं गाणं होतं आणि नंतर तोच आपला सोबती असल्या सारखं प्रत्येकजण “तक्रार” मय होऊन जातं. कधीकधी तर इतकं कि एखाद्याला खरंच वाटेल कि हा माणूस फार हलाखीचे दिवस काढतो आहे. तक्रार, निषेध किंवा प्रतिक्रिया देणं हा निसर्गाचा नियम आहे पण त्याची जीवनशैली होता कामा नये. शरीराला चटका बसला तर ते आपसूकपणे प्रतिक्षिप्त क्रिया करून मोकळं होतं. पण त्याच गोष्टीचा निषेध करत बसत नाही. 
एकदा असेच एका ओळखीच्या नातेवाईकांकडे गेलो असता त्यांनी टीव्ही वर लागणाऱ्या त्याच त्याच कार्यक्रमांना आणि नंतर चनेल वाल्यांना नावे ठेवायला सुरुवात केली. दिवसाचे कित्येक तास ते कार्यक्रम बघणाऱ्या लोकांना सारखे नवीन प्रोग्राम कुठून मिळणार. करमणूक म्हणून एखादा तास बघितला जाणारा टीव्ही दिवसभर चालू राहिला तर अर्थात तो कंटाळवाणा होणारच. सुख वाढलं कि तक्रारीचा सूर वाढतो , आराम आला कि विचार सुचतात. सुखसोयी जितक्या जास्त तितक्याच जास्त अपेक्षा वाढत जातात. सतत काहीतरी कमी आहे असं वाटत राहिल कि माणूस तक्रारीचा सूर काढतोच. शहर जितकी जोमाने वाढत आहेत तितकीच ती अतृप्तता वाढताना दिसते आहे.
वयाने बरीच मोठी असलेली मुलेहि हट्टी दिसतात, त्याला हि गोष्ट लागतेच, त्याला नाही ऐकून घ्यायची सवय नाही अशी वाक्ये ऐकून धडकी भरायला होतं. घरातल्या बायकांना पुरुषांना जर या तक्रारीच्या रोगाने ग्रासलं असेल तर संपूर्ण घरंच सतत काहीतरी मागत राहता. घर, ऑफिस, समाज सगळीकडे सतत “ आपल्याकडे काय नाही” इथेच लक्ष केंद्रित राहतं. “Ambition” च्या नावाखाली संपूर्ण आयुष्याला तक्रारीचा सूर लावण्याआधी जगायला काय लागतं आणि काय आहे हे जर प्रत्येकाने जाणलं तर अतृप्तता नक्कीच कमी होईल. नव्याची आस असणं चूक नाहीच फक्त “त्याचीच” आस असणं हे घातक आहे. कुठल्याही महागड्या खेळण्यांशिवाय गेलेल्या जुन्या बालपणाला आठवलं कि मातीची किंमत कळते आणि धावायचा वेग आपोआप कमी होतो. शेवटी म्हणणं एवढंच आहे कि हा सूर न आळवलेलाच बरा कारण “न” चा पाढा गाणं तितकं बर नसतंच त्या पेक्षा संवेदना जाग्या ठेवून जगणं सोपं आहे.
अशाच अजून एखाद्या सुराला भेटू पुढच्या भागात...!

   आनंद

   ३१ मे २०१६ 

Saturday, April 30, 2016

कोकणातलं घर

कोकणातलं कौलारू घर. पावसात चिंब भिजलेल. अर्थात आजूबाजूने माडाच्या झाडांनी वेढलेलं. पावसाच्या थेंबाना त्या हिरव्या गालिच्यावर झेप घेऊन मग हळुवार घसरत जमिनीवर पडाव लागत होतं. समोर अर्ध गोल अंगण मध्ये तुळस आणि कोपऱ्याला एका झाडाच्या बुंध्या पासून सुरु झालेलं कुंपण . अंगणाला झाडाच्या काटक्यांचा खरतर उगाचच केलेलं वाटावं असा ते कुंपण तरीही सुबक आणि नेटकं त्याच्या बाजूला मात्र दगडी भिंत एकसारख्या दिसणाऱ्या तपकिरी रंगाची.
कोपऱ्यात फुलझाडाची वसाहत आणि त्याला आलेली गुलाब ,झेंडू ची फुले .
पारिजात मात्र वेगळा उभा , त्याच्या फुलांचा सडाही खालीच पडेल याचीही त्याने काळजी घेतली असावी असे वाटेल इतका असा त्याचा आटोपशीर पसारा. मागं एका छताखाली नारळ रचून ठेवलेले. त्याच्या पलीकडे पाण्याचा बंब.
लाल मातीच्या रंगाने उठून दिसणाऱ्या ओल्या पायवाटा आणि त्यातून वाहणारे पाण्याचे ओघळ.  परसाला एक जुना आड. हाताने ओढता येईल अशा मोटेचा. त्याच्या ओल्या काळ्या दगडाचा रंगही डोळ्यात भरेल असा दाट. काजू बदामाच्या झाडांची रेलचेल आणि आपापसात चाललेली कुजबूज.

कित्येक पावसाळे पाहिलेल्या त्या घराला हा पावसाळही नवीन नव्हताच.  पाऊस काय हे माणसाने कोकणात अनुभवाव. कौलांवरून टिपटिप पडणारे थेंब इतके तालात पडत होते कि त्याचंच गाणं व्हावं. ओसरीवर झोपाळा आणि त्याच्या जाड साखळ्या जणू  काही वाड्याच वय सांगणाऱ्या. तिथेच एक जुनी खुर्ची अर्थात डुलणारी.
हवेत गारवा आणि मधेच येणारी वाऱ्याची झुळुक. समुद्रही तसा फार लांब नसल्याने त्याच्या लाटांचाही दूरवरून  येणारा आवाज.
घराच्या आत मात्र तशी उब, कोपर्यातल्या चुलीच्या धुराने धूसर झालेली आतली दारे आणि जिने. कोपऱ्यात पिवळा 40 वॅट चा दिवा. त्याचा प्रकाशही उबदार .सारवलेली जमीन. सुरकुत्या पडलेली म्हातारी दारे,  त्याच्या वर चाहूल देणाऱ्या कड्या आणि तरीही त्यांना धरून राहिलेल्या जुन्या चौकटी.
वय वाढलं तरी आधार देणाऱ्या.
घराचे उंबरे सुद्धा नुसते फक्त म्हणायला झिजलेले अनेक जण अडखळले, अनेकांनी ओलांडलं, सणासुदीचं सजवलं, कुणीतरी  कित्येकदा तिथेच वाट पाहत उभं राहिलं, पण तरीही झीज काळाचीच झाली उंबरे अजूनही तेवढेच भक्कम.
गावाच्या एकबाजूला समुद्र तर दुसऱ्या बाजूला नदी. पाण्याचा असा दुहेरी योगायोग. नदी वळसा घेऊन समुद्राला मिळणारी.
कित्येक पिढ्या पाहिलेल्या या घराला पिढीजात मिळालेला वारसा आणि घरही घरातलं एक सदस्य आहे अशा तऱ्हेने त्याच्या विषयी बोलणारी माणसे.

जेव्हा सकाळ पासून बरसणाऱ्या धारा थांबल्या तेव्हा हलकेच पानावरुन ओघळणारे थेंब आनंदाने उड्या मारून खालच्या डबक्यात पडू लागले. नदी लाल मातीच्या पाण्याने वाहू लागली होती. वातावरण तरल शुद्ध आणि ताजं झालं होतं. घर पुन्हा गलबलून गेलं ,जागं झालं, चुलीवर चहा टाकला गेला ,ओसरी वर घरातली मोठी माणसं बसली.
कुणी छत्री घेऊन गावात निघालं कुणी उगाच पारावर गप्पा मारायला तर कुणी समुद्राला आलेलं उधाण पाहायला.
घर तिथंच होतं, सारं पाहत होतं, तृप्त होत होतं. जमीन आकाश पाऊस ऊन माड, या त्याच्या साथीदारांबरोबर वेळ घालवण्यात मग्न. छतातून निघणारा धूर बाहेर आकाशात लुप्त होत होता.
पाऊस पुन्हा नुकताच सुरु झाला होता.पहिल्याच पावसाने घर मात्र आनंदलं होतं...!

कोकणातल्या घरांना ओढ असते ती फक्त माणसांची, नव्या जुन्या सगळ्याला आपलं करणारी हि घरं माझ्या साठी नेहमीच खूप जिव्हाळ्याचा विषय राहिली आहेत, कधी भाताच्या शेता शेजारी तर कधी डोंगर पायथ्याशी तर कधी समुद्राच्या कुशीत वसलेली कोकणी घरं मनाच्या आत घर करतात.साधं सरळ पण आखीव रेखीव कसं जगावं हे दाखवतानाच त्यातल्या खऱ्या आनंदाची ओळख ती पटवतात. बदलणाऱ्या काळात ती मात्र तशीच आहेत आपली ओळख टिकवत आणि जोडलेली नाती जपत...!

आनंद
30 एप्रिल 2016

(ब्लॉग वरील छाया चित्रे माझी नसून ती ज्यांची आहेत त्यांना आभार )

Monday, February 29, 2016

प्रबळ इच्छा

शुक्रवार ची संध्याकाळ, ऑफिस मध्ये मीटिंग  संपली. लॅपटॉप बंद झाला आणि दिवस संपला. पुढच्या आठवड्याच काम आताच डोळ्यासमोर दिसत होतं. पण तेवढ्यात आठवलं कि उद्या शनिवार आहे आणि मन क्षणांत आनंदल कारण शनिवारी प्रबळगडला भटकंती ठरली होती. क्षणांत उत्साह आला आणि जीवाने घराकडे धाव घेतली.
अर्थात Beyond mountains सोबत volunteer म्हणून जाणे हीच पर्वणी होती.
शुक्रवारी रात्री झोपायला तसा उशिराच झाला पण तरीही पहाटे उठून आवरून वेळेत FC रोड ला पोहीचलो ,बाकीचेे मावळे आणि हिरकण्या पण वेळेत हजर झाल्या आणि सुरु झाला तो उगवणाऱ्या सूर्याच्या साक्षीने प्रबळगडाचा प्रवास.
नेहमी प्रमाणेच काही ओळखीचे काही अनोळखी चेहर होते. थोड्याच वेळात सगळ्यांच्या पोटातल्या भुकेला सँडविचचा आधार मिळाला.
मराठी दिनाच औचित्य साधून गायलेली काही भन्नाट गाणी, आणि मधेच "ट" अक्षर आल्यावर "तुम्हावर केली मर्जी बहाल" गाण्याचं "टूम्हांवर" असा अपभ्रंश करून पोट धरून हसून मजल दरमजल करत ठाकूरवाडी आलं.
उतरल्यावरच जाणवलं कि हवेतल्या आर्द्रते मुळे हा ट्रेक तसा जीव जेरीस आणणारा असणार आहे. सुरुवात केली आणि मजल दरमलजल करत दुपार पर्यंत 20 जणांच्या चमू ने प्रबळगड सर केला,  वर पोहीचल्यावर पोटोबा उरकून घेतला, आणि कलावंतीण पॉईंट ,गणपती मंदिर पाहून सगळे उतरणीला लागले. अर्थात उतरतानाही तिथल्या आर्द्रते मध्ये सगळ्यांनाच फार तहान लागत होती आणि पाण्याची खरी किंमत सगळ्यांना कळत होती. कधी एकदा प्रबळ माची वर पोहोचून पाणी पितो असे सगळ्यांना झाले होते.



प्रबळमाचीवर गाव आहे आणि इतक्या उंचीवर मुळात तिथले लोक कसे राहतात याचं अप्रूप वाटल्याशिवाय राहत नाही. शेणाने लिंपलेल्या भिंती , कौलारू घरं , त्या समोर सारवलेलं अंगण आणि लाकडी काठ्यांचं कुंपण , सगळीच घरे साधारण अशीच दिसत होती. आजूबाजूला पाहिलं तर अर्थात डोंगर आणि क्षितिज या पलीकडे काहीच दिसत नाही. प्रमाणबद्ध आयुष्य जगणाऱ्या इथल्या माणसांबद्दल मनोमन कौतुक वाटत राहतं. चौकट हा शब्द मुळात इथे अस्तित्वातच नसावा इतकं हे सगळं मोकळं भासतं. प्रगतीच स्वप्न सुद्धा इथे फार दूर वाटत होतं पण निसर्गाच्या जवळ नाही तर त्याचा भाग होऊन जगणारी माणसं बघून भारावून जायला होत.अर्थात हे जगणं प्रचंड कष्टाचं होतंच पण तरीही त्यात एक समाधान दिसत होतं.
गड उतरताना शरीरातल्या कमी झालेल्या पाण्याने आलेला थकवा गावात येऊन पिलेल्या थंडगार सरबताने नाहीसा झाला.
पुढच्या वेळी येईन तेव्हा इथे मुक्काम नक्कीच मुक्काम करेन असं ठरवूनच इथून निघालो. सायंकाळ चा सूर्यास्त पाहत पुन्हा सगळे जण पायथ्याशी परतलो.भटक्या जीवाची शिदोरी अजून एका अनुभवाने वाढली होती.



या सगळ्यात एक गोष्ट महत्वाची होती खरतर ती प्रत्येक भटकंती ला लागू होते,  इथे या ट्रेक मध्ये नुसता गड सर झाला नव्हता तर आयुष्याने एक नवा पडदा उघडून आत डोकावून पाहिलं होतं. ट्रेक ला आलेल्या पैकी कुणी अशा अनुभवाला पहिल्यांदा सामोरं जात होतं तर कुणी अनेकदा सामोरं जाऊनही पुन्हा पुन्हा फिरून इथे येत होतं पण सगळ्यांना जोडणारा धागा मात्र एक होता,
आत खोलवर असलेली किंवा रुजलेली एक दुर्दम्य इच्छा, काहीतरी नवं गवसेल, काहीतरी पुन्हा आठवेल , एखाद्या दुर्मिळ गोष्टीला साकडं घालता येईल , सतत धावणाऱ्या आयुष्याला एक चिरकाल थांबलेला क्षण सापडेल, मनाला असलेली जुनी जखम वा सल तेवढ्यापुरते का होईना विरून जातील आणि त्या विशाल काळ्या कातळाला पाहताना सगळ्याच गोष्टी खूप छोट्या होऊन जातील.
अर्थात प्रत्येकाला यातलं काहीतरी नक्कीच गवसलं होतं आणि या भटकंती साठी तेवढं पुरेसं होतं.
Beyond चा आणखी एक ट्रेक पार पडला होता आणि सगळ्यांना असंख्य आठवणी देऊन गेला होता..!




29 फेब्रुवारी 2016
आनंद

Sunday, January 31, 2016

पुन:श्च वासोटा





मागच्या वर्षी प्रमाणेच या ही वर्षीचा हा पहिला ट्रेक. वासोटा मुळात त्याच्या नैसर्गिक सौंदर्य मुळे कुणालाही भावेल असा किल्ला आहे आणि त्यामुळेच माझा सगळ्यात आवडता.
30 खूप उत्साही ट्रेकर्स , वय हा एक फक्त आकडा आहे हे सार्थ ठरवणारे सर्वात मोठे काका आणि एक लहानगा चिमुरडा, निसर्ग आणि त्याचं देणं याचा नेमका अर्थ जाणणारे भटके, फोटो मध्ये हे सगळं टिपणारे डोळस फोटोग्राफर, पहिला अनुभव असून केवळ "all it takes is courage" या उक्ती ला खरोखर सार्थ ठरवून मर्यादा शब्दाचीच मर्यादा रुंदावणारे अफाट जीव , या आणि अशा अनेक भन्नाट कारणांमुळेच एकाच दिवशी “नागेश्वर” आणि “वासोटा” अशा दोन्ही ठिकाणांची चढाई यशस्वी रित्या करता आली आणि "Beyond Mountains" च्या या ट्रेक नेही आपलं वेगळेपण यावेळीही जपलं.
रात्रीच पुण्यातून निघून साधारण पहाटे ३ वाजता सगळे बामणोली ला पोहोचलो ,गावातल्या मंदिरात सगळ्यांनी आपल्या स्लीपिंग बैग्स अंथरल्या आणि थंडीत सगळे झोपी गेले.

पहाटे सुरुवात झाली 6 च्या wake up कॉल ने. समोर धुक्यात हरवलेला शिवसागर जलाशय, थंडीत जागं झालेलं गाव, पाण्याचे पेटलेले बंब, नाश्ता करून बोटीची आतुरतेने वाट पाहणारे सगळे लोक, दूरवर दाट झाडीची चादर ओढून बसलेले कोवळ्या उन्हातले डोंगर, पाण्यात डुबकी मारून एखादा मासा पकडणारा पक्षी, एखाद्या चित्रात शोभेल असा आजूबाजूचा परिसर दिसत होता. अर्थात फॉरेस्ट ची परवानगी आणि सोपस्कार उरकून  साधारण 8.35 च्या दरम्यान सगळे बोटीत चढले अन सुरु झाला तो केवळ स्वतःने अनुभवावा आणि ज्याचा त्याने अर्थ लावावा असा एक तरल प्रवास. दूरवर पसरलेल्या हिरव्या रंगांच्या अनेक छटा पाहत असतानाच जणू जगाशी असलेला धागा तोडून एका वेगळ्याच जगात मन नकळत आलं होतं. तासा दिड तासाने आम्ही मेट इंदवली च्या जवळ पोहोचलो, अर्थात यावेळी पाणी कमी असल्यामुळे बोटीने आम्हाला तसं बरंच लांब सोडलं. दूर खुणावणारा वासोटा जुन्या आठवणी ताज्या करत होताच पण त्याचं ते रुपडं अर्थात नेहमी प्रमाणेच केवळ डोळ्याचं पारणं फेडणारे होतं.



मेट इंदवली मधल्या फॉरेस्टच्या ऑफिस जवळ एकत्र जमून सुरु झाला तो आमचा नागेश्वर चा प्रवास. वासोट्याच्या दिशेने थोड चालून आम्ही ओढ्याच्या वाटेला वळलो आणि हे काहीतरी फार भन्नाट असणार आहे याची सगळ्यांची खात्री पटली.

दोन्ही बाजूला घनदाट शब्द अपुरा पडेल इतकं अंगावर येणारं जंगल, ओढ्यात लागणारे पाण्याचे नितळ साठे , सूर्याची लपाछपी खेळणारी किरणे ,मधेच गायब होऊन अचानक कुठल्या फांदीतून डोकावणार आकाश , ओढ्यातले असंख्य दगड त्याच्यावर पाय ठेवून पुढे जाण्याचा आमचा चाललेला खेळ, पावसाच्या पाण्याने उन्मळून पडलेली जुनी झाडे आणि त्यांच्या अवाढव्य फांद्या नि खोडे आणि पक्ष्यांच्या न थांबणारा चिवचिवाट हे सगळं अफाट होतंच पण तितकंच हवाहवासा होतं. नागेश्वर कधी येतं यापेक्षा हे कधी संपु नये अशी वेडी आशा मनाने धरली होती, 


अर्थात असं होणार नव्हतंच आणि आम्ही साधारण 2.30 तासात सगळे नागेश्वर ला पोहोचलो. वरून दिसणारं दृश्य इथपर्यंत येण्याच्या सर्व कसरतीला विसर पाडणारं तर होतंच पण त्याही पेक्षा तिथून दिसणाऱ्या वासोट्याच्या दर्शनाने मनाला त्याच्या दिशेला खेचून घेत होतं. शंकराच्या पिंडीच्या दर्शन घेऊन फार वेळ तिथे न रेंगाळता आम्ही कूच केलं ते वासोट्याकडे.

कड्याच्या काठावरून गेलेल्या पायवाटेने एकामागे एक ओळीने अत्यंत सावधपणे चालत एक एक टेकडी पार होत होती. 
मधेच गवा ,अस्वल यांची विष्ठा त्यांच्या जवळ पास असल्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होती. अर्थात दुपारच्या टळटळीत उन्हात त्यांचं दर्शन दुरापास्तच होतं. बराच वेळ उन्हात चालून आम्ही पुन्हा एकदा दाट जंगलात शिरलो आणि अंगावर काटा आणणारी गार वाऱ्याची झुळूक आली. कदाचित वासोट्याला स्पर्शून आलेल्या त्या हवेने आमचं असं स्वागत केलं होतं. वासोटा तसा अजून बराच लांब होत.




जंगल शांत होतं आम्ही एकमेकांना दिलेल्या आरोळ्या शिवाय आता फारसे आवाज नव्हते. सगळ्यांच्याच पोटात भुकेचा डोंब उसळलेला असल्याने जिथे वासोटा आणि नागेश्वर चे मार्ग एकत्र येतात त्या फाट्यावर जेवायचा निर्णय झाला आणि सर्वांनी विसावा घेऊन जेवणावर ताव मारला. घनदाट जंगलाच्या मधोमध गारव्याला ,जसे लोक येतील तसे जेवायला घेतलं. आणि ताव मारून पोट भरेपर्यंत जेवलो. त्यात लिंबू सरबत, कोकम हे जोडीला होतेच. पोट भरून आत्मा शांत झाला आणि आता लक्ष्य होते वासोट्याचे. साधारण २० - २५ मिनिटाची चढण चढून वासोट्याला सगळे पोहोचले आणि वरून दिसणाऱ्या दृश्याने डोळ्याचं पारणं फेडलं. दूरवर दिसणारा शिवसागर जलाशय, हिरव्या रंगांच्या असंख्य छटा, बाबुकडा आणि तिथून दिसणारा जुना वासोटा, मागे नागेश्वर च्या गुहा हे सगळं भारावणार होतं.

निसर्ग आणि त्याची हि रूपं ,अनेक ठिकाणी दिसतात, पण इथे दिसतं ते त्याचं नितळ रूप, कुठल्याही पडद्याशिवाय. आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीशी एकरूप झालेला निसर्ग खूप काही सांगून जातो. जंगलातल्या पायवाटेवर पडलेल्या वाळलेल्या पानांवर दव पडून आलेली ओल आणि त्यामुळे त्यांच्यावर पाय पडून होणाऱ्या आवाजाला आलेली मर्यादा हि केवळ निसर्गाने तिथल्या शांततेला अबाधित राखण्याची केलेली सोय आहे असं वाटत राहता. चालता चालता अचानक वळणारी पायवाट आणि तिलाच लागून असलेली एखादी गायब होणारी पायवाट या जंगलातल्या गूढतेची प्रतिक आहेत. 
म्हणूनच जंगल मला एक जिवंत पोट्रेट वाटतं खूप हळुवार पणे त्यातले रंग बदलतात, आकार बदलतात, जुन्या झाडांची जागा नवी खोडं घेतात , विळखा घालणारे वेळ कधी नाहीसे होतात तर कधी उंच चढत जातात आणि मुळात हे सगळं इतकं आपसूक होत असतं कि एखादी जादू वाटावी. खूप विचार केला कि कळत कि याला सगळ्याला कारणीभूत एकाच गोष्ट असते आणि ती म्हणजे “सहजता”. निसर्गात तेवढी एकाच गोष्ट शाश्वत आहे , बदल स्वीकारत निसर्ग पुढे जात राहतो आणि ते हि मागे राहिलेल्या भूतकाळाला न कवटाळता आणि म्हणूनच तो सहजता जोपासू शकतो. होणारा बदल चांगला वाईट असं नसून तो स्वीकारत पुढे जाण्यात निसर्ग जास्त वाकबगार असतो.

सूर्य मावळत असताना आणि जंगलात अंधार हळूहळू डोकावतानाच आम्ही सगळे खाली पोहोचलो आणि बोटीचा प्रवास सुरु झाला. मागे वासोटा सूर्याला झाकून स्वतः हि अंधारात लुप्त होऊ लागला होता. माणसांच्या भौतिक जगातला दिवस संपला होता, जंगल मात्र जागं होत होतं. दरवेळी वासोटा सोडताना वाटतं तसेच विचार मनात गर्दी करत होते. सायंकाळच्या वेळेला मनाला येणारी अस्वस्थता टाळता येण्याजोगी नव्हतीच. सकाळी जगाशी तोडलेला धागा आता पुन्हा जोडला जाणार होता, काळ्या मिट्ट अंधारात बोट किनाऱ्याला आली. पाउल जमिनीवर पडलं आणि धागा पुन्हा जुळला. मन मात्र भरलेलं होतं ते वासोट्याच्या अजून एका भेटीच्या आठवणीने आणि तो अनुभव मागच्या अनुभवांसारखाच चिरकाल टिकणारा होता यात शकाच नव्हती.

   





आनंद
१८ जानेवारी २०१६

Thursday, December 31, 2015

भटक्या जीवाच्या (WanderLust Soul) भटकंतीच्या कथा :



सरते वर्ष आणि त्याच्या बरोबर पुढच्या वर्षा साठी जुने ठरणारे या वर्षीचे भटकंतीचे क्षण यावर थोडं विचार केला आणि उमगलं कि नित्य नेमाने नव्याची आस असणाऱ्या भटक्या जीवाने या वर्षीही खूप काही अनुभवलंय. नव्या आणि तितक्याच ताज्या क्षणांनी व्यापून गेलेलं हे वर्ष खरोखर आनंददायी होतं. हि भटकंती कधी अनोळखी लोकांबरोबर होती, तर कधी आपल्या माणसांबरोबर , कधी एकट्याने तर कधी परक्या देशातल्या नव्या मित्रांबरोबर ,कधी आड वाटेवर तर कधी अगदी डोळे झाकून चालता येईल अशा रुळलेल्या वाटेवर, कधी पावसाळी ढगाबरोबर पाठशिवणीचा खेळ करत, तर कधी उन्हापासून लपतछपत. जीव भटकत राहिला आणि त्यानेच नवी उर्जा मिळत राहिली. उर्जेचा तो झरा कधीच आटला नाही याला कारण अर्थात आपल्या माणसांनी दिलेली हक्काची साथ. भटक्या जीवाची भूक भागवताना एक बाजू कमकुवत पडू न देण्याची जबाबदारी घरातल्या माणसांनी सांभाळली आणि याच कारणामुळे आज प्रचंड वेगळे अनुभव घेऊन जीव जरासाही थकला नाहीये. उलट नव्या वर्षीच्या भटकंतीच्या तयारीला आता पासूनच लागलाय.

थोडासा मागे वळून पाहावा म्हटलं तर काही ठळक आणि लक्षात राहण्या सारखे अनुभव प्रत्येक वळणावर येत होते, २०१५ वर्षाची सुरुवात झाली ती वासोट्याच्या ट्रेक ने. जानेवारी महिन्यातल्या त्या ट्रेक ने धमाल आणली. ४ जानेवारीला ७ जणांच्या आमच्या ग्रुप ने वासोटा सर केला. कार मध्ये खच्चून भरलेल्या Bags, रात्री पोहोचल्यावर थंडी मध्ये कुडकुडत केलेलं maggi आणि ओम्लेट, मंदिरामध्ये काढलेली रात्र, पहाटेच्या धुक्याने धूसर झालेला शिवसागर जलाशय , बोटीचा रम्य आणि कधीच संपू नये असं वाटणारा प्रवास , पहिल्याच दर्शनाने मनात घर करणार वासोटा , वर पोहोचल्यावर चारी दिशांना पसरलेलं दाट अभयारण्य आणि शिवसागर जलाशयाच्या मध्ये मध्ये डोकावणाऱ्या खुणा आणि गड उतरून पुन्हा पायथ्याशी आल्यावर त्या शांत सायंकाळच्या वातावरणात अजून गूढ दिसणारं ते आजूबाजूचं जंगल हे सगळंच केवळ अदभूत होतं आणि आहे. योगायोगाने माझ्या या आवडत्या किल्ल्या पासूनच या नवीन वर्षाची सुरुवातही होण्याची शक्यता आहे आणि मी पुन्हा एकदा त्याला डोळे भरून पाहायला आतुर आहे.



मार्च मध्ये चीन ला भेट देण्याचा योग आला आणि पहिल्याच आठवड्यात "Hangzhou" या चीन मधल्या एका नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिध्द असलेल्या आणि “West Lake” या UNESCO World Heritage Site ला भेट देण्याचा बेत ठरला आणि तो साध्यही झाला. ८२१० एकर मध्ये पसरलेला हा परिसर केवळ नयनरम्य आहे. २ दिवसाच्या या परक्या देशातल्या अचानक ठरलेल्या प्रवासाने तिथल्या संस्कृतीला जाणून घेण्याची संधी फारच लवकर मिळाली होती. तिथे एकगोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे tourism क्षेत्राला लाभलेला सरकारचा वरदहस्त आणि त्या मुळे खूप चांगल्या प्रकारे अबाधित राखलेलं निसर्गाचं रूप. काळानुसार अर्थात त्यात बदल होत जातात पण तरीही पुढची पिढी त्यापासून वंचित राहत नाही. चीनच्याच माझ्या वास्तव्यामध्ये मी अर्थात ज्या शहरात राहिलो होतो तिथल्या जवळपास कुठे डोंगर दऱ्या किंवा फोर्ट आहे का हे आधीच शोधलं होतं आणि त्यात भेट देण्याच्या यादीत सगळ्यात पहिल नाव होतं ते “Huangshan mountain” किंवा “ Yellow mountain” हे सुद्धा १९९० पासून एक “UNESCO World Heritage Site आहे. पाईनची टोकदार झाडे , वरून जरूर अनुभवावा असं केवळ अप्रतिम सूर्यास्त, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराचे “Granite peaks” हे फक्त डोळ्याने पाहून तृप्त व्हावं इतकं सुंदर आहेत. वर असलेली खूप शिखरे १००० मीटर पेक्षा जास्त उंच आहेत. त्यातलं आम्ही भेट दिलेली “Bright Summit Peak” हे १८४० मीटर उंची वर आहे. १०० million वर्षाआधी एका समुद्राच्या नाहीसं होण्याने निर्माण झालेली हि शिखरे निसर्गाचा एक चमत्कारच आहेत. इथेही मला भावलेली एक गोष्ट म्हणजे इथलं हे पर्यटन फक्त तरुणाई पर्यंत सीमित नव्हतं तर मला इथे प्रत्येक वयोगटातील माणसे दिसत होती. अगदी हातात काठी घेतलेले सत्तरीचे आजी आजोबा, संपूर्ण परिवार सोबत चढाई करायला आलेलं कुटुंब, लहान मुलांचे ग्रुप्स , तरुणांचे कॅम्प्पिंग चे ग्रुप्स आणि या सगळ्यांची प्रचंड गर्दी हे दृश्य खरोखर लोभस होतं. हे दृश्य दिसायला कारणेही तशीच होती कारण इथेही खूप प्रकारच्या सोयी सरकारने करून ठेवल्या आहेत त्यामुळे अर्थात निसर्गाच्या जवळ जाऊन त्याला अनुभवायची अशी संधी कोण सोडेल. या शिखारांवरचे २ दिवसांचे वास्तव्य खूप काही शिकवणारे होते. त्या शेकडो लोकांमध्ये मी परक्या देशातला असूनही मला केवळ एक “भटका” म्हणून मी त्यांच्यातलाच वाटत होतो. “Yellow mountain” सर करून परतताना वाटेत पावसाने गाठून जणू काही आम्हाला निरोप दिला होता. खाली आलो तरी दूरवरची शिखरे अजूनही खूप काही बोलत होती. त्या मूक संवादाला कुठल्याही भाषेचा अडथला नव्हता.























भारतात परत आल्यावर मे महिन्यात पौर्णिमेला गोंदवल्याला जाण्याचा योग आला. आम्ही अनेकदा तिथे गेलो असलो तरी निषादचा हा पहिला मोठा प्रवास होता. प्रवचन, गीत रामायण आणि तिथल्या प्रसादाने मन तृप्त झाल्या शिवाय राहत नाही हा अनुभव जवळ जवळ सगळ्यांचाच आहे. आध्यात्म हि काही म्हातरपणाची सोय नसून खरतर ती आपल्या जीवन शैलीचा भाग बनवून आयुष्यातल्या वेगाला सामोरा जाण्याचं एक इंधन आहे असं मला वाटतं. सगळ्या कुटुंबासोबत केलेली ट्रीप अनेकदृष्ट्या खूप काही साध्य करणारी होती. साधेपणा आचरणात आणला तर कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याचं बळ मिळत हेच खरं आहे आणि हाच अनुभव तिथे वावरणाऱ्या प्रत्येक माणसाला पाहून मला नेहमी येतो. जमिनीवर राहण्यासाठी तेवढा अनुभव पुरेसा ठरतो. 

मे महिना सरून तशी पावसाची थोडी चाहूल लागली तशी त्याला शोधात फिरण्याची ऊर्मीही जागृत झाली. आज इथे, उद्या तिथे असं बरसणारा पाउस आपल्यावर कधी बरसेल हि आस लागून राहिली होती. आणि याच वेडातून घडल्या त्या पाबे घाट आणि बारामती च्या वेगवान आणि तितक्याच फ्रेश अशा बाईक राईड. पहाटे थोड्याफार गारव्याला सुरु होऊन दिवस मावळे पर्यंत संपणारे हे साधारण १५०/ २०० किमी चे छोटे अनुभव सुद्धा महिनाभर पुरेल एवढी तरतरी शरीरात भरून गेले हे मात्र नक्की. यात सगळ्यात जास्त भावलेला क्षण म्हणजे बारामती वरून परतताना पावसाच्या सरीने दिलेला सुखद धक्का. एकंच ढग दाटून यावा आणि त्याने बरसून आम्हाला चिंब भिजवावं आणि त्यातून आम्ही सावरे जणू काही घडलंच नाही असं दाखवून पुढे निघून जावं अशी लबाडी त्याने दाखवली होती. 



जुलै जसा उजाडला तसा बेत ठरला नाशिकचा, एका कौटुंबिक कार्यक्रमाला नाशिकला जावं लागणार होतं आणि मग भटकंती प्रिय परिवाराने तोच बेत अजून पुढे वाढवला आणि आमची मजल गुजरात मधल्या सापुतारा या थंड हवेच्या ठिकाण पर्यंत गेली. नाशिक मधेही काळा राम आणि गोरा राम मंदिरे, पंचवटी, रामघाट या गोष्टी एकदा पाहून याव्या अशा आहेत. निषाद साठी हि पुन्हा एकदा दूरची रोड ट्रीप आणि आमच्या साठी एक नवीन अनुभव होता. माझ्या ertiga च्या ७०० किमी च्या या कार प्रवासात खूप धमाल आणणारे काही क्षण होते अन काही केवळ डोळ्याने अनुभवण्याचे. आम्ही राहिलो तिथल्या रेसोर्ट समोर एक लेक होता पण पावसा अभावी तिथे फारसं पाणी नव्हत. पहिल्या दिवशी सकाळी उठून बाहेर बघताना धुकं पांघरलेला तो लेक, प्रचंड वाऱ्याने सळसळणारी झाडे आणि वरून वाहणारे ढग हे दृश्य केवळ अप्रतिम होतं. निसर्ग खरोखर अदभूत आहे तो याच साठी कारण वाहणारा वारा ठरवून वाहत नाही किंवा बरसणारी सर ती ठिकाण बघून बरसत नाही, निसर्गात मुळातच तो मुक्तपणा भरलेला आहे , साचे बद्ध गोष्टी माणसाने शोधून काढल्या आहेत आणि घड्याळाच्या शोधाने त्याला अगदी बंदिस्तच केलं आहे. त्यामुळे तासाने चालायची सवय लागलेल्या जीवाला तो मुक्तता लगेच अंगवळणी पडत नाही. 



जुलै मध्ये पुन्हा एकदा घडला तो एका अजून नव्या देशाचा छोटा पण वेगळा अनुभव. देश होता ब्राझील. कामा निमित्त घडलेला ४ -५ दिवसांचा हा प्रवास एखद्या भटक्या साठी पुरेसा होता. भारताशी बरेचसं साम्य असणारी तिथली भौगोलिक परिस्थिती, हवामान आणि लोकांची मानसिकता या जमेच्या बाजू मला आढळल्या. एवढं असलं तरी ब्राझील जागतिक पातळीवर वेगाने प्रगती करत आहेत हे नक्की. वेगाने बदलणारी शहरे हे त्याचीच द्योतक आहेत. तिथल्या माणसां बद्दल एक गोष्टी प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आयुष्याचा पुरपूर उपभोग घेणे, व्यक्ती स्वात्यंत्र, आनंदी वृत्ती आणि स्वतःच्या कामा बद्दल असलेली आत्मीयता. खुपश्या formalities मध्ये न अडकणाऱ्या तिथल्या संस्र्कुती मुळे परका माणूस तिथे लगेच रुळतो. तिथल्या माझ्या छोट्या वास्तव्यात “TAM” नावाच्या एका विमानाच्या musium ला भेट देण्याचा योग आला आणि पुन्हा एकदा जाणवलं ते पर्यटनाकडे कटाक्षाने लक्ष देणारी सरकारी यंत्रणा. तिथेही खासगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र याचा चांगला मेळ घातलेला दिसतो. 



ऑगस्ट मध्ये पावसाने पुनरागमन केलं आणि पावले वळली ती पुन्हा एकदा त्याच्या शोधात. या वेळी ठिकाण होतं चळकेवाडी , सातारा इथल्या पवनचक्क्या. पहाटे बाईक वरून सुरु झालेला प्रवास कास पठार, ठोसेघर, चळकेवाडी असा मजल दर मजल करत पवनचक्क्यांच्या एका अदभूत दुनियेत येऊन थांबला. प्रचंड मोठी पाती असणाऱ्या आणि वाऱ्याच्या शक्तीने फिरणाऱ्या खरतर घोंगावणाऱ्या पावनचक्या खरोखर चमत्कार वाटावा इतक्या भन्नाट दिसतात. नैसर्गिक शक्तीच्या माध्यमातून होणारी हि वीज निर्मिती वाखाणण्या योग्य आहे . चळकेवाडी ला अशा १००० पेक्षा जास्त पवनचक्क्या आहेत. आम्ही वर पोहोचलो तेव्हा डोंगर धुक्याने भरून गेलेला होता. आजूबाजूला पावनचक्क्यांचे खांब तर दिसत होते पण त्यांची पाती मात्र वर ढगात दडून बसलेली होती. ढग पुढे जाताच डोकावणारी पाती लपछपी खेळत असल्याचा भास मला झाला. निसर्ग खरोखर अजूनही आपल्या साठी गूढ आहे. मधून येणारी पावसाची सर, दाट धुके , हलका वारा, चिखलाने माखलेला रस्ता हे एखद्या भटक्याला आवडणारे दृश्य इथे होते आणि तोच क्षण या संपूर्ण ट्रीप मधला खरतर खरा भावलेला क्षण होता.


सप्टेंबर मध्ये बेत ठरला तो नाशिक जवळच्या “पट्टा” (विश्रामगड), रतनवाडी, भंडारदरा इथल्या भटकंतीचा. वेगवेगळ्या छोट्या इतक्या अनुभवांनी भारलेला हा प्रवास खरोखर साहसी होता. पुण्यातून रात्री ११ ला सुरु झाला प्रवास “पट्टा” ( विश्रामगड ) गडाच्या दिशेने. काळ्या मिट्ट रात्री रानावनातून, झोपी गेलेल्या गावातून, डोंगरातल्या नागमोडी रस्त्यातून आणि वर चांदण्या आकाशाच्या साक्षीने प्रवास घडला. पहाटे “पट्टा “ समोर दिसत असताना आमची वाट अडवली ती आडव्या गेलेल्या पाण्याच्या प्रवाहाने. मागे वळणं अशक्य आणि पुढे जाण अवघड अशा परिस्थितीत अडकलेलो असताना, शेवटी आजूबाजूचे दगड गोळा करून कार च्या चाकांना थोडा आधार मिळेल अशी सोय केली आणि धीर धरून माझी कार त्या पाण्यात घातली. आणि सुदैवाने हि बाहेरही आली. साधारण ९ ला पट्टा चढायला सुरुवात केली, वर पोहोचलं कि चारही दिशांना वेगवेगळे असे अप्रतिम दृश्य नजरेस पडत. वरून, “औढा” किल्ला दिसतो, दूर कळसुबाई, AMK, वितंडगड दिसतात. पट्ट्यावरून आम्ही निघालो रतनवाडीच्या अमृतेश्वर मंदिराकडे, भंडारदरयाला पोहोचून रतनवाडी कडे कूच केलं, साधारण तासाभराच्या प्रवासात दाट जंगलाच्यामधोमध गेलेल्या नागमोडी रस्त्याने तिकडे पोहोचलो. मंदिर फार सुंदर आहे. काळ्या पाषाणात कोरलेल्या रेखीव मूर्ती भूतकाळच्या खुणा अधोरेखित करतात. आजूबाजूला पसरलेलं अभयारण्य त्या सौंदर्यात अजून भर घालत. रात्रीची सोय म्हणून तिकडेच कॅम्पिंग साठी जागा शोधली आणि निसर्गाच्या कुशीत झोपी गेलो. थंडीमुळे दवाचे थेंब पाणी होऊन गवतांच्या पात्यांवरून झिरपत होते. जंगलातले अनामिक आणि गूढ आवाज मधेच लक्ष वेधून घेत होते. रात्र संपून पहाट झाली आणि आम्ही परतीचा मार्ग धरला. त्या मार्गावर रंधा falls हा महाराष्ट्रातला सर्वात उंच धबधबा पहिला आणि पाण्याच अजून एक रूप पाहिलं. ठरवून केलेल्या भटकंती पेक्षा थोडी जास्त मजा हि अनिश्तीतते मध्ये असते हे या भटकंती ने पुन्हा एकदा शिकवलं होतं. आलेले अनुभव केवळ दुर्मिळ होते आणि म्हणून ते जवळचे होते. स्वतःमध्ये डोकवायला असे अनुभव फार मोठी मदत करतात आणि आपल्या छोटे पणाची जाणीव करून देतात. 


ऑक्टोबर मध्ये पुन्हा एकदा ऐनवेळी ठरवलेला प्लान म्हणजे कोयना मधली भटकंती. ४५० किमी च्या ertiga प्रवासात असेच दुर्मिळ आणि चिरकाल टिकणारे अनुभव आले ते भैरवगड आणि कोयना / चांदोली अभयारण्या मधल्या जंगल सफारी मध्ये. अनेक डोंगर रस्ता नसलेल्या कच्च्या मार्गावरून जीप ने पार करत साधारण २ तासाच्या प्रवासानंतर आम्ही भैरावगडावरच्या मंदिरात पोहोचलो आणि थोडं जवळपासचा परिसर पायी चालून आजूबाजूच्या डोंगर रांगा पहिल्या. निषादसाठी हा ही अनुभव पहिलाच होता आणि साहसी हि. जाताना च्या प्रवासापेक्षा येताना चा प्रवास अजून थ्रिल्लिंग होता कारण दूरदूर पर्यंत पसरलेल्या मिट्ट काळोखात जीपच्या २ दिव्यांशिवाय कुठलाच प्रकाश नव्हता आणि आजूबाजूच्या दाट जंगलाने तो अनुभव अजून थरारक बनवला होता. साधारण दोन अडीच तासाच्या प्रवासाने आम्ही पुन्हा कोयना नगरला पोहोचलो. कोयना धरणाच्या भिंतीवरच्या दिव्यांना पाहत MTDC च्या रेसोर्ट वर पोहोचलो. संथ लयीमध्ये वाहणाऱ्या आजूबाजूच्या जीवानशैलीमध्ये आपण नकळत विरघळून जातो आणि तोच अशा भटकंतीचा परमोच्च क्षण असतो. 



नोव्हेंबर मध्ये घडला तो “beyond mountains“ सोबत कळसुबाई चा ट्रेक. सरळ, साधा तरीही चिरकाल टिकणारा अनुभव देणारा. १६४५ मीटर उंचीचा महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर ३५ लोकांनी पार केला आणि कधीही न विसरणारा क्षणांचे साक्षीदार झाले. वरून दिसणारं दृश्य शब्दात मांडणं खरोखर अवघड आहे. दमछाक करत जेव्हा माणूस वर पोहोचतो तेव्हा त्याला वर पोहोचताना पडलेल्या कष्टाचा विसर न पडेल तर ते नवल आहे. कधी कधी काही गोष्टींचा आपण फक्त साक्षीदार असतो तर कधी आपण त्याचा एक भाग बनतो. इथे मात्र दोन्ही अनुभवायला मिळत आणि ते हि एकाच वेळी. इतक्या उंचीवर पोहोचल्यावर आपण जणूकाही त्या शिखाराचाच भाग बनतो तर दुरून पाहताना आपण प्रेक्षकाची भूमिका बजावत असतो. 

नोव्हेंबर मध्ये अजून एक भटकंती झाली ती म्हणजे माझ्या आवडत्या समुद्र किनाऱ्याची, दापोली ची. ५५० किमी च्या या प्रवासाने मन तृप्त केले. आंबा,काजू,सुपारी च्या वाडी मध्ये असलेलं होम स्टेचा लोकेशन, रुचकर जेवण ,बीच वरची मऊ रेती या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जणूकाही थांबलेले घड्याळाचे काटे. रेंगाळणारा दापोलीचा अनुभव हे नेहमीच माझ्या साठी एक हवाहवासा अनुभव असतो. तो या वेळीही सार्थ झाला. आपण जेवढे निसर्गाशी एकरूप होतो तेवढ जगणं सोपं होतं. मला वाटतं समुद्र खरतर नेहमी बोलत असतो आपण जर लक्ष देऊन ऐकलं तर त्याची साद नक्कीच ऐकू येते. झेपावणाऱ्या लाटा किनाऱ्याला भेटून काय म्हणत असतील असं विचार केला कि त्यांचा संवाद मनात आपोआप उमटतो. पुढच्या वर्षी उन्हं नक्की यायचं पक्का केल्या शिवाय इथून पाय निघत नाही आणि तसं ठरवूनच आम्ही तिथून माघारी आलो. 




डिसेंबर मध्ये घडला तो हरिश्चंद्रगड चा ट्रेक. Beyond mountains च्या या ट्रेक च थोडक्यात वर्णन करायचा असेल तर मोजक्या शब्दात अस म्हणता येईल कि मुळात भटक्या असलेल्या जीवांना मनमुराद, मनसोक्त आणि तेवढीच जाणीवपूर्वक घडवून आणलेली एक सुंदर सफर.
वर्षातला शेवटचा ट्रेक असल्याने सगळ्यांचा उत्साह तितकाच दांडगा होता. मजलदरमजल करत कुठल्याही अडथल्याशिवाय सगळे वर पोहीचलो आणि मंदिरात जेवण उरकलं. थोडी तरतरी आल्याने पाय कोकणकड्या कडे निघाले आणि जवळ येताच त्याने सादही घातली. पण आधी राहण्याची सोय लावून मग तिकडे धाव घेतली.
संध्याकाळचा सूर्यास्त सुरेश वाडकरच्या "सुरमई शाम" ची आठवण करून देत नकळत डोळे पाणावत होता .कोकणकडा वाऱ्याशी कुजबुजत होता आणि वारा जणू त्याच्या मनीचा गुज आम्हाला वर येऊन स्पर्शातून सांगू पाहत होता. क्षितिजावरचे रंग डोळे लवताच बदलत होते आणि त्या अथांग आकाशातल्या चांदण्या हळूच डोकं वर काढून डोळे मिचकवत होत्या.
जशी रात्र झाली तसा चंद्र डोंगरामागून वर आला आणि जमीन चांदण्या प्रकाशाने भरून गेली. जणू चंद्राला पाहून वेडा पिसा होऊन वारा रौद्र वाटावा इतका जोराने वाहू लागला.
मंतरलेली रात्र संपली आणि कोवळ्या उन्हाने पुन्हा कोकणकडा न्हाऊन निघाला.
आयुष्यातले असे क्षण क्षणिक असले तरी सोनेरी असतात आणि आपण फक्त त्याचे साक्षीदार असतो. सरत्या वर्षाला मागे सारताना सर झालेला हरिश्चंद्रगड चिरकाल लक्षात राहील यात शंकाच नाही.




वर्षभराच्या भटकंतीवर नजर फिरवली तर मन आनंदी होतं पण मग त्याची भूकही अजून वाढते. भटक्या जीवाला अजून खूप काही पहायचं. दडलेल्या वाटा, सुटलेले रस्ते, अतृप्त किनारे, गूढ जंगले आणि त्यातले अनामिक आवाज, नवे डोंगर आणि त्याची खुणावणारी शिखरे. कदाचित हीच भटकंती नवीन पायवाटा शोधेल आणि जन्म देईल नव्या कुणीहि न स्पर्शिलेल्या गूढ अनुभवांना जे चिरकाल टिकतील आणि अनेक वर्ष मला जागं ठेवतील, नव्या क्षणांच्या शोधात. 
भटकंती हि सुद्धा खरतरं एक भाषा आहे, संवादाचं साधन आहे असं मला नेहमी वाटतं. भटकंतीच्या याच भाषेनं आज पर्यंत खूप लोक जोडले गेले आहेत आणि अजूनही जातील.
शेवटी कुणीतरी म्हणून ठेवलंच आहे “Sooner or later we must realize there is no station , no one place to arrive at once and for all. The true joy of life is in trip.
शेवटी मग भटकंती करतानाचा हा आनंद लुप्त होऊ न देता ती तहान वाढवत राहणं हे एवढाच हाती उरतं.
आणि म्हणूनच Its always good to be lost in right directionJ). कारण हरवलं तरच खरं तर नवीन काहीतरी गवसतं. आणि तीच तर आपली शिदोरी आहे. पुढच्या वर्षी असेच अनुभव येतील आणि ते जमतील तसे शब्दात बंदिस्त करायचा संकल्प करून इथेच थांबतो.



                                                                                                   ३१ डिसेंबर २०१५
                                                                                                   इति आनंद

Monday, November 9, 2015

अंगणात माझिया तव प्राजक्त उमललेला



निषाद, सप्त सुरातला सातवा सूर. वरचा “ नि “. अर्थात आमच्या घरातला नवा स्वर. 
आमच्या घराचा श्वास, जो प्रत्येकाला स्पर्शून जातो , वाऱ्या बरोबर गंधाने प्रवास करावा तसं काहीसं आम्ही करत राहतो. दिशा, वेग याचं भान सोडून फक्त वाहत राहतो. हाच कोवळा जीव घरात येऊन आता वर्ष उलटून गेलंय पण तरीही पहिल्या दिवसापासून आता पर्यंतच्या आठवणी तितक्याच ताज्या आहेत. जणू काही परवा सगळं घडलं आहे इतक्या आणि तेच स्मरण करताना त्याच्या जन्माच्या पहाटे पासून आतापर्यंत च्या आठवणी कवितेच्या रूपाने व्यक्त झाल्या आणि इथे त्या सादर केल्या आहेत.  
निषाद आमच्या साठी प्राजक्ताचा सडा आहे. ज्याने आमचा अंगण भरून टाकलंय, पहाटे कोवळ्या फुलांनी पांढरी शुभ्र नक्षी काढावी तसं काहीसं. प्राजक्ताचं फुल आपणहून अंगणात झेप घेतं आणि एकामागून एक अशा सगळ्या फुलांचा सडा अंगण भरून टाकतो. असंच एक फुल आमच्या अंगणात नव्हे ओंजळीत आलंय निरागस, कोवळं आणि तितकंच लोभस.


होती पहाट वेडी आतुर शुक्र तारा ,
गंधाळूनया झुरे तो, पुन्हा उनाड वारा
वेड्या त्या जीवाची, झाली उगाच दैना
अंगणात माझिया तव प्राजक्त उमललेला....!

नव्हतास तू जगी या , होती चाहूल घराला ,
क्षण एक एक होता, आतुर त्या घडीला,
बहरे वसंत पुन्हा तुझियाच स्वागताला ,
अंगणात माझिया तव प्राजक्त उमललेला....!

तुझिया त्या स्वरांनी, नांदी नव्या सुरांची
स्वप्ने नवीन पुन्हा, गुंफून पापण्यांची ,
स्पर्शून त्या जीवाला, आनंद भारलेला
अंगणात माझिया तव प्राजक्त उमललेला....!

छेडीले नाद जेव्हा कोवळ्या पावलांनी,
हाकेस साद तुझिया अनामिक शब्दांनी,
स्मृतीतुनी तरंगे राग ऐकलेला,
अंगणात माझिया तव प्राजक्त उमललेला....!

छोटया मुठीत तुझिया स्वप्ने गुंफलेली
कोवळ्या नजरेतुनी तू व्याकूळ शोध घेई,
खट्याळ त्या खळीचा संकेत ना कळाला
अंगणात माझिया तव प्राजक्त उमललेला....!

हास्यात तुझिया मिळे अर्थ जीवनाचा
येता कुशीत माझ्या, कल्लोळ भावनांचा
बरसुनी अतृप्त तरीही मेघ भारलेला
अंगणात माझिया तव प्राजक्त उमललेला....!

आनंद

30 नोव्हेंबर २०१५